राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत अहमदनगरचा हर्ष घाडगे आघाडीवर

जळगाव:– (क्रीडा प्रतनिधी) महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित खानदेश सेंट्रल येथे आयोजित पॉवर सिस्टीम पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स यांचे  प्रायोजकत्व लाभलेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या वयोगटाच्या राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्या दिवशी  सकाळच्या  सत्रात दुसऱ्या दिवशी आघाडीवर असलेल्या पुण्याचा प्रथमेश शेरला व नंदुरबारचा जितेंद्र पाटील यांच्यात इंग्लिश ओपनिंग ने झालेल्या डावाच्या अंतिम पर्वात ४२ चालीत प्रथमेश याने सहज विजय प्राप्त केला. तर दुसऱ्या पटावर मात्र ठाण्याचा अथर्वसोनी व पुण्याचा श्लोक शरणार्थी यांचा पर्क डिफेन्स झाले ला डाव ३५ व्या चाली अखेर  बरोबरीत सुटला.
तिसऱ्या पटावर जळगावच्या अजय परदेशी याने आपल्यापेक्षा अधिक मानांकन असलेल्या मुंबईच्या राम विशाल परब यास बरोबरीत रोखले. चौथ्या पटावर मात्र पुण्याच्या ओम लमकाने याने आघाडीवर असलेल्या कोल्हापूरच्या आदित्य सावळकर यास रॉयल लो लोपेझ  पद्धतीने झालेल्या डावात बरोबरीत रोखले.
स्पर्धेच्या आजच्या सहाव्या फेरीत पुण्याच्या श्लोक शरणार्थी याने फ्रेंच किंग्स इंडियन डिफेन्स ने झालेल्या डावात  पुण्याच्याच प्रथमेश शेरला चा ३५चालीत पराभव केला. दुसऱ्या पटावर राम विशाल परब व अथर्व सोनी यांचा डाव ५५ व्या चाली अखेर फ्रेंच डिफेन्सने बरोबरीत सुटला तिसऱ्या पटावर सहाव्या फेरीत अहमदनगरच्या हॉर्स गाडगे यांनी कोल्हापूरच्या आदित्य सावळकर याचा कारोकान पद्धतीने झालेल्या डावात ३५ चालीत पराभव केला पराभव केला तर जळगावच्या अजय परदेशी याने अधिक मानांकन असलेल्या पुण्याच्या सौरभ महामुनी यास बरोबरीत रोखत आश्चर्याचा धक्का दिला.
आजच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सह सचिव अंकुश रक्ताडे यांनी आपली उपस्थिती दिली. स्पर्धेची  सातवी फेरी सकाळी साडेआठ वाजता तर अंतिम फेरी दुपारी दीड वाजता सुरुवात होईल. स्पर्धेचे बक्षीस वितरण आज संध्याकाळी सहा वाजता स्पर्धेची आठवी व अंतिम फेरी संपल्यावर लगेचच खानदेश सेंट्रल येथे होणार आहे पहिल्या चार विजेत्या खेळाडूंची निवड गुडगाव (हरियाणा) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार आहे. स्पर्धेत पंच म्हणून गौरव रे,प्रवीण ठाकरे,अभिजीत जाधव नत्थु सोमवंशी, आकाश धनगर, अरविंद देशपांडे अभिषेक जाधव यांनी काम बघितले आहे.

राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचा अजय परदेशी आघाडीवर

जळगाव दि. २६ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या तिसऱ्या फेरीत धक्कादायक निकालांची नोंद करण्यात आली त्यात पहिल्या बोर्डवर स्पर्धेचा प्रथम मानांकित खेळाडू सोलापूरचा मानस गायकवाड फिडे मानांकन (२०४४ )यास मुंबईच्या ओम  गाडा (१७७३) याने किंग्स इंडियन बचाव पद्धतीने झालेल्या डावात ४८ चालीत पराभव केला.
दुसऱ्या पटावर पुण्याचा द्वितीयमानांकित प्रथमेश शेरला (१९७८)याने इंग्लिश ओपनिंग ने झालेल्या चुरशीच्या सामन्यात  कोल्हापूरच्या रवींद्र निकम यांचा १२२ पराभव केला. तिसऱ्या पटावर श्लोक शरणार्थी याने इंडियन बचाव पद्धतीने झालेल्या डावात पुण्याच्या किरण पंडितराव यांचा २९  चालीत  पराभव केला चौथ्या पटावर पुण्याचा ओम नमकाने व मुंबईचा सौमिल  गोगटे यांचा निमजोवीच पद्धतीने झालेल्या डाव छत्तीसव्या चाली अखेर बरोबरीत सुटला.
स्पर्धेच्या चौथ्या फेरीत पुण्याच्या प्रथमेश शिरला याने पुण्याच्या आदित्य जोशीचा पराभव केला तर दुसऱ्या पटावर पुण्याच्या श्लोक शरणार्थी आणि अहमदनगरच्या आशिष चौधरीचा पराभव केला तर तिसऱ्या पटावर राम विशाल परब मुंबई याने नंदुरबारच्या जितेंद्र पाटील यांचा पराभव केला तर जळगावच्या अजय परदेशी याने आपल्यापेक्षा अधिक फिडे मानांकन असलेल्या पुण्याचा  अविरत चव्हाण (१८८९)याचा पराभव केला महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित खानदेश मॉल येथे आयोजित
एच टू इ पॉवर सिस्टीम पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीम चे प्रायोजकत्व लाभलेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या वयोगटाच्या
राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत एकूण  १६३ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवलेला असून ८० च्या वर फिडे मानांकित खेळाडू  विविध जिल्ह्यातून सहभागी झालेले आहेत. स्पर्धेत पंच म्हणून गौरव रे प्रवीण ठाकरे अभिजीत वैष्णव आकाश धनगर अरविंद देशपांडे अभिषेक जाधव हे काम बघत आहे स्पर्धेची पाचवी फेरी सकाळी नऊ तीस वाजता होईल

इनर व्हील क्लबतर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपासह नेत्रतपासणी

जळगाव दि.२५ प्रतिनिधी –  इनर व्हील क्लब जळगाव तर्फे जिल्हापेठमधील सु. ग. देवकर प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. सोबतच नेत्रतपासणी करुन विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेसह आरोग्यविषयी जनजागृती करण्यात आली.

इनर व्हील क्लब जळगावतर्फे शालेय विद्यार्थ्यांना मोफत १४० वह्या व १२० रजिस्टर वाटप करण्यात आले. हा उपक्रम सु. ग. देवकर प्रायमरी स्कूल जिल्हापेठ येथे राबविण्यात आला. ह्या उपक्रमाला नगरसेवक अमर जैन यांचे सहकार्य लाभले. ह्या वह्यांसह शैक्षणिक साहित्याचा जवळपास ५५ विद्यार्थ्यांना लाभ झाला.

डॉ. शीतल अग्रवाल यांनी २४० विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी केली. डोळ्यांचे विकार टाळण्यासाठी काय केले पाहिजे याबाबतही संवाद साधला. शिवाय मुलांनी व्यक्तिगत स्वच्छता करुन आरोग्य चांगले कसे ठेवता येईल यावर देखील त्यांनी संवाद साधला.

हया प्रसंगी क्लब अध्यक्षा सौ उषा जैन, सेक्रेटरी निशिता रंगलानी, कोषाध्यक्ष गुंजन कांकरिया, आयएसओ रूचि चांदिवाल, सीसीसी डॉ. शितल अग्रवाल, साधना गांधी, संध्या महाजन, शैला कोचर, डॉ. मयुरी पवार, रितु कोगटा, आबेदा काझी, कंचन कांकरिया, तनुजा मोरे आदी सदस्यांची उपस्थिती होती. मुख्याध्यापिका सुषमा साळुंखे यांनी आभार मानले.

बुध्दिबळ खेळात जीवन जगण्याची कला – माजी आमदार सौ. मधुभाभी जैन

जळगाव, दि. २५ प्रतिनिधी – ‘प्रत्येकाला कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी भविष्याचा अचूक अंदाज बांधावा लागतो. त्यादृष्टीने वर्तमानात कृती करावी लागते. कुठं थांबलं पाहिजे, वळण केव्हा घेतले पाहिजे हे डोळसपणे बघावे लागते. बुध्दिबळ हा खेळ सुद्धा आपल्याला सकारात्मक जीवन जगण्याची कला शिकवितो. आत्मचिंतन करुन भविष्यातील लढाईची रणनिती आखण्यासाठी मदत करतो. सृजनशील विचारांना चालना बुध्दिबळ खेळातून मिळते.’ असे मार्गदर्शन माजी आमदार सौ. मधुभाभी जैन यांनी केले.

एच2ई पॉवर सिस्टीम्स, पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीमचे प्रायोजकत्व लाभलेल्या महाराष्ट्र राज्य खुला गटाच्या बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन जळगाव येथील खान्देश सेंट्रल येथे आज (दि. २५) पासून २८ जुलै २०२४ दरम्यान केले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी अध्यक्ष म्हणून माजी आमदार सौ. मधुभाभी जैन बोलत होत्या. प्रमूख अतिथी म्हणून जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, महाराष्ट्र बुध्दिबळ असोसिएशन व जळगाव जिल्हा बुध्दिबळ असोसिएशनचे उपाध्यक्ष फारूक शेख, सचिव नंदलाल गादिया, जैन इरिगेशन सिस्टीम लि.चे व्हाईस प्रेसिडेंट-मिडीया अनिल जोशी, चिफ ऑरबिटर गौतम रे उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. सौ. मधुभाभी जैन आणि रविंद्र नाईक यांनी बुध्दिबळ पटावर चाल करुन स्पर्धेला सुरवात केली.

 नंदलाल गादिया यांनी जिल्हा बुध्दिबळ असोसिएशनने राबवित असलेल्या उपक्रमांविषयी प्रास्ताविकात सांगितले.  असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील सानिया तडवी व आंतरराष्ट्रीय पंच प्रविण ठाकरे यांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक यांनी बुध्दिबळ स्पर्धेला शुभेच्छा देताना सांगितले की, ‘जैन स्पोर्टस अकॅडमी व जिल्हा बुद्धिबळ असोसिएशनद्वारे आयोजीत फिडे मानांकित स्पर्धेमुळे बुद्धिबळ खेळाला प्रोत्साहन मिळेल. राज्यातून आलेल्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा मोलाची आहेच मात्र जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ती पोषक ठरेल.’

जैन इरीगेशन सिस्टीम्स लि, जैन स्पोर्ट्स अकॅडमी व खान्देश सेंट्रल यांच्या सहकार्यातून झालेल्या राज्य वरिष्ठ खुल्या गटासाठी राज्यातून १६२ बुद्धिबळ पटूंनी सहभाग घेतला. स्विस लिग पध्दतीने खेळल्या गेल्या या स्पर्धेत आज दोन डाव खेळले गेले. सोलापूरची सृश्रीती विकास मोरे या अंध खेळाडूंने सहभाग घेऊन सर्वांची मने जिंकली. तर जळगावचा कबीर श्रीकांत तडवी या सहा वर्षाच्या चिमूकल्याने सौ. मधुभाभी जैन यांच्या वजरीला मागे घेण्यास भाग पाडले. ७३ वर्षाचे वयस्क खेळाडूंनी आपला अनुभव अजमावला.

जिल्हा बुध्दिबळ संघटनेचे उपाध्यक्ष शकील देशपांडे, सहसचिव चंद्रशेखर देशमुख, कार्यकारणी सदस्य तेजस तायडे, रविंद्र दशपुत्रे, विवेक दाणी आदी उपस्थित होते. बुध्दिबळाचे आंतरराष्ट्रीय पंच प्रविण ठाकरे, जैन स्पोर्टस ॲकडमीचे समन्वयक रविंद्र धर्माधिकारी यांच्यासह जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे सहकारी यावेळी उपस्थित होते. अरविंद देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रशेखर देशमूख यांनी आभार मानले.

जैन हिल्सवर ‘केळीवरील फ्युजारीयम विल्ट, टी आर-४ रोग व्यवस्थापन’ चर्चासत्र

जळगाव दि.२१ प्रतिनिधी – शेतकऱ्यांना सर्वात जास्त अर्थांजनासह ग्रामीण भागात रोजगार निर्माण करणारे पीक म्हणजे केळीकडे बघितले जाते. केळीमध्ये नवनवीन संशोधन सुरु असताना देशात बिहार, उत्तरप्रदेश, गुजरात, मध्यप्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये केळीवरील फ्युजारीयम विल्ट रोगाचा प्रादुर्भाव व धोका वाढताना दिसत आहे. केळीवरील फ्युजारीयम विल्ट रोगाने फिलपीन्स, इंडोनिशीया, चिन, ऑस्ट्रेलिया, होंडूरस, कोलंबिया, तैवान, इस्त्राईल, नेपाळ, पाकिस्तान यासह अनेक देशातील केळी बागा उध्वस्त केल्या आहे. त्यामुळे केळीचे उत्पादन घटत आहे. म्हणून या रोगाला कसे ओळखाचे, आपल्या परिसरात रोगाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून काय प्रतिबंधात्मक उपाय करायचे व रोग व्यवस्थापन कसे करावे, जेणे करुन भविष्यात केळी पीक शाश्वत राहिल; यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया (CHAI), नवी दिल्ली, ICAR-राष्ट्रीय  केळी संशोधन केंद्र ,(NRCB) त्रिची यांच्या संयुक्त विद्यमाने आणि जैन इरिगेशन सिस्टीम लि. यांच्या सहकार्याने ‘केळीवरील फ्युजारीयम विल्ट, टी आर-४ रोग व्यवस्थापन’ विषयावर एक दिवसीय चर्चासत्रात शास्त्रज्ञांसह प्रयोगशील शेतकऱ्यांनी विचार मंथन केले.

जैन हिल्सस्थित कस्तुरबा सभागृह येथे झालेल्या चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून  केंद्र सरकारचे माजी उद्यान आयुक्त व कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंग उपस्थित होते. कार्यक्रमात प्रमुख वक्ते राष्ट्रीय केळी संशोधन केंद्र त्रिची चे वरिष्ठ शास्त्रज्ञ (वनस्पती रोग) डॉ. आर. थंगवेलु, माजी संचालक डॉ. बी. पद्मनाथन, बिहारच्या डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठमधील वनस्पती रोग शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. के. सिंग, जळगावचे जिल्हा कृषी अधीक्षीक कृषी अधिकारी कुरबान तडवी, जैन इरिगेशनचे आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल पाटील, डॉ. बिरपाल सिंग, प्रयोगशील शेतकरी धिरेंद्रभाई देसाई, प्रेमानंद महाजन उपस्थित होते. तर पॅनल चर्चेत मान्यवरांसह डॉ. ललित महात्मा, डॉ. बी. के. यादव, किशोर चौधरी, प्रफुल्ल महाजन, विशाल अग्रवाल, गोपाल पाटील खामनी, विनायक पाटील, किशोर महाजन, संतोष लचेटा, हरदिपसिंग सोलंकी, निखील ढाके, कमलाकर पाटील, पवन पाटील, रितेश परदेशी, गम्पाशेठ चौधरी, रविंद्र पाटील, विशाल पाटील, सुनील पाटील, सुधाकर पाटील, अमित पाटील यांच्यासह शेतकरी सहभागी झालेत. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने चर्चासत्राची सुरवात झाली. शाल, सूतीहार, गांधीजींची प्रतिमा देऊन मान्यवरांचे स्वागत झाले. प्रास्ताविक डॉ. के. बी. पाटील यांनी केले. जळगाव, धुळे, बुऱ्हाणपूर, बडवाणी, नर्मदानगर या जिल्हांसह गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांनी चर्चासत्रात सहभाग घेतला. शेतकऱ्यांना सहभागाबाबत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

उद्घाटन सत्रात डॉ. आर. थंगवेलू म्हणाले, क्लायमेंट चेंजमुळे फ्युजारीयम विल्ट, टीआर-४ वाढतांना दिसत आहे. आवश्यक काळजी घेतली गेली नाही तर त्याचे पुढील काही वर्षात विपरीत परिणाम दिसतील. यासाठी सामूहिक पद्धतीने नियोजन करुन फ्युजारीयम विल्ट वर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी माती परिक्षण, रोपांची गुणवत्ता, रोगमुक्त रोपं व कंद लागवड, पीक पद्धतीत बदल, शेतातून बाहेर जाताना किंवा शेतात येताना पायातील बुट सॅनिटायईजेशन केले पाहिजे, असे उपाय योजनांसह त्यांनी सादरीकरण केले. फ्युजारीयमचे लक्षणं, त्याचा प्रवास कसा होतो हेही त्यांनी शास्त्रीयदृष्ट्या सांगितले.

कुरबान तडवी म्हणाले, संपूर्ण देशाच्या  तुलनेने महाराष्ट्रात विल्ट या रोगाचा शिरकाव कमी किंबहूना नसल्यागत आहे मात्र आपण धोकादायक स्थिती आहोत कारण सर्वात जास्त उत्पादन जळगाव जिल्ह्यातून होते. त्यासाठी काळजीसुद्धा सर्वात जास्त आपण घेतली पाहिजे.

डॉ. एच. पी. सिंग म्हणाले, केळी पीक हे आरोग्यदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या जीवनदायी पीक आहे. त्यामुळे त्याकडे गंभीरतेने बघितले पाहिजे. इतिहासाकडे डोकावलो तर केळीत बदल होताना दिसतात. नवनवीन तंत्रज्ञानाने आपण शेती करत असलो तरी नवीन समस्याही निर्माण होत आहेत ही वस्तूस्थिती आहे. मात्र त्यावर वेळीच अटकाव केला तर भविष्य सुकर होते. फ्युजारीयम वर कायम स्वरुपी सोल्युशन अजूनही नाही त्यामुळे केळी पिकावर एक प्रकारे कोराना व्हायरस सारखा तो काम करत आहे. सक्तीने नाही तर सामूहिक शक्तीने प्रतिबंधात्मक उपाय करुन नियंत्रण ठेवता येईल. यासाठी संशोधक, वैज्ञानिक, शेतकरी आणि जैन इरिगेशन सारख्या संस्थांनी सामाजिक स्तरावर चळवळ प्रमाणे काम केले पाहिजे. उन्हाळ्यात जमीन नांगरुन पडू देण्यासह जनजागृतीवर भर दिला पाहिजे. विषाणू आहे तेथेच त्याला संपवले पाहिजे त्याचे पुढे संक्रमण होऊ देऊ नये असेही त्यांनी सुचविले.

डॉ. एस. के. सिंग यांनी तांत्रिक सत्रात सांगितले की, फ्युजारीयमुळे जगातील एकूण उत्पादनापैकी सध्या १५ टक्के केळी प्रभावीत झाली आहे. २०४० पर्यंत ती ४० टक्क्यांपर्यंत होईल. १० मिलीयन डॉलरमध्ये त्याचे नुकसानाचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. इस्त्राईल, ओमान, पाकिस्तान, टर्की यासह १३ देशांमध्ये विल्टचे प्रमाण वाढले आहे. जगातील १३६ देशात केळीची शेती होते. त्यातील २४ देशांना थोड्याफार प्रमाणात का होईना या विषाणूंमुळे प्रभावीत केले आहे. भारतात महाराष्ट्र सोडले तर जवळपास कमी जास्त प्रमाणात फ्युजारीयम विल्ट अॅक्टीव्ह आहे तो एका शेतात जवळपास ५० वर्षांपर्यंत राहू शकतो. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी संशोधन सुरु असून लवकरच फ्युजीकॉन्ट व नो टू विल्ट  टेक्नोलॉजी आयसीआर तयार करेल असाही विश्वास त्यांनी शेतकऱ्यांसमोर व्यक्त केला.

डॉ. पद्मानाथन यांनी सादरीकरणातून केळीच्या मुळांच्या आरोग्याबाबत सांगितले. फ्युजारीयम टाळण्यासाठी कोणकोणती पीकांनंतर केळीची लागवड केली पाहिजे हेही त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले.  डॉ. के. बी. पाटील यांनी फ्युजारीयम व्यवस्थापनावर चर्चेत सहभाग घेतला. रोगग्रस्त झाडाला तण नाशकाचे इंजेक्शन देऊन तेथेच मारावे व त्यावर भूसा टाकून झाड बागेत जागेवरच जाळावे. रोगग्रस्त झाड दिसताच क्षणी त्याला कंटेन्टमेंट करण्यासाठी बाजूच्या आठ झाडांना दोरी बांधावी जेणे करून रोगग्रस्त झाडा जवळ मजूर किंवा कुणीही जाऊ शकणार नाही. फार्म फूट बाथ करणे, अवजारे, मजूरांची बूट व चपला, दळणवळणाची साधने सॅनेटाईज केले पाहिजे, जैविक नियंत्रण करणे, गादीवाफा पद्धत वापरली पाहिजे, ड्रिप वापरावे, केक, निम केकसह संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करुन बाग सशक्त ठेवणे, प्रत्येक गावाच्या वेशीवर फूट बाथ व टायर बाथ म्हणजे निर्जतूकीकरण करण्याची सुविधा निर्माण करणे गावात, तालुक्यात किंवा जिल्ह्यात रोगाचा शिरकाव होणार नाही. यासाठी सामूहिक खबरदारीचे उपाय करणे. फिलिपिन्स मधील शास्त्रज्ञांचा दाखला देत फ्युजारीयम एक वर्षात १०० कि.मी. चा प्रवास करतो त्यामुळे त्याची भयानकता लक्षात येत असून केळीची शेती शाश्वत ठेवायची असेल तर आताच प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजे. सकारात्मक मानसिकतेतून आपले शेत, गाव, शहर, जिल्हा आणि नंतर व्यापकस्तरावर बागा सुरक्षितेच्या दृष्टिने प्रयत्न केले पाहिजेत. चर्चासत्र यशस्वितेसाठी जैन इरिगेशनचे अॅग्रोनॉमिस्ट राहुल भारंबे, तुषार पाटील, मोहन चौधरी, योगेश पटेल, सतिष राजपूत, शुभम पाटील, जयदीप अझहर, संजय पाटीदार यांच्यासह अॅग्रोनॉमिस्ट यांनी सहकार्य केले.

स्वच्छ शाळा प्रतियोगिता’ ही चळवळ व्हावी! – डॉ. अनिल काकोडकर

जळगाव दि. २० (प्रतिनिधी) – भविष्यात निर्माण होणारे गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येकाच्या मनात महात्मा गांधीजींचे विचार रुजविणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर विज्ञान, इनोव्हेशन, कृषी क्षेत्रात भारताने प्रगती केली, मात्र गांधीजींच्या विचारातून भारताचे भवितव्य घडविण्याचे मूल्यवर्धित काम आणखी खूप मोठ्या स्वरूपात करायचे आहे. स्वच्छता अभियान, वाहतूक नियमांचे पालन, सूत्रबद्धतेसह काटेकोर व्यवस्थापनाद्वारे कल्पनाशक्तीतून नवीन पिढी हे शिक्षणाच्या माध्यमातून करत आहे, त्याची रूजवात गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगितेतून झाली आहे खरं तर ही प्रतियोगिता शाळा शाळा राबवून त्याची चळवळ व्हावी, असे अध्यक्षीय भाषणात अणूशास्त्रज्ञ तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. अनिल काकोडकर यांनी प्रतिपादन केले.

गांधी तीर्थच्या कस्तुरबा सभागृहात ‘गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता-२०२४’ पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. अनिक काकोडकर यांच्यासमवेत गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन अय्यंगार, गांधी संस्कार विचार परिक्षेचे समन्वयक गिरीष कुळकर्णी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. यावेळी मान्यवरांसमवेत भाविका महाजन, नारायणी वाणी आणि खिलेश कोल्हे या विद्यार्थ्यांना पाहुण्यांसमवेत उद्घाटना प्रसंगी व्यासपीठावर येण्याचा सन्मान मिळाला. संत कबीरजींच्या ‘चदरीया झिनी रे झिनी…’चे गाणे सर्वांचे लक्ष वेधून गेले.  प्रास्ताविक व निवेदन गिरीष कुळकर्णी यांनी केले.

अशोक जैन म्हणाले की,‘राज्यस्तरीय शालेय अभ्यासक्रमात वाहतूक नियमांचे पालन, पर्यावरणाचा समतोल राखणे, शेतीविषयी आवड निर्माण करणे हे विषय शिकविले गेले पाहिजे, भौतिक विज्ञानयुगात आपण भविष्यासाठी काय वाढून ठेवतो आहे याचं चिंतन केले पाहिजे, यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनचा स्वच्छ शाळा प्रतियोगिता हा खूप मोलाचा उपक्रम आहे. ‘जेव्हा आंतरिक आणि बाह्य दोन्ही स्वच्छता असते तेव्हा ती देवत्वाकडे जाते’ या महात्मा गांधीजींच्या विचारातून गांधी रिसर्च फाऊंडेशन कार्य करत आहे. अहिंसेला मध्यबिंदू ठेवून सामाजिक जागृतीचे माध्यम ठरत आहे. महात्मा गांधीजींच्या शिकवणीनुसार खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी ग्रामीण भागात शेती आणि शेतीपूरक उद्योगांना चालना देण्यासाठी नाविन्यपूर्ण फ्यूचर अॅग्रीकल्चर लिडर ऑफ इंडिया अर्थात फाली उपक्रमात सहभाग घेण्याचेही आवाहन त्यांनी केले.’

 डॉ. सुदर्शन अयंगार म्हणाले, शाळा, घर, मोहल्ला, परिसर स्वच्छ करुन, जनजागृती करून स्वच्छता मोहिम आपण राबविली. मात्र मनाची स्वच्छता म्हणजे सूक्ष्म स्वच्छता सफाई करुन संवेदनशील मनाने नवीन विश्वाची निर्मीती करावे असे आवाहन त्यांनी केले.

पुरस्कार प्राप्त शाळा

महाराष्ट्र राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक (एक लाख रुपये, सन्मानचिन्ह असे स्वरुप) न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी चिंचघरी (सती), ता. चिपळूण, जि. रत्नागिरी यांना देऊन गौरविले गेले.

ग्रामीण भागातील विजेते

आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनि कॉलेज, पेठवडगाव (प्रथम- ५१ हजार रु. रोख व सन्मानचिन्ह), या. दे. पाटील माध्यमिक विद्यालय, मेहरुण, ता. जि. जळगाव. (द्वितीय- ३१ हजार रु. व सन्मानचिन्ह), सोमय्या विद्यामंदिर व उच्च माध्य विद्यालय, साकरवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर आणि राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर, कोळपेवाडी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर (तृतीय – २१ हजार रु. व सन्मानचिन्ह)

तालुका स्तरीय विजेते – विजेते

साने गुरुजी निवासी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केज,(प्रथम- ५१ हजार रु. रोख व सन्मानचिन्ह), पां. बा. मा. म्युनिसिपल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिरपूर (द्वितीय- ३१ हजार रु. व सन्मानचिन्ह), काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालय, जळगाव, ता. जि. जळगाव, (तृतीय – २१ हजार रु. व सन्मानचिन्ह)

जिल्हा स्तरीय विजेते – विजेते

एस. ए. मिशन हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार, ता. जि. नंदुरबार (प्रथम- ५१ हजार रु. रोख व सन्मानचिन्ह),भारतीय जैन संघटना माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, वाघोली (द्वितीय- ३१ हजार रु. व सन्मानचिन्ह), दयानंद आर्य कन्या विद्यालय अँड जुनिअर कॉलेज, नागपूर, ता. जि. नागपूर आणि मातोश्री अकादमी द एक्सपेरीमेंटल स्कूल, तुकुम, चंद्रपूर (तृतीय – २१ हजार रु. व सन्मानचिन्ह) पारितोषिके वितरण अणू शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, अशोक जैन आणि डॉ. सुदर्शन आयंगार यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. आभारप्रदर्शन  चंद्रशेखर पाटील यांनी केले.

विशेष पुरस्काराने सन्मान झालेल्या शाळा

मातोश्री माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय, तुकुम, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, के ई एस कन्या शाळा, पांढरकवडा, ता. पांढरकवडा, जि. यवतमाळ बारी समाज माध्यमिक विद्यालय, शिरसोली, ता. जि. जळगाव. श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, कोल्हेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालय, फेस, ता. शहादा, जि. नंदुरबार जनता हायस्कुल, साकरी, ता. भुसावळ, जि. जळगाव श्री रामेश्वर विद्यालय, वारी, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर, पडेल, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग वाय. एम. खान उर्दू हायस्कुल, भडगाव, ता. भडगाव, जि. जळगाव. श्री शारदा मंदिर कन्या प्रशाला, संभाजीनगर, ता. जि. संभाजीनगर. राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय, कुल्हे-पानाचे, ता. भुसावळ, जि. जळगाव. वल्लभ विद्या मंदिर, पाडळदा, ता. शहादा, जि. नंदुरबार, आत्मा मलिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण, ता. कोपरगाव, जि. अहमदनगर, नरके’ज पन्हाळा पब्लिक स्कुल व ज्यू. कॉलेज, पन्हाळा, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, प. न. लुंकड कन्या शाळा, जळगाव, ता. जि. जळगाव. जीवन विकास विद्यालय, देवग्राम, ता. नरखेड, जि.- नागपुर न. ह. रांका हायस्कूल व कनिष्ठ महविद्यालय, बोदवड, ता. बोदवड, जि. जळगाव. कृषक विद्यालय, कोटगाव, ता. नागभीड, जि. चंद्रपूर, शिवाजी विद्यालय, अंचरवाडी, ता. चिखली, जि. बुलडाणा. चंद्रकांत बाबुराव जाधव विद्यालय, शेरेवाडी, ता. जि. सातारा नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व जुनियर कॉलेज, जळगाव, ता. जि. जळगाव. श्री. मारवाडी राजस्थान विद्यालय, लातूर, ता. जि. लातूर. महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, पारस, ता. बाळापूर, जि. अकोला कै. पी. के. शिंदे माध्यमिक विदयालय, पाचोरा, ता. पाचोरा, जि. जळगाव. श्री तुळजा भवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तुळजापूर, ता. जि. धाराशिव पी. आर. हायस्कूल, धरणगाव, ता. धरणगाव, जि. जळगाव मातोश्री उच्च प्राथमिक शाळा, तुकुम, चंद्रपूर ता. जि. चंद्रपूर, सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालय, ऐनपूर, ता. रावेर, जि. जळगाव, रॉयल पब्लिक स्कुल, भंडारा, ता. जि. भंडारा या शाळां पैकी प्रातिनिधीक २० शाळांचा विशेष सन्मानचिन्हाने सन्मान केला गेला.

महादेवभाई बहुआयामी व्यक्तीत्व – डॉ. प्रभा रविशंकर

जळगाव दि.१८ (प्रतिनिधी) – परिपूर्ण सेक्रेटरी कसा असावा याचे आदर्श उदाहरण बघायचे झाले तर ते महात्मा गांधीजींचे सेक्रेटरी महादेवभाई देसाई यांचे घेता येईल. थोर विचारवंत, लेखक व प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक महादेव देसाई हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सोबत आयुष्यभर सावलीसारखे राहिले. या २५ वर्षांच्या काळात त्यांनी लेखन केलेल्या डायरीतून महात्मा गांधींच्या जीवनातील महत्त्वाच्या नोंदी, भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख घटनांबाबत संदर्भ आजही बघायला मिळतात याबाबतची माहिती एस.एन.डी.टी युनिव्हर्सिटीच्या इतिसाहाच्या प्रोफेसर तथा जीआरएफ रेसिडेंशिअल फेलो डॉ. प्रभा रविशंकर यांनी उपस्थितांना सांगितली.  ‘महादेव देसाई अ कंप्लेट सेक्रेटरीयट’ या विषयावर त्यांनी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाउंडेशनचे डॉ. सुदर्शन आयंगार, अंबिका जैन आणि डीन डॉ. गीता धर्मपाल यांची उपस्थिती होती. आरंभी डॉ. प्रभा रविशंकर यांचे स्वागत करण्यात आले. त्यांचा परिचय गीता धर्मपाल यांनी करून दिला.

डॉ. प्रभा यांनी महादेवभाई देसाई यांच्याबाबत सांगितले की, त्यांचे बहुआयामी व्यक्तीत्व होते. त्यांचे हस्ताक्षर सुंदर होते, भाषेवर प्रभुत्व होते ते चांगले भाषांतरकार होते. त्यांच्या लेखनात फारच अचूकता असे, इतकी अचूकता स्वल्पविरामाची चूक होत नसे. महात्मा गांधीजी आणि त्यांच्या संबंधाबाबत अनेक प्रसंगही त्यांनी श्रोत्यांसमोर सांगितले. १९१७ ते १९४२ अशी २५ वर्षे त्यांनी महात्मा गांधीजींची समर्पित सेवा केली. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान कसे महत्त्वपूर्ण होते याबाबतचा त्यांचा पैलू त्यांनी सांगितला.

चंपारण सत्याग्रहाचा प्रसंग आणि पुरीच्या जगन्नाथ मंदिरात महादेवभाई देसाईंनी जाणे या दोन कारणांमुळे झालेले त्यांच्यातील मनमुटाव या प्रसंगाबाबतही त्यांनी उपस्थितांना सांगितले. महादेवभाई एक मल्टी टॅलेंट व्यक्तीमत्व होते. ते मुगल गार्डन मधील एक गुलाब होय असे वर्णन करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपले समाधान करून घेतले. यावेळी नाट्यकर्मी रमेश भोळे, डॉ. प्रभा यांचे पती रविशंकर, गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी, पीडी, पीजी डिप्लोमाचे विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी डॉ. सुदर्शन आयंगार यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मिश्रा यांनी केले.

गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगितेचे राज्यस्तरीय पारितोषिक वितरण

जळगाव- येथील गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा प्रतियोगितेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा शनिवार दि. २० जुलै २०२४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिकचे सरचिटणीस ऍड. नितीन ठाकरे, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त व गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन आयंगार व गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. जळगाव शहरातील शिक्षक, पालक व स्वच्छताप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशनने मागील वर्षी गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता मूल्याची रुजुवात व्हावी तसेच समाजात स्वच्छता विषयाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत सहभागी शाळांनी वर्षभर कोणते उपक्रम राबवावे याबाबत एक मार्गदर्शिका देण्यात आली होती. विद्यार्थी, शिक्षक, पालक व समाजाचा सहभाग तसेच राबविलेल्या उपक्रमांची परिणामकारकता, सातत्य यावर मूल्यांकन करण्यात आले होते.

महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यातील ८० तालुक्यातील १६३ शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. नोव्हेंबर व फेब्रुवारी महिन्यातील स्वयंमूल्यांकनावर आधारित अहमदनगर, अकोला, बीड, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धाराशिव, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदुरबार, पुणे, रत्नागिरी, संभाजीनगर, सातारा, सिंधुदुर्ग, यवतमाळ या १९ जिल्ह्यातील २९ तालुक्यातील ४१ शाळांची अंतिम मूल्यांकनासाठी निवड करण्यात आली. या सर्व शाळांना गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या टीमने प्रत्यक्ष भेट दिली.
जैन हिल्सवरील गांधी तीर्थाच्या कस्तुरबा सभागृहात दुपारी ३ वाजता हा सोहळा होणार आहे. या स्पर्धेत राज्यस्तरावरील प्रथम पुरस्कार प्राप्त शाळेस रु. एक लाखाचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कारप्राप्त शाळेस रु. एकावन्न हजार, एकतीस हजार व एकवीस हजार रोख व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच अंतिम मूल्यांकनासाठी पात्र ठरलेल्या शाळांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

गांधी रिसर्च फाउंडेशन संचलीत शाश्वत ग्रामीण पुनर्रचना

जळगाव दि. १७ (प्रतिनिधी) – ‘महात्मा गांधीजींचे मूल्य जीवनात अनुसरा, सत्य, निष्ठा आणि परिश्रम यावर विश्वास ठेवा आणि ग्राम विकासात आपले मोलाचे योगदान करा.’ असे आवाहन प्रो. लीला वसारिया यांनी विद्यार्थ्यांना केले. गांधी रिसर्च फाउंडेशन संचलीत शाश्वत ग्रामीण पुनर्रचना विषयावर पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमास आज जैन हिल्स येथे एका छोटेखानी कार्यक्रमात आरंभ झाला. त्यावेळी त्या उद्घाटक म्हणून उपस्थितांशी संवाद साधत होत्या. या प्रसंगी व्यासपीठावर अशोक भार्गव, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुदर्शन आयंगार आणि सौ. अंबिका जैन उपस्थित होते.

गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी अनिलेश जगदाळे यांनी साने गुरुजींची रचना ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे…’ सादर केली. या अभ्यासक्रम आरंभ उद्घाटन आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. सामान्यपणे पाहुणे व मान्यवरांच्याहस्ते एक समयी प्रज्ज्वलीत करण्याची रिती आहे. पाहुण्यांसह या अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हातात दीपक देण्यात आला होता व ज्योतीने ज्योत पेटवून अनेक दिवे प्रज्ज्वलीत झाले. यावेळी ‘ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो…’ या गाण्याचे मंद स्वर भारलेले वातावरण निर्माण करून गेले. आरंभी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाबाबतची पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे डॉ. आश्विन झाला यांनी माहिती देऊन संस्थेचा परिचय करून दिला.

कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे अशोक भार्गव यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला. प्रगती साध्य करणाऱ्या जपानच्या कौटुंबीक आणि एकटेपणाने जगणाऱ्यांच्या समस्या सांगितल्या. कामाच्या तणावात तरुण लग्न न करता एकटे राहणे पसंत करतात व त्यामुळे त्यांच्या लोकसंख्येवर विपरीत परिणाम होत आहे एका वेगळ्याच प्रश्नांना जपान सामोरी जात आहे. अशा वेळी महात्मा गांधीजींचे तत्त्व उपयुक्त ठरतात असे सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञान व अनुभवाचा सुयोग्य वापर करून प्रगतीमध्ये आपला वाटा उचलावा असे सांगितले. भार्गव यांनी त्यांच्या सुमधूर आवाजात ‘आसमां पे हे खुदा और जमी पे हम….’ आजच्या परिस्थितीचे वास्तव सांगणारे गाणे म्हटले. यावेळी सुदर्शन आयंगार आणि अंबिका जैन यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक मिश्रा यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांसह गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी उपस्थित होते.

शिक्षणाद्वारे स्वस्थ व सुसंस्कृत समाज निर्मितीचे आव्हान!

जळगाव दि.१६ प्रतिनिधी –  मुलांचे भविष्य घडविण्याच्या प्रयत्नात त्यांचे वर्तमानातील बालपण आपण हरवित आहोत. सामाजिकस्तरावर स्थैर्य न ठेवता सरकार, समाज आणि शिक्षणातील बाजारीकरणामुळे सर्वच जण अस्वस्थ आहेत. शिक्षक, विद्यार्थी, संस्थाचालक, पालक सर्वच जण वैचारिकदृष्ट्या तणावात आहेत. त्यामुळे शिक्षणाकडे फक्त नोकरी, व्यवसाय किंवा उत्पन्नाचे साधन म्हणून न पाहता चारित्र्यशील आणि कुशल समाजाची निर्मितीचे साधन म्हणून शिक्षणाकडे बघितले पाहिजे. शिक्षणाद्वारे स्वस्थ व सुसंस्कृत समाज निर्मितीचे आव्हान आपल्या समोर असल्याचा सूर उमटला. त्यावर उपाय हा की, प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे त्यादृष्टीने ज्यानेत्याने महत्त्वाची भूमिका निभवावी, असे विचार गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘भारत में शिक्षा की चुनौतियाँ’ या विषयावरील चर्चासत्रात मान्यवरांनी व्यक्त केले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कस्तूरबा सभागृहात झालेल्या चर्चासत्रात तरुण शांती सेनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अशोक भार्गव, गुजरात इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्चचे माजी संचालक डॉ. लीला वसारिया, सेंटर ऑफ एक्सलन्स इन टीचर एज्युकेशनचे व्याख्याता डॉ. विकास मणियार व हॅडलबर्ग विद्यापीठ जर्मनीच्या माजी इतिहास विभाग प्रमुख डॉ. गीता धर्मपाल सहभागी झालेत. चर्चासत्राचे संचालन गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन अयंगार यांनी केले. शहरातील संस्थाचालक, शिक्षक, विद्यार्थी, पालकांनी खुल्या चर्चासत्रात प्रश्नोत्तराद्वारे सहभाग घेतला.

डॉ. लीला वसारिया यांनी मुलींचे शिक्षण व रोजगाराची निर्मितीतील त्यांचे स्थान यावर  भाष्य केले. २१ ते २८ वयोगटातील मुलींना रोजगाराच्या दृष्टीने शिक्षण मिळत नाही आणि शिक्षण मिळाले तरी कौटुंबिक जबाबदारांमुळे त्याचा उपयोग पाहिजे तेवढा करता येत नाही. अशोक भार्गव यांनी सांगितले की, मुलं हे नैसर्गिकदृष्ट्या शिकतात. त्यांचा मेंदू हा प्रत्येक गोष्ट  आत्मसात करत असतो. परंतु बालपणातच आपण त्यांच्यातील कुतुहल, प्रयोगशीलता, सृजनशिलता ह्या तीन गोष्टी हिरावून घेतो. त्यामुळे अवघा दोन टक्के समाज हा सृजनशील आणि सक्षम बनू शकतो. मिरर न्यूरॉन आणि महात्मा गांधी न्यूरॉन या दोन संकल्पनाही त्यांनी सोदाहरण सांगितल्या. डॉ. विकास मणियार म्हणाले, शिक्षणाचा कोणाला फायदा होतो, त्याचा उद्देश काय, शिक्षण देणारं कोण आहे या तीन प्रश्नांचा आधार घेत आजच्या शिक्षण व्यवस्थेतील राजकारण त्यांनी सांगितले. यात सरकार, समाज आणि बाजार यावर निर्भर असलेल्या शिक्षण पद्धतीचा ऊहापोह ही त्यांनी केला. समाजात समानता निर्माण होणारे शिक्षण असावे असे ही ते म्हणाले.

प्रो. डॉ. गीता धरमपाल यांनी मुलांमध्ये आत्मविश्वास वाढविणारे शिक्षण हवे.  आध्यात्मिक, मानसिकदृष्ट्या सक्षम करणारे शिक्षण हेच खरे विकसीत शिक्षणाचे लक्षण आहे. भारतीय शिक्षण पद्धती आणि यूरोपीयन शिक्षण पद्धतीचा भेद त्यांनी उलगडून सांगितला. डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी तलाठी, ग्रामसेवक या पदासाठी पीएचडी धारकांचे अर्ज येणे  हे समाज स्वास्थाचे उदाहरण नव्हे असे सांगून शिक्षीत हे संस्कारशील असतीलच असे नाही तर अशिक्षीतसुद्धा संस्कारी असू शकतात. सूत्रसंचालन डॉ. अश्विन झाला यांनी केले. गिरीष कुळकर्णी यांनी आभार मानले.

डॉ. प्रभा रवि शंकर यांचे उद्या व्याख्यान – गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे कस्तूरबा सभागृह येथे उद्या दि. १८ जुलै रोजी संध्याकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान डॉ. प्रभा रवि शंकर यांचे व्याख्यान आजोजित केले आहे. महादेवभाई देसाई एक परिपूर्ण स्वीय सहाय्यक या विषयावर ते मार्गदर्शन करतील. महादेवभाई देसाई हे महात्मा गांधींचे स्वीय सचिव आणि जवळचे मदतनीस होते. १९१७ ते १९४२ अशी २५ वर्षे त्यांनी महात्मा गांधीजींची समर्पित सेवा केली. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. डॉ. प्रभा रवि शंकर या योगदानाविषयी आणि त्यांच्या आयुष्यातील बारीकसारीक पैलूंविषयी भाष्य करतील. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन यांनी केले.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version