जळगाव जिल्हा महिला क्रिकेट संघासाठी निवड चाचणी

जळगाव जिल्हा महिला क्रिकेट संघासाठी निवड चाचणी

जळगाव दि. 24 प्रतिनिधी –  जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आंतर जिल्हा महिला क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा महिला क्रिकेट संघ निवडीसाठी निवड चाचणीचे आयोजन शनिवार, दि. २७ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९.०० वाजता जैन स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर (विद्या इंग्लिश स्कूल D Mart जवळ) होणार आहे. ज्या महिला खेळाडूंचा जन्म १ सप्टेंबर २००३ रोजी वा त्यानंतर झाला आहे अश्या खेळाडू निवड चाचणीसाठी पात्र आहेत. अशा सर्व पात्र महिला खेळाडूंनी आपल्या मूळ जन्म दाखल्या व आधार कार्डसह उपस्थित रहावे. असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे व सहसचिव अविनाश लाठी यांनी कळविले आहे.

जैन हिल्स येथे जागतिक छायाचित्र दिवस साजरा

जळगाव दि. 19 – जैन हिल्स येथे जागतिक छायाचित्र दिन साजरा केला गेला. गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन, आर्टिस्ट विकास मल्हारा, विजय जैन व छायाचित्रकार राजेंद्र माळी यांच्या हस्ते कॅमेऱ्याचे प्रतिनिधीक पूजन करण्यात आले. या प्रसंगी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी देखील सर्व छायाचित्रकारांना शुभेच्छा दिल्या.

जागतिक छायाचित्र दिवसाच्या कार्यक्रमास राजेंद्र माळी, तुषार बुंदे, हिमांशू पटेल, निवृत्ती वाघ, किशोर कुळकर्णी, सुनील दांडगे, उदय महाजन, अशोक चौधरी, अनिल नाईक मुरलीधर बडगुजर आणि आर्टिस्ट विकास मल्हारा, विजय जैन, आनंद पाटील आदी उपस्थित होते.

जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्याहस्ते कॅमेरा पूजन करून जैन हिल्स येथे पहिल्यांदा जागतिक छायाचित्र दिवस साजरा करण्यात आला होता. जैन इरिगेशनचे विद्यमान चेअरमन अशोक जैन व जैन परिवाराने हा वारसा पुढे चालू ठेवलेला आहे. तेव्हापासून हा दिवस साजरा करण्याचा पायंडा पडला आहे. कंपनीतील सर्व छायाचित्रकार एकत्र येऊन मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करत असतात.

महत्त्वाच्या गोष्टी छायांकीत करण्यासाठी कॅमेरा अत्यंत उपयुक्त साधन आहे. जैन कंपनीच्या इतिहासात देखील विविध कॅमेऱ्यातून टिपलेले छायाचित्र जणू दस्तावेजाचे काम करत आहेत. कॅमेरा म्हणजे तिसऱ्या डोळ्याचे महत्त्व आजही अबाधित राहिलेले आहे. काळ बदलला अन् छायाचित्रणाची माध्यमेही बदलत गेली. रोलचा कॅमेरा, डिजिटल कॅमेरा ते मोबाईल अशा प्रवासाला सुरुवात झाली. या बदलत्‍या काळात छायाचित्र काढण्‍यासाठी कॅमेरा असायलाचं हवा असे नाही तर आज प्रत्‍येकांकडे आपला स्‍मार्टफोन आहे. त्‍याच्‍या एका क्‍लिकवर आपण छायाचित्र आपल्याकडे काढून घेऊ शकतो. जगभरातल्या छायाचित्रकारांना प्रेरणा देणारा दिवस असून त्या निमित्ताने उदय महाजन, विकास मल्हारा यांनी शुभेच्छा दिल्या.

‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ प्रदर्शनातून क्रांतिकारक इतिहासाचे स्मरण – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

जळगाव दि. 15 – गांधी रिसर्च फाऊंडेशन जिल्ह्यासाठी मानबिंदू असून फाऊंडेशनतर्फे समाजप्रबोधनात्मक सांस्कृतिक उपक्रम सदैव सुरू असतात. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधी उद्यान येथे स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आपल्या गौरवशाली, क्रांतिकारी इतिहासाची आठवण प्रदर्शन पाहिल्यानंतर होते. स्वातंत्र्याचा इतिहास चित्रस्वरूपात रोचकपध्दतीने मांडण्यात आला असून त्यात संविधान निर्मिती, संस्थाने विलगिकरणसह अन्य महत्त्वाच्या बाबी युवा पिढीला प्रेरक आहे. असे सांगत स्वातंत्र्याची गाथा समजून घेण्यासाठी जळगावकरांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. यावेळी महात्मा गांधी उद्यानातील ‘आय लव्ह जळगाव’ या सेल्फी पाँईटचेही उद्घाटन करण्यात आले.

महात्मा गांधी उद्यानातील गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे आयोजित ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’प्रदर्शनाच्या उद्धघाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत बोलत होते. याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन इरिगेशन सिस्टीम लि. अध्यक्ष अशोक जैन, केशवस्मृती प्रतिष्ठानचे भरतदादा अमळकर, विजय मोहरील, बी. डी. पाटील, ज्येष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, उदय पाटील, विराज कावडीया, अमित जगताप, राजेश नाईक, उदय महाजन, डाॕ. अश्विन झाला, नितीन चोपडा, आशिष भिरूड उपस्थित होते.
पुढे बोलताना अभिजीत राऊत म्हणाले, सर्वसामान्यांना स्वातंत्र्य आणि संविधानातील मुलभूत अधिकार व कर्तव्यांची वास्तविक जाणिव व्हावी जेणेकरून संविधानावर आधारित राष्ट्रनिर्मितीसाठी प्रोत्साहन मिळेल; यासाठी असे उपक्रम प्रेरणादायी असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले.

भारतावर ब्रिटिशांनी केलेल्या अन्याय अत्याचाराविरूध्द स्वातंत्र्य सैनिकांनी चळवळ, आंदोलनांच्या माध्यमातून प्रतिकार केला. वेगवेगळ्या ठिकाणांची स्वातंत्र्य सैनिकांची भुमिका ऐतिहासिक ठरली. त्याग, बलिदानातून भारताची शौर्य गाथा लिहली गेली. स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वपूर्ण घटनांवर आधारित ‘भारतीय स्वातंत्र्याची गाथा’ या प्रदर्शनात शिक्षणव्यवस्था, अर्थव्यवस्था,समाजव्यवस्था आणि मूल्यव्यवस्थेची समृद्ध परंपरा समजून घेता येते.
भारतातील संस्कृती, भौगोलिक विविधेतुन समृद्ध नैसर्गिक संपदा, प्रेम सहिष्णुतेची शिकवण यामुळेच भारत म्हणजे सोन्याची खाण असे म्हटले जायचे. प्रदर्शनात पहिले पॕनेल हे ‘भारत सोने की चिडीया’ हे भारतातील नैसर्गिक सौंदर्य, वास्तू, शिल्प यासह समृद्ध वारसा दर्शविते.
ऐतिहासिक स्थळे हा गौरवशाली इतिहास ते 1947 पर्यंत च्या स्वातंत्र्य संग्रामातील महत्वपूर्ण घटनांची माहिती, महात्मा गांधी आणि गांधी युगाव्दारे स्वातंत्र्यासाठी केलेले प्रयत्न, नेताजी सुभाषचंद्र बोस सह अन्य स्वातंत्र्यविरांच्या रचनात्मक भुमिका, यासह अनेक बाबींवर तथ्यांच्या आधारावर तपासून छायाचित्रांसह जळगावकरांना आपला गौरवशाली इतिहास अनुभवता येत आहे. या प्रदर्शनात स्वातंत्र्य अर्ध्या रात्रीच का मिळाले? असे अनेक रोचक प्रश्नाचे आकलन होते. भारतीय राष्ट्रध्वज, संविधान, स्वातंत्र्य संग्राम आणि संस्थांनाचे भारतात विलगीकरणातुन संयुक्त भारत अशी वस्तुनिष्ठ माहीती नागरिकांना मिळते.
भारतीय राष्ट्रध्वजाचा आरंभ कसा झाला त्याची निर्मिती प्रक्रिया, काळानुसार बदलेले राष्ट्रध्वजाचे स्वरूप हा इतिहास यातून उलगडा आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी संपूर्ण भारतातील राजे, राजवाडे, संस्थाने भारतात विलगिकरण कसे झाले, त्यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांची भुमिका अशी रोचक माहिती प्रदर्शनातुन नागरिकसमोर मांडली आहे. स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी संविधान कसे महत्त्वाचे आहे. सकारात्मक दृष्टिकोनातून राष्ट्रनिर्माण करण्यासाठी संविधानाची आवश्यकता, संविधान या संकल्पनेविषयी प्रदर्शनात माहिती आहे. प्रदर्शन यशस्वीतेसाठी योगेश संधानशिवे, अशोक चौधरी, सी. डी. पाटील, निवृत्ती वाघ यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी यांनी सहकार्य केले. डाॕ. अश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले.
शाळा, महाविद्यालयांसाठी अभ्याससहल
महात्मा गांधी उद्यानातील प्रदर्शन सकाळी 7 ते 10 तर संध्याकाळी 5 ते 10 दरम्यान सर्वांनसाठी खुले असेल. तसेच शाळा, महाविद्यालयांना विशेष गृपसह प्रदर्शनाला भेट देता येणार आहे. त्यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन व्यवस्थापनाची परवानगी घ्यावी लागेल. यासाठी निलेश पाटील मो.9404955300; 02572264803 यांच्याशी संपर्क करावा,असे कळविले आहे.
आय लव्ह जळगाव….
महात्मा गांधी उद्यानातील सौदंर्यामध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने ‘आय लव्ह जळगाव’ या सेल्फी पाँईट निर्मिती करण्यात आली आहे. या सेल्फी पाँईटचे लोकार्पण आज स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्याहस्ते करण्यात आले आहे.

कविवर्य ना.धों. महानोर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार प्रदान

जळगाव, दि. 13 : – आचार्य अत्रे हे साहित्य, नाट्य,  चित्रपट, उद्योग,  वक्तृत्व  असा सर्वच क्षेत्रांतील सार्वभौम उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नावाने मिळालेले मानचिन्ह मी कृतज्ञतेने स्विकारतो असे प्रतिपादन  कविवर्य ना. धों. महानोर यांनी  सत्काराला उत्तर देताना केले.
संयुक्त महाराष्ट्राचे झुंजार सेनापती, साहित्य सम्राट, आचार्य प्र. के. अत्रे यांच्या १२४ व्या जयंतीदिनी (१३ ऑगस्ट) आचार्य अत्रे मानचिन्हाचा पुरस्कार यावर्षी प्रख्यात कवी ना. धो. महानोर यांना प्रदान केला. ‘आत्रेय’ तर्फे हा पुरस्कार प्रदान समारंभ पहिल्याप्रथम मुंबई शिवाय खानदेशात जैन हिल्सला झाला.  व्यासपीठावर कविवर्य ना. धों. महानोर, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आ. शिरीष चौधरी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे उपस्थित होते.
आरंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. ‘आत्रेय’ संस्था तर्फे राजेंद्र  पै यांनी मान्यवरांचे स्वागत केले.  परिवर्तन संस्थेचे कलाकार वैशाली शिरसाळे, अक्षय गजभिये, सुदीप्ता सरकार  यांनी आचार्य अत्रे व बहिणाबाई चौधरी यांचे गीत सादर केले. ह्या सादरीकरण बद्दल शंभू पाटील यांनी सांगितले.  आचार्य अत्रे यांचे नातू अॅड. राजेंद्र पै यांनी प्रास्ताविक  केले.
माझे वडील शिक्षण मंत्री होते भूगोलाच्या पुस्तकात चूक झाली होती. अत्रे साहेबांनी त्यांच्या पेपर मध्ये खुलासा छापला ह्या बाबत आचार्य अत्रे यांची आठवण सांगितली. आमच्या वडिलांना अत्रे भाचेबुवा म्हणायचे त्यांचा स्नेह आम्हाला लाभला असे आ. शिरीष चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
कार्यक्रमात इंद्रायणी सावरकर  लिखित ‘महाराष्ट्राचा महासंग्राम’ पुस्तकाचं प्रकाशन कविवर्य महानोर यांच्या हस्ते करण्यात आले.
अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान झाल्यावर मनोगत व्यक्त केले. महानोर दादा म्हणजे निसर्ग, शेतकरी, रानातली कविता,  लोकसाहित्य, निसर्गाशी नाळ जोडून ठेवलेल्या महानोर दादा बद्दल त्यांनी गुणवैशिष्ट्ये सांगितले.  दादांना पानझड पुस्तकाला साहित्य अकादमी चा पुरस्कार मिळाला त्यावेळी मोठा सत्कार झाला होता.  त्यावेळी माझ्या वडिलांनी मिरवणुकीचि बैलगाडी चालवली होती दादांचा हा सत्कार म्हणजे भवरलालजी व महानोर दादा यांच्या मित्रत्वाचा सत्कार होय असे आवर्जून सांगितले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर भावे यांनी तर आभारप्रदर्शन राजेंद्र पै यांनी केले. मंजुषा भिडे यांनी म्हटलेल्या वंदे मातरम राष्ट्रगीताने झाला.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त रोषणाई ने उजळले महापुरुषांचे पुतळे, सजले चौक आणि उद्याने

लालबहादूर शास्त्री टॉवर, स्वातंत्र्य चौक, काव्यरत्नावली चौकसह महापुरूंषांच्या १९ पुतळ्यांसह, दोन उद्यांनाचा समावेश

जळगाव दि.13 प्रतिनिधी– स्वातंत्र्याचा इतिहास हा बलिदान आणि शौर्याचा आहे. स्वातंत्र्यविरांच्या पराक्रमाच्या या गाथेचे स्मरण करीत समतेसोबतच विश्वशांतीचा संदेश देणारी विशेष सजावट चौकांमध्ये करण्यात आली आहे. तिरंग्यातील शौर्य, शांती, त्यागाच्या तिनही रंगाच्या विद्युत रोषणाईने जळगाव शहर उजाळुन निघाले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे आकर्षक रंगसंगती असणारी विद्युत रोषणाई केली आहे. यात शहरातील राष्ट्रीय महापुरूषांच्या १९ पुतळ्यांसह, लालबहादूर शास्त्री टॉवर, स्वातंत्र्य चौक, काव्यरत्नावली चौक यासह महात्मा गांधी उद्यान, भाऊंचे उद्यान यांचा समावेश आहे. यातुन शहरवासियांच्या मनात राष्ट्राभिमानाचा जागर होत आहे.

जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे शहरातील चौकांवर विशेष सजावटींसह प्रबोधनात्मक संदेश दिले आहे. यातून राष्ट्रीय एकात्मेची जाणिव निर्माण होत आहे. काव्यरत्नावली चौकात विशेष सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोबतच लालबहादूर शास्त्री टॉवर, स्वातंत्र्य चौक याठिकाणीही विद्युत रोषणाईतुन राष्ट्रभक्तीचा जागर केला आहे.

महापुरूषांच्या पुतळ्यांवर रोषणाई

शहरातील १९ सार्वजनिक स्थळी असलेल्या राष्ट्रीय महापुरूषांच्या पुतळ्यांवर रोषणाई केली आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महाराणा प्रताप पुतळा, महात्मा गांधी पुतळा, पंडीत जवाहरलाल नेहरू पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लाल बहादूर शास्त्री पुतळा, नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा, स्वातंत्र्यविर वि. दा. सावरकर पुतळा, शाहिर अण्णाभाऊ साठे पुतळा,  सानेगुरूजी पुतळा, स्व. जेठमल स्वारस्वत स्तंभ, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, संत गाडगे बाबा पुतळा, धनाजी नाना पुतळा, महर्षी वाल्मीक पुतळा, कवयित्री बहिणाबाई पुतळा, संत जगनाडे महाराज पुतळा, नवल स्वामी महाराज पुतळा या पुतळ्यांवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्युत रोषणाई केली आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशन, मराठी प्रतिष्ठानच्या वतीने निमखेडी शिवारात वृक्षारोपण

जळगाव : निमखेडी शिवारातील राधिका पॉइंटजवळील खुल्या भूखंडामध्ये स्थानिक रहिवाशांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला. गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. च्या सहकार्यातून सुरू असलेल्या हरित जळगाव या उपक्रमांतर्गत निमखेडी शिवारातील गट नं. 111 मधील खुल्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील, हेमंत बेलसरे, जैन इरिगेशनचे देवेंद्र पाटील, राजेंद्र माळी, नगरसेवक मनोज चौधरी, नगरसेविका प्रतिभा पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक लक्ष्मण धांडे, अध्यक्ष सर्जेराव पाटील यांच्यासह स्थानिक रहिवाशी उपस्थित होते. यावेळी निंब, करंज, बकूळ, वड, पिंपळ, गुलमोहर, जास्वंद, कन्हेर, चांदणी, बेल अशी 100 च्यावर झाडांची लागवड केली. नितीन साठे, नरेंद्र रडे, संजय कापुरे, रामदास अत्तरदे, तुळशीराम निकम, विजया ठाकरे, शंकुतला भंगाळे, कल्पना धांडे, कल्पना सोनवणे, रजनी ठाकूर यांच्यासह नागरिकांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला. तसेच उत्कर्ष मतिमंद शाळेच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला. सुधीर पाटील यांनी जागतिक तापमान वाढ होत असल्याने संभाव्य धोके नागरिकांच्या लक्षात आणून देत वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. तर हेमंत बेलसरे यांनी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या उपक्रमाबाबत सांगितले. मनोज चौधरी व प्रतिभा पाटील यांनी रहिवाशांच्या मागणीनुसार अपेक्षा पुर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगत उपक्रमास पाठिंबा दिल्या. लक्ष्मण धांडे यांनी प्रास्ताविक केले. संजय कापुरे, सर्जेराव पाटील, शंकुतला भंगाळे यांनी मनोगत व्यक्त केले. वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा सुधीर पाटील यांनी दिली.

कविवर्य ना.धों. महानोर यांना आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार

जळगाव : संयुक्त महाराष्ट्राचे झुंजार सेनापती, साहित्य सम्राट, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या १२४ व्या जयंतीदिनी (१३ ऑगस्ट) आचार्य अत्रे मानचिन्हाचा पुरस्कार यावर्षी प्रख्यात कवी ना. धो. महानोर यांना प्रदान केला जाणार आहे. विशेष म्हणजे हा समारंभ खानदेशच्या मातीत जळगाव येथे १३ ऑगस्ट २०२२ रोजी कस्तुरबा सभागृह, गांधी तीर्थ, जळगाव येथे सायंकाळी ५.३० वाजता संपन्न होणार आहे.
आचार्य अत्रे यांचे निधन १३ जून १९६९ रोजी झाले. त्यानंतर १९७१ पासून २०२१ पर्यंत ‘साहित्यसम्राट आचार्य अत्रे मानचिन्ह पुरस्कार’ प्रदान करण्याचे कार्यक्रम मुंबईत आणि पुण्यात झाले. दिनांक १३ ऑगस्ट रोजी जळगावात होणारा हा पुरस्कार प्रदान समारंभ पहिल्याप्रथम खानदेशात होत आहे. आचार्य अत्रे यांचे खानदेशच्या मातीशी घनिष्ठ संबंध होते. प्रख्यात कवी बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याचे महाराष्ट्रभर कौतुक करण्याचे काम पहिल्याप्रथम आचार्य अत्रे यांनी केले. दैनिक मराठातून बहिणाबाईंच्या कवितांवरचा गाजलेला अग्रलेख आजही महाराष्ट्रात चर्चेत असतो. श्री. सोपानदेव चौधरी आचार्य अत्रे यांचे खास मित्र होते. याखेरिज आचार्य अत्रे यांच्या द्वितीय कन्या श्रीमती मिनाताई देशपांडे यांचा विवाह धुळे येथील प्रा. सुधाकर देशपांडे यांच्याशी झाल्यामुळे अत्रे कुटुंबीयांचा खानदेशची जवळचा संबंध आहे.
‘आत्रेय’ तर्फे अॅड. राजेंद्र पै यांनी जाहीर केला. ते आचार्य अत्रे यांचे नातू आहेत. हा कार्यक्रम मुंबईत न करता जळगाव येथेच करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्रख्यात उद्योगपती श्री. अशोकभाऊ भवरलाल जैन यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे. आमदार शिरीष मधुकरराव चौधरी हे या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खानदेशमध्ये होणाऱ्या आचार्य अत्रे जयंती समारंभाला उपस्थित राहावे, अशी विनंती अॅड. राजेंद्र पै यांनी केली आहे. या समारंभाला स्व. सुधाकर देशपांडे यांचे सुपुत्र अमेरिकेत असणारे अॅड. हर्षवर्धन देशपांडे हेसुद्धा उपस्थित राहून खानदेशच्या भूमिला अभिवादन करायला येणार आहेत.

जैन उद्योग समूहातर्फे होणार 8000 राष्ट्रध्वजाचे वितरण

जळगाव : स्वातंत्र्य लढ्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता दि.15 ऑगस्ट 2022 रोजी होत आहे. देशासाठी बलिदान करणाऱ्या देशभक्तांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण अंत:करणात कायम जागते राहावे आणि आपला भारत देश सर्वांगीणदृष्ट्या सुजलाम सुफलाम राहावा ही सर्वांचीच मनोभूमिका आहे. त्यासाठीच केंद्र सरकारने ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा करीत असताना 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ ही संकल्पना देशवासीयांसमोर मांडली आहे. प्रस्तुत संकल्पनेला जैन उद्योग समूहाच्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व जैन फार्म फ्रेश फूड्स लि. यांनी मातृभूमिच्या जाणिवेतून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जैन उद्योग समूहातर्फे 8000 सहकाऱ्यांना घरावर लावण्यासाठी  राष्ट्रध्वज वितरित करण्यात येणार आहे. घरावर राष्ट्रध्वज लावण्यासाठी जैन पाईप देखील सर्व सहकाऱ्यांना देण्यात येणार आहे.
15 ऑगस्टला कंपनीच्या सर्व आस्थापनांमध्ये ध्वजवंदनाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमानंतर सहकाऱ्यांसाठी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार असलेला ठेवा लक्षात रहावा म्हणून कंपनीत ठिकठिकाणी सेल्फी पॉइंटचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.
‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात जैन इरिगेशनचा प्रत्येक सहकारी हिरीरीने सहभागी होत आहे. यामुळे 8000 सहकाऱ्यांच्या घरावर राष्ट्रध्वज मोठ्या गौरवाने फडकणार असून राष्ट्रभावना प्रज्ज्वलित राहणार आहे.
राष्ट्रध्वजासह परिवाराचा फोटो – ध्वजारोहणामध्ये सहभागी सर्व सहकाऱ्यांनी आपल्या घरी राष्ट्रध्वजासोबत एकत्रित परिवाराचे छायाचित्र काढून ते व्यवस्थापनाकडे पाठवायचे आहे असे आवाहनसुद्धा सर्व सहकाऱ्यांना करण्यात आले आहे

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ‘भारत से जुडे रहो’ संवादात्मक कार्यक्रम

जळगाव – भारतात प्रतिभावान युवकांची संख्या सर्वात जास्त आहे. हिच प्रतिभा भारताला सामर्थ्यशाली बनवू शकते फक्त तरूणांच्या अवलोकन, विश्लेषण आणि परिश्रमातून नवसंकल्पनेला चालना देणाची गरज आहे. पुरक वातावरणातून ते शक्य आहे. माझ्या भारताला शक्तिशाली देश बनविण्यासाठी, देशाचा उत्कर्ष साध्य करण्यासाठी, युवकांनी चौकटीबाहेरचा विचार करून सर्वात आधी देश ही भावना संवेदनशील मनाने स्वीकारली पाहिजे; असे आवाहन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी केले.
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे क्रांती दिनाच्या 80 व्या जयंती व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘भारत से जुडे रहो’ हा संवादात्मक कार्यक्रमाप्रसंगी कुलगुरू बोलत होते. कस्तूरबा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक व जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, प्रमुख वक्ते म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, ज्येष्ठ गांधीयन व समाजसेवक प्रा. शेखर सोनाळकर आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रीसर्च डीन प्रो. गीता धर्मपाल हे उपस्थित होते.
गांधी रिसर्च फाऊंडेशनचे रिसर्च डीन प्रो. गीता धर्मपाल यांनी प्रास्ताविक केले. 9 ऑगस्ट 1942 ला महात्मा गांधीजींनी इंग्रजांना चले जाव, भारत छोडोचा नारा दिला. आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करित असतांना विदेशातील भारतीयांना भारत से जुडे रहा!  सांगण्याची गरज आहे. आपण विदेशात राहिलो व पुन्हा भारतात परत येऊन भारताशी स्वत: एकरूप करून घेतले याचा अभिमान असल्याचे सांगितले.
कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी वेगळ्यापद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद साधला देशाला समृद्ध शक्तीशाली बनविण्यासाठी ज्ञानाचे व्यवसायात, समाजाच्या कल्याणासाठी रूपांतर कसे करावे, यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. यासाठी छोट्या कल्पनांना मोठ्या प्रकल्पांमध्ये कसे परावर्तित करता येईल; यासाठी प्रयत्न करणे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जैन इरिगेशन होय, असेही कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी यांनी आवर्जून सांगितले.
दुसऱ्याचं वेगळेपण आपण स्वीकारले पाहिजे – प्रा. शेखर सोनाळकर
प्रा. शेखर सोनाळकर यांनी मुक्तपणे संवाद साधला. त्यात ते म्हणाले; भारत हा विविध परंपरा, भाषा, दैवत, संस्कृती, खाद्य पदार्थ इत्यादी भिन्न व वेगळेपणाचे आहेत. त्या वैविध्याचा आदरपुर्वक स्वीकारण करणे म्हणजे भारताशी स्वत: जोडून घेणे होय. प्रेम, अहिंसा, संवाद आणि विश्वास हे माणसाला जोडण्याचे काम करत असतात आणि यातून देशभावना, देशप्रेम, जाज्वल्य देशभक्ती जागृत होते. आनंद व्यक्ती जशी सुंदर दिसते तसे माणसे, समाज आणि देश आनंदीत बनवावे. प्रेम, आपलुकीच्या, करूणेच्या, संवेदनशीतेच्या, अहिंसेच्या आधारे आपल्या देशाला आपले म्हणायचे आणि या देशाला आपल्याशी जोडूनच ठेवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उपस्थित मान्यवरांनी उत्तरे दिली. अध्यक्षीय समारोप करतांना अशोक जैन यांनी भारताशी जोडून घेण्याआधी आपण कुटुंबाशी स्वत: ला जोडून घेतले आहे का? असा प्रश्न प्रत्येकाने मनात विचारला पाहिजे आणि तसे सकारात्मक वर्तन करायला हवे, जेणे करून आपण आपल्या देशाकडे कोणत्या नजरेने पाहतो हे समजते. याच भावनेवर भविष्याच्या दृष्टीने आर्थिकदृष्ट्या भारत महासत्ता होईल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
दीपप्रज्वलन व महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रशांत सूर्यवंशी यांनी प्रेरणा गित म्हटले. गिरीष कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. आभार सुधीर पाटील यांनी मानले. उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरास्वरूपात संवाद साधला. संबंधित कार्यक्रम गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या फेसबुक आणि युट्यूब https://m.youtube.com/watch?v=SFEBAByrLQ4  या अधिकृत लिंकवर बघता येईल.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जैन इरिगेशन व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे शहरात विद्युत रोषणाई

जळगाव दि.८ प्रतिनिधी- जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्ताने शहरात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. ९ आॕगस्ट म्हणजे ‘क्रांती’ दिनापासून ते १७ आॕगस्ट पर्यंत आकर्षक रंगसंगती असणारी विद्युत रोषणाई केली जाईल. यामध्ये शहरातील राष्ट्रीय महापुरूषांच्या १९ पुतळ्यांसह, महात्मा गांधी उद्यान, भाऊंचे उद्यान व लालबहादूर शास्त्री टाॕवर, स्वातंत्र्य चौक, काव्यरत्नावली चौक यांचा समावेश आहे.
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे शहरातील चौकांवर विशेष सजावटींसह प्रबोधनात्मक संदेश दिले जातात. यात सण-उत्सवांसह राष्ट्रीय एकात्मेची जाणिव निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश असतो. याच धर्तीवर काव्यरत्नावली चौकात विशेष सजावट व विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. सोबतच स्वातंत्र्य चौक, लालबहादूर शास्त्री टाॕवर याठिकाणीही विद्युत रोषणाईतुन राष्ट्रभक्तीचा जागर केला जाईल.

महापुरूषांच्या पुतळ्यांवर रोषणाई

शहरातील १९ सार्वजनिक स्थळी असलेल्या राष्ट्रीय महापुरूषांच्या पुतळ्यांवर रोषणाई करण्यात येईल. यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महाराणा प्रताप पुतळा, महात्मा गांधी पुतळा, पंडीत जवाहरलाल नेहरू पुतळा, डाॕ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लाल बहादूर शास्त्री पुतळा, नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा, स्वातंत्र्यविर वि. दा. सावरकर पुतळा, शाहिर अण्णाभाऊ साठे पुतळा, सानेगुरूजी पुतळा, स्व.जेठमल स्वारस्वत स्तंभ, महात्मा ज्योतिबा फुले पुतळा, संत गाडगे बाबा पुतळा, धनाजी नाना पुतळा, महर्षी वाल्मीक पुतळा, कवयित्री बहिणाबाई पुतळा, संत जगनाडे महाराज पुतळा, नवल स्वामी महाराज पुतळा या पुतळ्यांवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्युत रोषणाई केली जाईल.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version