उच्च कृषितंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पटीवर – अनिल जैन

जळगाव/जळगाव, २८ जून (प्रतिनिधी):- ‘जैन इरिगेशनच्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकरी उन्नत, शाश्वत शेती करून ते दुप्पट उत्पादन घेऊ लागले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे आर्थिक दृष्ट्या सक्षम बनत आहेत.’ या सोबतच शाश्वत विकास, आधुनिक शेती, युवकांसाठी कृषी व कृषी उद्योगातील संधी, गांधीवाद याबाबतचा सुसंवाद जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी साधला. मुंबईच्या छात्र संसद आयोजित इंटरनेशन लीडरशीप टूर या उपक्रमांतर्गत इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट, नॅशनल लॉ युनिर्व्हसिटी, पारुल विद्यापीठाचे सुमारे ३७ विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी जैन फार्म फ्रेश फुडस् चे संचालक अथांग जैन, युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, छात्र संसदचे अध्यक्ष कुणार शर्मा, आदित्य वेगडा हे देखील उपस्थित होते. हा कार्यक्रम जैन इरिगेशनच्या मुंबई कार्यालयात झाला.

इंटरनेशन लिडरशीप टूर २०२४ मध्ये जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, उपाध्यक्ष अनिल जैन यांनी  रोल मॉडेल म्हणून उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधावा अशी विनंती छात्र संसदेचे अध्यक्ष अॅड कुणाल शर्मा यांनी केली होती. त्यानुसार “भारतातील कृषी उत्पादकता आणि शाश्वतता वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण सिंचन उपाय” या विषयावर अनिल जैन यांनी उपस्थितांसमवेत सविस्तर चर्चा केली. संपूर्ण भारतात ७ दिवसांचा टूर   असून सहभागी प्रतिनिधी  २४ ते २६ जून तीन दिवस मुंबईत आणि दिल्लीमध्ये २७ ते २९ जूनपर्यंत ठरवून दिलेल्या रोल मॉडेल कंपन्यांना भेटतील असा हा उपक्रम आहे. यावर्षी हे विद्यार्थी अनिल जैन यांच्यासह राज्यपाल मा. रमेश बैस, उद्धव ठाकरे, राजदीप सरदेसाई, किरण बेदी, संजय सिंग, आदित्य ठाकरे आदी मान्यवरांच्या भेटी घेऊन चर्चा केली.

इंटरनेशन हा आजच्या तरुणांसाठी एक इमर्सिव हँड्स-ऑन लर्निंग प्रोग्राम आहे. ज्यांना सर्वच दृष्टीने सक्षम व्हायचे आहे आणि आपल्या सभोवतालच्या परिस्थितीत बदल घडवून भक्कम पाया करण्याची इच्छा आहे अशा युवाशक्तीसाठी खास कार्यक्रम आखला आहे. इंटरनेशनच्या माध्यमातून, छात्र संसद प्रतिनिधींना सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील तसेच सरकारमधील दूरदर्शी व्यक्तींना भेटण्याची आणि संवाद साधण्याची संधी प्रदान करते जेणेकरुन ते सर्वोत्तम गोष्टींकडून शिकू शकतील. यामध्ये शासनाच्या विविध मॉडेल्सना प्रत्यक्ष अनुभव देखील यात मिळणार आहे. जे महत्त्वाचे काम करतात परंतु ते दृष्टीक्षेपात येत नाही अशा व्यक्तींशी ही संवाद साधण्याची संधी उपलब्ध करण्यात आलेली आहे.

या पूर्वीच्या कार्यक्रमात हे विद्यार्थी नितीन गडकरी, रंजन गोगोई, आतिशी मार्लेना, स्वाती मालीवाल, आनंद नरसिम्हन, राजदीप सरदेसाई, भूपिंदर हुडा, दीपिंदर हुडा, चरणजीत सिंग चन्नी, बी के शिवानी, टेमजेंग अलॉन्ग आणि चारू प्रज्ञा यासारख्या उल्लेखनीय व्यक्तींना भेटले आहेत. डॉ. सी.एन. अश्वथ नारायण, पियुष मिश्रा, नीरजा बिर्ला, आशिष चौहान, भगतसिंग कोश्यारी, किरीट सोमय्या, वरुण ग्रोव्हर, जॅकी भगनानी, चारू प्रज्ञा, सॅवियो रॉग्रिग्ज, किरण बेदी, ऐश्वर्या महादेव, सुब्रमण्यम स्वामी, पियुष गोयल, स्मृती इराणी, नरेंद्र तोमर, परशोत्तम रुपाला, आनंदीबेन पटेल, अखिलेश यादव, कपिल सिब्बल, विनय सहस्रबुद्धे, उदय माहूरकर आणि स्वाती मालीवालयासह प्रभावशाली व्यक्तींना भेटलेले आहेत.

चार्तुमास समितीच्या प्रमुखपदी राजेंद्र ऊर्फ पप्पू लुंकड यांची सर्वानुमते निवड

जळगाव दि. २३ प्रतिनिधी –   जैन धर्माच्या चार्तुमासाच्या नियोजनासंबंधित महत्त्वपूर्ण बैठक आज पार पडली. दरवर्षीप्रमाणे दि. २० जुलै पासून जैन धर्माच्या चार्तुमासाचे आयोजन स्वाध्याय भवन, गणपतीनगर येथे करण्यात आले आहे. या चार्तुमासाच्या काळात विविध धार्मिक अनुष्ठांन, धर्माराधना, परिषुण पर्व, प्रबोधनात्मक कार्यक्रम, विविध संदेशपर सजीव देखावे, दररोज मंगल प्रवचनाचे तसेच संत-महात्मांच्या जयंती व दीक्षांत दिन मोठ्या उत्साहात साजरा केले जाईल. चार्तुमासात परमपूज्य आचार्य भगवंत १००८ श्री रामलालजी म. सा. यांचे आज्ञानुवर्ती शासन दीपक श्री सुमितमुनिजी म. सा., श्री भूतिप्रज्ञजी म. सा., श्रीऋजुप्रज्ञजी म.सा. आदी  ठाणा-३ यांच्याकडून ‘जैन दर्शन’ घडणार आहे.

जैन धर्मामधील  अत्यंत प्रज्ञावान संतमुनी म्हणून पूज्य सुमितमुनिजी म. सा. सह संतमुनी ओळखले जातात. त्यांचा मोठा शिष्यगण आहे. जैन मुनी आत्मोन्नती बरोबर लोकांना धर्मानुरुप आचारणासाठी प्रेरणा देत असतात. समस्त विश्वामध्ये ‘जैन दर्शन’ ला विशेष महत्त्व आणि ओळख आहे. सत्य, अहिंसा, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या मूलभूत सिद्धांतामध्ये समस्त मानवजातीच्या उध्दाराचे गुपित सामावले आहे. हे सर्व विस्ताराने जाणून घेण्यासाठी चार्तुमास काळ सर्वश्रेष्ठ मानला जातो. जन्मोजन्मींचा फेरांचे समापन करावयाचे असल्यास व मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर करावयाचा असल्यास धर्म सिद्धांताच्या वाटेने जावेच लागेल. चार्तुमास काळात बाहेर गावाहून येणाऱ्या सुश्रावकांची ये-जा चालू असते. या संतांचा मागील चार्तुमास रतलाम, मध्यप्रदेश येथे होता.

या सभेमध्ये हा चार्तुमास कुण्याही एका संप्रदाय वा पंथाचा नसून समाज व मानव कल्याणासाठी चार्तुमास आहे. या चार्तुमासाच्या कालावधीत सर्वांनी आपआपली जबाबदारी समजून सेवा द्यावयाची आहे. तत्पूर्वी जैन स्थानकवासी चार्तुमास समिती-२०२४ च्या प्रमुखपदी राजेंद्र ऊर्फ पप्पू लुंकड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. चार्तुमास समितीस सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलिचंदजी जैन यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले. त्यांनी जळगाव जैन श्री संघाचा संपूर्ण भारतात असलेला गौरव अधिक वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले. चार्तुमास समितीस प्रामुख्याने जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन हे नियमित मार्गदर्शन करतील. यावेळी माजी महापौर प्रदीप रायसोनी, नयनताराजी बाफना, ताराबाई डाकलिया, कस्तुरचंदजी बाफना, सुरेंद्र लुंकड, अजय ललवाणी, विजयराज कोटेचा, स्वरुप लुंकड, सुशील बाफना, पारस राका, अजय राखेचा, अनिल कोठारी हे शिर्षस्थानी असतील. बैठकीसाठी मोठ्या संख्येने जैन बांधव उपस्थित होते तसेच सर्वांनी एकदिलाने चार्तुमास उत्साहात संपन्न, यशस्वी करण्याचा निश्चिय केला.

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव -२०२५ च्या अध्यक्षपदी राजकुमार सेठिया

जळगाव दि. २३ प्रतिनिधी –  जळगावात दरवर्षी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्ताने पाच दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १० एप्रिल २०२५ रोजी येणाऱ्या भगवान जन्म कल्याणक महोत्सवातसुद्धा विविध धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक विचारांच्या प्रेरणेने ओतप्रोत कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. ही सर्व कार्यक्रम सुत्रबद्ध नियोजनासाठी सकल जैन श्री संघ यांच्या अधिनस्थ भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे गठन केले जाते. त्यासंबंधित येणाऱ्या भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव-२०२५ च्या अध्यक्षपदी तेरापंथ महासभेचे ज्येष्ठ सदस्य व माजी अध्यक्ष राजकुमार सेठीया यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

विविध धार्मिक कार्यात, जैन मुनींच्या सेवेत व सामाजिक उपक्रम आणि कार्यक्रमांमध्ये राजकुमार सेठीया सक्रिय सहभाग घेत असतात. त्यांचे संघटन आणि व्यवस्थापन कौशल्य विशेषत्वाने लक्षात घेऊन त्यांना या महत्त्वाकांक्षी महोत्सव समितीचे अध्यक्षपद सर्वानुमते प्रदान करण्यात आले. आज दि.२३ ला स्वाध्याय भवन येथे झालेल्या सभेत ही निवड केली गेली. या सभेला सकल जैन श्री संघाचे अध्यक्ष दलिचंदजी जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी, नयनताराजी बाफना, ताराबाई डाकलिया, कस्तुरचंदजी बाफना, सुरेंद्र लुंकड, अजय ललवाणी, विजयराज कोटेचा, स्वरुप लुंकड, सुशील बाफना, पारस राका, अजय राखेचा, अनिल कोठारी, राजेश जैन, जितेंद्र चोरडिया आदी उपस्थित होते. यावेळी महेंद्र जैन यांनी हिशोबाचा लेखाजोखा उपस्थित बांधवांसमोर मांडला.

राजकूमार सेठिया यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आगामी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव -२०२५ च्या तयारीसाठी बराच कालावधी मिळाल्याने तयारीसाठी उपयुक्त वेळ मिळालेला आहे मी सकल श्री जैन संघाचे आभार मानतो. तसेच यावर्षी महोत्सव साजरा करण्यासोबतच २६२४ उपवास करण्याचे सर्वांना आवाहन करत आध्यात्मिकतेची जोड देण्याची साद राजकुमार सेठिया यांनी समाजबांधवांना घातली. सभेचे समन्वय संचालन अनिल कोठारी यांनी केले. या सभेत समाजबांधवांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. आभार स्वरूप लुकंड यांनी मानले.

जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये जागतिक योग दिवस साजरा

जळगाव दि. २१ (प्रतिनिधी) –  जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या सर्व  आस्थापनांमध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला. मानवी जीवनातील शाश्वत बाबींचा विचार केल्यास शरीर हीच खरी संपत्ती होय. कितीही संपत्ती कमावली व आपले शरीर स्वास्थ उत्तम नसेल तर त्या संपत्तीची किंमत शून्य असते. या विचारातून आरोग्य ठणठणीत राहण्यासाठी, नियमित योग आणि व्यायामास प्राधान्य देणे क्रमप्राप्त आहे. जैन इरिगेशनतर्फे दरवर्षाप्रमाणे ‘जागतीक योग दिवसा’च्या औचित्याने जनजागृती करण्यात आली. यात नियमित योग करण्याचा संकल्प जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी केला.

प्रश्वास म्हणजे हृदयाची विश्रांती होय – सुभाष जाखेटे

योग ही आजच्या धकधकीच्या आणि व्यस्त जीवनशैलीमध्ये अतिशय आवश्यक साधना आहे. योगाद्वारे  शरीर आणि मनाचे ताणतणाव दूर होऊन आपला श्वास दीर्घ होतो त्यामुळे मन:शांती सोबत हृदयालासुद्धा विश्रांती मिळते. प्राणायाम आणि ध्यान करताना हाताच्या मुद्रेला महत्त्वाचे स्थान आहे. अंगठा हे परमतत्वाचे त्याच्या बाजूला असलेली तर्जनी आत्मतत्वाचे प्रतिक असते. परमतत्त्वाखाली लीन करणं आणि रज तम जस गुणाचे ती बोटे सोडून देणे या मुद्रेला अतिशय महत्त्व आहे असे सांगत सुभाष जाखेटे यांनी प्लास्टीक पार्क मधील सहकाऱ्याकडून योगसाधना करुन घेतल्यात. अंगूलीमुद्रा, ओमकारसह बिहार स्कूल ऑफ योगाचे त्रिकुट मुद्रा (टिटिके)  ही आसने करुन घेतली. खांदा, मान, पाठीचा कणा यासाठी नियमित करता येणारी योगाअभ्यासही समजून सांगितला. जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनीही नियमीत योग करण्याचा संकल्प केला. यावेळी जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी सी. एस. नाईक यांच्या उपस्थित हा योगाभ्यास झाला. याप्रसंगी डॉ. राजकुमार जैन, आर.एस. पाटील, युवराज धनगर, अनिल जैन यांच्यासह मानव संसाधन विभागातील सहकारी उपस्थित होते.

जैन फूडपार्कमध्ये ११०० सहकाऱ्यांनी केला योगाभ्यास…

‘कंपनीत काम करणारा माझा प्रत्येक सहकारी सृदृढ असावा त्याला व्यसने नसावीत ही भावना कंपनीचे संस्थापक श्रद्धेय मोठेभाऊ अर्थात भवरलालजी जैन यांची होती. चांगल्या हृदयासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आपण दररोज किमान अर्धा तास योग करावा.’ असे आवाहन योग शिक्षिका सौ. कमलेश शर्मा यांनी केले. जैन अॅग्रिपार्क, जैन फूड पार्क आणि जैन एनर्जी पार्क येथील सहकाऱ्यांसाठी सकाळी ८ वाजता जागतिक योग दिवसाच्यानिमित्ताने त्यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास केला त्याप्रसंगी त्यांनी सहकाऱ्यांशी संवाद साधला.

आरंभी बायो एनर्जी विभागाच्या प्रमुख डॉ. जयश्री राणे यांच्याहस्ते योगशिक्षिका सौ. कमलेश शर्मा यांचे स्वागत केले गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कंपनीचे सहकारी किशोर कुळकर्णी यांनी केले. सहकाऱ्यांशी प्रात्यक्षिक साधत सूर्य नमस्कार, झुंबा, सूक्ष्म व्यायाम, प्राणायम, योग्य पद्धतीने ओमकारचा करावयाचा उच्चार या महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. टिश्युकल्चर लॅबमधील महिला सहकारी देखील हिरीरीने या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. सुमारे ११०० सहकाऱ्यांनी योगाभ्यास करून घेतला. महिला सहकाऱ्यांना वटसावित्री पौर्णिमेनिमित्ताने कार्यक्रमात शुभेच्छा ही देण्यात आल्या. यावेळी योग विषयक शंकांचे समाधानही करून घेतले. जी.आर. पाटील, राजेश आगीवाल, एस.बी. ठाकरे, भिकेश जोशी, वैभव चौधरी, अजय काबरा, धीरज जोशी, सुचेत जैन, दिनेश चौधरी, बी.एम. खंबायत यांनी परिश्रम घेतले.

जैन हिल्स येथे श्रीराम मंदीर संस्थान, संत मुक्ताबाईंच्या पंढरपूर पालखीचे भव्य स्वागत

जळगाव, दि. २१ (प्रतिनिधी) – ‘टाळांची किण किण, मृदंगाचा नाद, विणेच्या तारेतून निघालेला तो मंद स्वर, जोडीला पंडीत भिमसेन जोशी यांच्या स्वरातली अजरामर अभंगवाणी तसेच रामकृष्ण हरी, आदी शक्ती मुक्ताबाई की जय हा जय घोष…’ यामुळे जैन हिल्स येथील व्हीआयपी गेटचा परिसर भक्तीमय झाला नाही तर नवलच! हा प्रसंग आहे श्रीराम मंदिर संस्थान (कान्हदेशद्वारा संचालित) जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीच्या स्वागताचा!

गेल्या दोन दशकांहून अधिक वर्षांपासून श्रीराम मंदिर संस्थानच्या पंढरीसाठी निघालेल्या पायी  पालखी, वारीचे स्वागत पौर्णिमेच्या नियोजित दिवशी करण्यात येते. रितीरिवाजानुसार जैन हिल्सच्या व्हीआयपी गेटजवळ पोहोचली. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीतर्फे जैन परिवारातील सौ. ज्योती अशोक जैन, सौ. निशा अनिल जैन, सौ. शोभना अजित जैन तसेच  अथांग व सौ. अंबिका जैन यांच्यासह कंपनीतील वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. जैन परिवारातील सदस्यांनी श्रीसंत मुक्ताबाई यांच्या पादुकांची पूजा केली. त्यानंतर सुलभा जोशी, मानव संसाधन विभागाचे पी. एस. नाईक, जी आर पाटील, एस. बी, ठाकरे, राजेश आगीवाल, सिक्युरिटी विभागाचे प्रमुख आनंद बलौदी,  आर. डी. पाटील, एम.पी बागुल, संजय सोनजे, अजय काळे, जीआरएफचे विश्वस्त डॉ. सुदर्शन अयंगार, समन्वयक उदय महाजन, डॉ. आश्विन झाला, अब्दुलभाई, गिरीश कुळकर्णी यांच्यासह जैन हिल्स येथील सुमारे ४०० स्त्री-पुरुष सहकाऱ्यांनी पालखीचे दर्शन घेतले. मेहरुणच्या शिवाजी उद्यानातील संत मुक्ताबाई मंदिरात पुजेचा मान जैन इरिगेशनला दिला जातो. यावर्षी कंपनीच्यावतीने सहकारी अनिल जोशी यांच्याहस्ते ही पूजा केली गेली.

कंपनीच्यावतीने राजाभोज खानपान विभागाचे प्रमुख विजय मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी भीमराव दांडगे व सहकाऱ्यांनी वारकऱ्यांच्या फराळाची व्यवस्था केली. जैन इरिगेशन सिस्टीम्स कंपनीने या यात्रेबरोबर संत मुक्ताबाईंच्या पालखीबरोबर मदत म्हणून एक मालवाहू वाहन तसेच दिंडीची उत्तम क्षणचित्रे उपयोगात आणून कला विभागातर्फे  उत्तम अशी सजावट केलेल्या प्रवासी वाहनाची उपलब्धता करून दिली आहे, हे वाहन पालखी बरोबरच जाईल. या पालखीची स्थापना १७९४ला झाली तेव्हापासून अखंडपणे हा पालखी सोहळा होत असतो. दरवर्षी ही वारी जात असताना जैन हिल्स येथे आदरातीथ्य स्वीकारून पुढे मार्गस्थ होते.

आजच्या या स्वागताचे वैशिष्ट्य असे की, आध्यात्म आणि पायी चालण्याचे, वारीचे महत्त्व प्राथमिक, माध्यमिक विद्यार्थ्यांना समजावे यासाठी डॉ. अविनाश आचार्य स्कूल, भ.गो. शानभाग स्कूल आणि काशिनाथ पलोड हायस्कूच्या विद्यार्थ्यांचा देखील सहभाग करून घेण्यात आला होता. वारकरी स्त्री-पुरुष पारंपरिक वेषात सहभागी विद्यार्थ्यांमुळे वारीला खरा अर्थ प्राप्त झाला.

अनुभूती इंग्लिश स्कूलच्या पहिल्या इयत्तेतील शिशूंचे स्वागत

जळगाव दि. १९ (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी अनुभूती इंग्लीश मीडियम स्कूलची स्थापना केली. या शैक्षणिक वर्षातील पहिल्या इयत्तेतील शिशुंची शाळा सुरू झाली. पारंपरिक पोषाख घातलेल्या वाद्य शहनाईच्या मंगलमय स्वरात आगळ्या वेगळ्या पद्धतीने, प्रत्येक विद्यार्थ्याला गोड खाऊ, फुल देऊन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.

शाळेचा पहिला दिवस अतिशय उत्साहात साजरा केला गेला. सर्व शिक्षकांनी आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारा जवळ फुग्यांनी आकर्षक सजावट केली होती. शाळेतील शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे तिलक लावून औक्षण केले. वर्ग खोल्या छान सजवून, विविध रंगी फुगे, कार्टुन्स लावून सुशोभित केल्या होत्या. शाळेच्या आवारात आकर्षक रांगोळ्या काढून आवार सुशोभित करण्यात आला होता. आरंभी स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. रश्मी लाहोटी यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे स्वागत केले. आयोजित स्वागताचा कार्यक्रम स्कूलच्या हॉलमध्ये आयोजला होता. यावेळी पालकांनी श्रद्धेय मोठ्याभाऊंच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करत आपल्या मुलांचे या शाळेत उत्तम भवितव्य घडेल यासाठी जैन परिवाराचे ऋण व्यक्त करण्यात आले. शाळेत सिनियर विद्यार्थ्यांनी आपल्या ज्युनिअर्सचे गाणे, नृत्य, एकपात्री नाट्यप्रयोग सादर करून स्वागत केले. सूत्रसंचालन पल्लवी साळुंखे, हर्षा वाणी यांनी केले. कार्यक्रमाची रुपरेषा संगिता पाटील सांगितली व आभरप्रदर्शन मनिषा मल्हारा यांनी केले.

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन, संचालक अतुल जैन यांच्या संकल्पनेनुसार पहिल्या इयत्तेच्या विद्यार्थ्यांचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्वागत व्हावे या नुसार कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज दाडकर, रुपाली वाघ, अरविंद बडगुजर, सीमा गगवाणी, ज्ञानेश्वर सोनवणे, कोमल सलामपुरिया, योगिता सुर्वे, राजश्री कासार, भूषण खैरनार, मधु लुल्ला,पूजा पाटील, लिन्ता चौधरी,  उज्ज्वला तळेले, सुकिर्ती भालेराव यांचा सहभाग होता.

अनुभूती स्कूलमध्ये शरण संकुल नृत्य नाटक, मल्लखांब आणि मल्लिहाग्गाची प्रस्तुती 

जळगाव, दि. १५ (प्रतिनिधी) – ‘कर्नाटक आणि महाराष्ट्राचे ऋणानुबंध तर आहेच, हा स्नेहभाव घट्ट करण्यासाठी ‘युथ एक्सचेंज प्रोग्राम’ सारखे उपक्रम भविष्यात आयोजित करू या.’ असे विचार श्री तारलाबालु जगद्गुरू बृहन्मठ, सिरिगेरे, जिल्हा चित्रदुर्ग, कर्नाटक यांचे प्रमुख डॉ. शिवमूर्ती शिवाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केले. अनुभूती निवासी स्कूलमध्ये “शरण संकुल” या नृत्य नाट्यांतर्गत वचननृत्य, मल्लखांब, मल्लीहग्गा या  रंजक कार्यक्रमाचे आयोजन गांधी रिसर्च फाउंडेशन व अनुभूती स्कूलच्या संयुक्त विद्यमाने केले होते. यावेळी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाऊंडेशच्या विश्वस्त सौ. ज्योती जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, स्कूलचे प्राचार्य देबाशिस दास उपस्थित होते.

आरंभी श्री तारलाबालु जगद्गुरू बृहन्मठ, सिरिगेरे, जिल्हा चित्रदुर्ग, कर्नाटक यांचे प्रमुख डॉ. शिवमूर्ती शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह उपस्थित उपरोक्त मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले.  संगीत, वचन नृत्य, नाट्य या सोबतच चित्त थरारक मल्लखांब तसेच मल्लीहाग्गा यांच्या प्रात्यक्षिकांमुळे १३ जूनची सायंकाळ उपस्थितांसाठी समृद्ध झाली. श्री. तारलाबालु जगद्गुरू बृहन्मठ यांच्या अखत्यारीत असलेल्या शैक्षणिक संस्थांमधील १२० हून अधिक विद्यार्थी – विद्यार्थीनींनी सांस्कृतिक समृद्धी व कलात्मक उत्कृष्टतेने परिपूर्ण असे अनोखे सादरीकरण केले. आरंभी ‘यक्षगान’ झाले. हा उडुपी, दक्षिण कन्नड आणि उत्तरा कन्नड जिल्ह्यांचा एक प्रसिद्ध कला प्रकार आहे. ही नृत्य आधारित कला सुरुवातीला स्थानिक शैलीत होती, परंतु नंतर ती विविध प्रकारांमध्ये मिसळली गेली. गाणे, नृत्य, वेशभूषा, भाषण आणि वाद्ये या पाच भागांचा समावेश असलेली ही कला नवरसावर आधारित आहे.

यक्ष, गंधर्व, किन्नर, किंपुरुष यांसारख्या वेशभूषा, चंदे वाजवण्याचे सूर, भगवतांचे गायन, दानवांच्या चेहऱ्यावरील हावभाव इत्यादींमुळे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याची अनोखी ताकद या कार्यक्रमात आहे. डॉ. के शिवराम कारंथजी यांनी या कलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. मल्लखांब हा भारतातील सर्वात प्राचीन सांप्रदायिक खेळांपैकी एक आहे. १२ व्या शतकातील चालुक्य समत सोमदेव यांच्या ‘मनसोल्लासा’ या ग्रंथात या खेळाचा उल्लेख आहे. १९ व्या शतकात मराठा पेशव्यांच्या दरबारातील राजे पुरोहित श्रीगुरु दादा देवधर बालभट्ट यांनी हे मल्लखांब सर्वप्रथम सुरू केले. पुढे मराठी माणसांनी त्याला अधिक प्रसिद्धी दिली. मल्लीहाग्गा हा मल्लखांब प्रमाणे कसरतीचा प्रकार आहे मल्लीहाग्गा म्हणजे वरून टांगलेली दोरी. त्या दोरीवर चढून विविध आसने, चित्तथरारक कसरती सादर होतात.

शरण संकुल हा नृत्य नाटिकेतून अक्कम महादेवी,अल्लामप्रभू, बसवण्णा किंवा बसवेश्वर यांचे जीवन दर्शन घडविणारा आगळा वेगळा कार्यक्रम सादर केला गेला. यावेळी अतुल जैन यांनी कलाकार व त्यांच्या शिक्षकांचा सत्कार केला. दीड तासाच्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थाने कलाअनुभूती घेतली.

मदन लाठी यांचे जागतिक रक्तदाता दिवशी ८८ वे रक्तदान

१४ जुन हा दिवस “जागतिक रक्तदाता दिवस” म्हणून साजरा केला जातो , या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबीर इंडियन रेडक्रॉस सोसायटी तर्फे आयोजित केले होते . त्यात प्रथम जिल्हाधिकारी आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी चे अध्यक्ष आदरणीय श्री आयुष प्रसाद सरांनी , इंडियन रेडक्रॉस सोसायटी चे उपाध्यक्ष श्री गंनी मेनन आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी श्री मदन रामनाथ लाठी यांनी आज आपले ८८वे रक्तदान केले
रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान माणसाने आयुष्यात येऊन स्वच्छंदी रक्तदान करून लाडके देवाचे व्हावे हे ब्रीदवाक्य येथील सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार आणि भोकर येथील तापीकाच्या गावातील गरीब शेतकऱ्याचे घरी जन्मास आलेले मदन रामनाथ लाठी यांचे आहे.

दर तीन महिन्यांनंतर डॉ च्या सल्ल्यानुसार करणारे एक नियमित रक्तदाते आहेत.
दिनांक १५ मार्च २०२४ रोजी मदन लाठी यांनी आपले ८७ वे रक्तदान पुर्ण केले. बऱ्याच दिवसांपासून ते दर तीन महिन्यांनंतर नियमित रक्तदान डॉ च्या सल्ल्यानुसार नियमित करीत आहे.

मागील रक्तदान केलेला दिवस म्हणजे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस १२ डिसेंबर २०२३ सर्वांचे प्रेरणा स्थान असलेले & जैन उद्योग समुहाचे संस्थपाक आदरणीय मोठे भाऊ ( कै भवरलाल जैन ) चा ८६ वा वाढदिवस & जैन इर्रीगेशन चे सहकारी मदन लाठी यांचे ८६ वे रक्तदान हा एक योग योगच म्हणावा लागेल.

आतापर्यंत त्यांनी विविध प्रसंगी रक्तदान करून एक रक्तदान या उपक्रमास मोलाचे सहकार्य केले असून त्यांनी पहिल्या करोना काळात नोव्हेंबर २० & १२ डिसेंबर २०२० रोजी प्लाझ्मा देऊन सोलापूरचे घाडगे याना & इतर तीन रुग्णास त्या काळात जीवनदान मिळाले असून त्यावेळी मदन लाठी याना विविध संस्थांनी कोरोना योद्धा सन्मानपत्र दिले होते त्यात माहेश्वरी युवा संघटना, महाराष्ट्र & विविध संस्थांनी त्यांचा सत्कार केला होता २५ फेब्रुवारी २०२३ रोजी मोठे भाऊंचे स्मृतिदिनादिमित्त सुद्धा त्यांनी रक्तदान केले होते

१ ऑक्टोबर २०२१ रोजी तत्कालीन राष्ट्रपती आदरणीय श्री रामनाथ कोविन्द सरांचा ७६ वा वाढदिवस & मदन लाठी यांचे ७६ वे रक्तदान पुण्यात पिंपरी चिंचवड येथील शासकीय वाय सि एम मध्ये केले होते त्यावेळी राष्ट्रपती यांचे निजी सचिव यांनी मदन लाठी यांचे उपक्रमाबद्दल मेल द्वारे अभिनंदन केले होते
२०१९ मध्ये आपल्या देशाचे तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन सर आणि महाराष्ट्र शासनाचे /राज्यातील विविध सचीव यांनी सुध्दा या उपक्रमाबद्दल अभिनंदन केलेले होते आणि करत आहेत.
असे विविध प्रसंगीं मदन लाठी रक्तदान करी असून वयाच्या ६५ वर्षापर्यंत आणि डॉ च्या सल्ल्यानुसार रक्तदान करणार आहेत

शकुंतला जैन यांना ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्कार

मुंबई, दि. १४ (प्रतिनिधी):–  भारतीय प्लास्टिक व्यवसायात आपल्या योगदान आणि यशस्वीतेसाठी केलेल्या कार्याला अधोरेखित करत श्रीमती शकुंतला कांतिलालजी जैन यांचा ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. हा पुरस्कार ११ जून २०२४ रोजी मुंबई येथील ताज लॅण्डस् एंड वांद्रे येथे आयोजित एका शानदार कार्यक्रमात जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. याच पुरस्कार सोहळ्यात जे.बी.  प्लास्टोकेम प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अविनाश जैन यांना ‘सर्टिफिकेट ऑफ अॅप्रिसिएशन’ने गौरविण्यात आले.

ग्रामीण भागात उद्योगाची नाळ कायम रहावी यासाठी प्रयत्नशील असल्याने मॉडर्न प्लास्टिक इंडियातर्फे जे.बी. प्लास्टच्या प्लास्टिक विषयात सर्वोत्कृष्ठ कार्य करणाऱ्या (महिला विभाग) श्रीमती शकुंतला कांतिलाल जैन यांनी उद्योग विस्ताराच्या कार्यास वाहून घेतले आहे. त्यांच्या या कार्यानिमित्त त्यांचा मॉडर्न  प्लास्टिक  इंडिया  या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थेतर्फे ‘लाईफ टाईम अचिव्हमेंट’ पुरस्काराने गौरवान्वित केले. योगा योगाने याच पुरस्कार वितरण सोहळ्यात जे.बी. प्लास्टोकेमचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अविनाश जैन यांना देखील गौरविण्यात आले. लघु आणि मध्यम उद्योग या विभागांतर्गत ग्रामीण भागातील विक्रेता या कॅटेगिरी अंतर्गत उत्तम कार्याबाबत हा सन्मान झाला आहे. जैन उद्योग समूहाचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन, वडील कांतिलालजी जैन तसेच  कंपनीचे विद्यमान अध्यक्ष अशोक जैन व जैन भावंडांच्या मार्गदर्शनात जळगाव येथील जे.बी. प्लास्टोकेमचे प्लास्टिक व पॅकेजींग विषयक उत्पादन व सेवा कार्याचा लौकिक वाढला आहे

२६ व्या आशियाई युवा बुद्धिबळसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रवीण ठाकरे यांची पंच म्हणून नियुक्ती

 जळगाव, दि. ८ प्रतिनिधी  :- अल्माटी,कझाकस्तान येथे  ९ ते २१ जून दरम्यान २६ व्या आशियाई युवा बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व आशियाई बुद्धिबळ महासंघ (ए.सी.एफ) यांच्या मान्यतेने आणि कझाकस्तान बुद्धिबळ महासंघाच्या प्रयत्नातून आयोजित या स्पर्धेत जवळपास ३५ देशांमधून ६४० खेळाडूंनी सहभाग निश्चित केला आहे.

या आशिया खंडातील महत्त्वाच्या स्पर्धेसाठी जळगावमधून जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण देवचंद ठाकरे यांना क्षेत्र पंच म्हणून नियुक्त केल्याचे जागतिक बुद्धिबळ संघटनेने (फिडे) जाहीर केले आहे. यापूर्वी त्यांनी अनेक राज्य, राष्ट्रीय, आशियाई, वर्ल्ड ज्युनियर आणि जागतिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम केले आहे. भारतभरातून सदर स्पर्धेसाठी पंच म्हणून बहुमान मिळवणारे ते एकमेव आंतरराष्ट्रीय पंच आहेत.

आठ, दहा, बारा, चौदा, सोळा व अठरा अशा विविध वयोगटात स्पर्धा खेळविली जाणार असून  स्विस् लिग पद्धतीने एकूण नऊ फेऱ्यांअंती अंतिम विजेते घोषित केले जातील. भारताकडून आपले खेळाडू यात सहभागी असून पदकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रवीण देवचंद ठाकरे हे गेली २० वर्षांपासून बुद्धिबळ संघटक,संयोजक,प्रशिक्षक व पंच म्हणून जैन स्पोर्ट्स अकॅडमी, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची व क्रीडा क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन मानाचा ‘गुणवंत क्रीडा मार्गदर्शक’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव  केला होता. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या पंच कमिटीचे सचिव म्हणून कार्यरत आहेत तर याचबरोबर विविध भूमिकेतून बुद्धिबळ क्षेत्राच्या वाढीसाठी ते सातत्याने कार्यरत असतात.

या निवडीसाठी प्रवीण ठाकरे यांचे जिल्हा संघटनेचे व जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्यात. या त्यांच्या यशासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे सल्लागार व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष तथा जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा संघटनेचे सचिव नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारुक शेख, अंजली कुलकर्णी, चंद्रशेखर देशमुख,पद्माकर करणकर, शकील देशपांडे, आर. के. पाटील,जैन स्पोर्ट्सचे समन्वयक अरविंद देशपांडे, रवींद्र धर्माधिकारी, अजित घारगे,नरेंद्र पाटील,संजय पाटील,यशवंत देसले,तेजस तायडे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रविण ठाकरे यांना महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ.परिणय फुके,कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, वरिष्ठ उपाध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, उपाध्यक्ष गिरीश चितळे,नरेंद्र फिरोदिया, विनय बेळे, पी बी भिलारे, सचिव निरंजन गोडबोले यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version