गांधी तीर्थ येथे संजीवक शेती कार्यशाळा उत्साहात

गांधी रिसर्च फाउंडेशन व एमकेसीएलचा शेतकऱ्यांसाठी संयुक्त उपक्रम

जळगाव दि. ५- येथील गांधी तीर्थ येथे काल दि. ४ मे रोजी शेतऱ्यांसाठी ‘संजीवक शेती’ एक दिवसाची कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. या उपक्रमात जळगाव जिल्ह्यातील ४० शेतकरी सहभागी झाले होते. गांधी रिसर्च फाउंडेशन आणि महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमीटेड (MKCL) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजण्यात आला होता त्यात एमकेसीएलचे तज्ज्ञ डॉ सतीष करंडे व गजेंद्र कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाश्वत शेती, विषमुक्त शेती, हवामान आधारीत शेती, मिश्र पीक पद्धत, शेती पुरक व्यवसाय इ. विषयाचे मोलाचे मार्गदर्शन केले.

गांधी तीर्थ येथे संजीवक शेती कार्यशाळेत मार्गदर्शन करताना एमकेसीएलचे तज्ज्ञ डॉ सतीष करंडे व उपस्थित शेतकरी.

या कार्यक्रमाची सुरुवात संत तुकडोजी महाराज यांच्या भजनाने झाली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन व सुतीहार अर्पण करण्यात आले. जळगावला केळीचे आगार म्हटले जाते तर येथे कापसाचे पीक शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत असतात. यासोबतच सोयाबीन, उडीद, मूग ही मिश्रपिके ही घेऊ लागला आहे. ही पिके घेण्यामागे थोड्या महिन्यांच्या अवधीत दोन पैसे मिळतील हा मुख्य उद्देश असतो. शाश्वत परवडणारी शेती करायची असेल तर शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, उच्च कृषितंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असून संजीवक शेतीचा स्वीकार देखील करावा. आपल्या शेतात असलेल्या पिकाच्या ओळीमधील जागेचा सुयोग्य वापर व्हावा. ही पद्धत वापरल्याने मधल्या जागेत तणांची वाढ कमीत कमी होऊन जमीन स्वच्छ ठेवता यावी असे काही महत्त्वाचे बदल आपल्या शेतात करावे लागतात. पावसाच्या अनिश्चिततेचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. कधी जास्त तर कधी पाऊसच पडत नाही. अशा वेळी संजीवक शेती महत्त्वाची ठरते असे मार्गदर्शन तज्ज्ञांनी केले.

संजीवक शेती – बाजारपेठांच्या वाढत्या मागणी पूर्ण करण्यासाठी वारेमाप खते, कीटकनाशके, पाणी वापरले जाते त्यामुळे त्या दुष्परिणाम शेतीवर होत असतो. अशा वेळी शेती न परवडणारी ठरते हीच शेती शाश्वत करण्यासाठी संजीवक शेती मोलाची ठरू शकते. आपल्या शेतातील मातीचा दर्जा सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच प्रयत्न करावे लागणार आहेत. संजीवक मध्ये शेण, गोमूत्र, गूळ, पाणी ह्याचा वापर होतो. ह्यालापण १० दिवस ठेवून नंतर पाण्यात मिश्रण करून वापरात आणण्यात येते. पंचगव्य करताना शेणखत, गोमूत्र दही, दूध, नारळाचे पाणी, गूळ, केळी, पाणी ह्याचा वापर करण्यात येतो. ह्यालाही ७ दिवसाची प्रक्रिया आहे. पाण्यामधून शेतीला देता येते व त्याचा चांगला परिणाम शेतकऱ्यांना दिसतो. याबाबत एमकेसीएलच्या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे समन्वयक उदय महाजन, ज्येष्ठ कृषितज्ज्ञ बी.डी. जडे, शेती विभागाचे वरिष्ठ अधिकारी संजय सोनजे उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन गांधी रिसर्च फाउंडेशनचे सुधीर पाटील यांनी तर प्रास्ताविक डॉ. अश्वीन झाला यांनी आणि आभार प्रदर्शन प्रशांत सूर्यवंशी यांनी केले.

दोन दिवसीय गांधी विचार संस्कार परीक्षा परिसंवाद संपन्न

‘सत्य’ जाणून घेण्यासाठी प्रयोग करणे आवश्यक – बरूण मित्रा

जळगाव दि.२८ महात्मा गांधीजींनी आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत अनेक प्रयोग केले. त्यातून समजून घेणे व सत्य स्वीकारले. मुलांमधील जिज्ञासा वाढीस लागून त्यासाठी विविध प्रयोग करण्याची सवय शिक्षकांनी आपल्या कृतीतून लावली पाहिजे, असे प्रतिपादन शाश्वत विकासाचे प्रणेते बरुण मित्रा यांनी केले.

गांधी विचार संस्कार परीक्षा परिसंवादाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या डॉ. गीता धर्मपाल, डॉ. अश्विन झाला, उदय महाजन व गिरीश कुळकर्णी उपस्थित होते. आपल्या मनोगतात बरूण मित्रा पुढे म्हणाले कि, देशातील तरुणाई हि संधी का? आपत्ती ठरणार हे शिक्षकांवर अवलंबून आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना हाताने काम करण्याची व श्रम प्रतिष्ठेची आवश्यकता आहे. आयुष्यभर चालणारी शिक्षणाची प्रक्रिया आनंददायी कशी होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. असे आवाहन त्यांनी केले. त्याद्वारेच देशात अपेक्षित बदल अनुभवता येईल असेही ते म्हणाले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे मागील १६ वर्षांपासून गांधी विचार संस्कार परीक्षा घेतली जाते. आजपर्यंत २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या प्रातिनिधिक समन्वयकांसाठी दोन दिवसीय परिसंवादाचे आयोजन गांधी तीर्थ येथे करण्यात आले होते. १६ जिल्ह्यातील ४० परीक्षा समन्वयकांनी यात सहभाग घेतला.

डॉ. गीता धर्मपाल यांनी आपल्या मनोगतात भारताला विश्वगुरुपदी विराजमान करण्यासाठी महात्मा गांधीजींच्या विचारांना प्रत्यक्षात कृतीत आणण्याची आवश्यकता विविध उदाहरणाद्वारे प्रतिपादित केली. तरुणाई हि भारताची संपत्ती असून तिला योग्य दिशा देण्याचे काम शिक्षक प्रभावीपणे करु शकतात असेही त्या म्हणाल्यात. कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. संदीप काळे, वर्षा अहिरराव, सिध्दराज भांदिर्गे, डॉ. बी. टी. शिंदे, जे. एस. महाजन, पूजा अलापुरीया आदींनी मनोगत व्यक्त केले. पाटस येथील बी. टी. शिंदे, लातूर येथील डॉ. संभाजी पाटील, सातारा येथील सिध्दराज भांदिर्गे, नंदुरबार येथील अविनाश सोनेरी, सत्रासेन चोपडाचे बी. एस. पवार व बारामती येथील शंकरराव माने यांचा विशेष गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

पहिल्या दिवशी सहभागी समन्वयकांना गांधी रिसर्च फाऊंडेशनची विस्ताराने माहिती देण्यात आली. त्यांना गांधी तीर्थ या म्युझियमसह विविध विभागांची माहितीही देण्यात आली. तसेच पीस गेमद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. गांधी विचार संस्कार परीक्षेच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणींवर परिसंवादात चर्चा करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वांनी पीस वॉकचा आनंद घेतला. आगामी काळातील नियोजनावर परिसंवादात चर्चा करण्यात आली. तसेच गांधी रिसर्च फाऊंडेशनसोबत करता येणाऱ्या विविध उपक्रमांवरही चर्चा करण्यात आली. चंद्रशेखर पाटील, विश्वजित पाटील, योगेश संधानशिवे, तुषार बुंदे, सुधीर पाटील, अशोक चौधरी, सविता महाकाल, सीमा तडवी व शुभांगी बडगुजर यांनी परिसंवादाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

जैन इरिगेशनचा सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टिटयूट सोबत एसटीजी तंत्र प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार

जळगाव, २६ एप्रिल २०२३:- जळगाव येथील सुप्रसिद्ध सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि कंपनीने आयसीएआरच्या सेंट्रल सिट्रस रिसर्च इन्स्टीट्यूट (नागपूर) बरोबर सामंजस्य करार केला. या करारानुसार कंपनीच्या सहकाऱ्यांना रोगमुक्त स्वीट ऑरेंज आणि इतर लिंबूवर्गीय फळे-मँडॅरीन, लिंबू आणि ग्रेफफ्रुट यांच्या रोपांच्या निर्मितीसाठी आवश्यक असे शूट टिप ग्राफ्टींग (एसटीजी) तंत्रज्ञान शिकविणे, त्यासंबंधी सल्ला-सेवा देवाण-घेवाण होणार आहे. विकसीत या तंत्रज्ञानामुळे सिट्रस ग्रीनिंग, ट्रीस्टझा, मोझेक आणि रिंग स्पॉट व्हायरस यासारख्या विषाणूंच्या आणि सूक्ष्म विषाणूंच्या रोगांपासून मातृवृक्ष (मदर ट्री) मुक्त असतात.

हे तंत्रज्ञान म्हणजे एक प्रकारचे ऊतीसंवर्धन तंत्र आहे. या तंत्रामध्ये रूटस्टॉक हे मातीमुक्त माध्यमात वाढवले जातात. त्याच्यावर अपिकल मेरीस्टेम ग्रंथींचे डोळे कलम केले जातात. यासाठी अपिकल ग्रंथींचा एक छोटासा भाग (०.१ ते०.२ एमएम) जो विषाणूमुक्त असतो त्यांचे रूटस्टॉक वर कलम केले जाते. यापासून तयार केलेले मातृवृक्ष हे बडस्टीक लावून पुनरुत्पादन केले जातात. असे मातृवृक्ष कोणताही रोग झालेला नाही अशी तपासणी केली जाते. शास्त्रज्ञ डॉ. एन. विजया कुमारी यांनी हे तंत्रज्ञान सीसीआरआयमध्ये विकसित केले असून या सामंजस्य करारावर त्यांनी स्वाक्षरी केली. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीतर्फे डॉ. अनिल ढाके यांनी स्वाक्षरी केली. यावेळी डॉ. बी. के. यादव, सीसीआरआयचे माजी संचालक डॉ. एम. एस. लदानिया व अन्य तज्ज्ञ उपस्थित होते.

मातृवृक्षाचे तत्वे व सातत्य असलेल्या जातींमध्ये वरील भाग हा लिंबूवर्गीय फळांचा भाग कलम केलेल्या रोपांंना दर्जेदार फळांचे उच्च उत्पादन करण्यासाठी सर्व प्रकारच्या रोगकारक जंतूंपासून मुक्त असला पाहिजे. हरितगृहात जैन टिश्यूकल्चर पार्कमध्ये जेएसओ १ ते ५ ह्या जैन स्वीट ऑरेंजच्या रोपांचे रोगमुक्त उत्पादन केले जाते. मातृवृक्ष संवेदनशील वातावरणात हरितगृहात ठेवले जातात आणि रोग-किडीचा उपद्रव टाळता येतो. मातीमुळे रोग-कीडी उद्भवू शकतात त्यामुळे ही रोपे माती विरहीत मीडियात रोगमुक्त वाढवली जातात.

ह्या एसटीजी तंत्रामुळे रोगमुक्त रोपांची निर्मिती करता येते कारण नवीन प्रजाती किंवा आयात केलेल्या प्रजाती रोपे स्वच्छ करता येतात. एवढेच नव्हे तर एखाद्या रोपाला चांगली दर्जेदार फळे येतात. पण ते रोगयुक्त असेल तर त्यालासुद्धा स्वच्छ करता येते. त्यानंतर ते मातृवृक्ष म्हणून काम करु शकते. हा दोन संस्थांचा सामंजस्य करार (एमओयु) संपूर्ण भारतभर निरोगी संत्राच्या आणि मँडारीनच्या फळबागा उभारण्यासाठी पब्लीक प्रायव्हेट पार्टनरशीप (पीपीपी) मजबूत करायला एक पाऊल पुढे पडले असल्याचे निदर्शनास येते.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. तर्फे डॉ. अनिल ढाके, डॉ. बी. के. यादव आणि सीसीआरआयचे माजी संचालक डॉ. एम. एस. लदानिया यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या. सीसीआरआय तर्फे संचालक डॉ. डी. के. घोष आणि डॉ. एन. विजयकुमारी, डॉ. ए. के. दास यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. सीसीआरआयचे सगळे शास्त्रज्ञ आणि इतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते. सीसीआरआयचे शास्त्रज्ञ जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या सहकाऱ्यांना ६ प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात येत्या १४ महिन्यात प्रशिक्षण देतील. संपूर्ण भारतात आत्तापर्यंत ६ लाखाहून अधिक जैन स्वीट ऑरेंजची लागवड ३००० एकरहून अधिक शेतजमिनीत उच्च घनदाट (युएचडीपी) पद्धतीने झालेली आहे व हे प्रमाण दिवसंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमिवर हा सामंजस्य करार ही जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.ची उत्तम लिंबूवर्गीय फळांच्या देशातील प्रक्रिया उद्योगासाठी वचनबद्धता दर्शवितो.

अनुभूती शाळेत ज्ञान प्रबोधिनीच्या विज्ञान शिबीराचा समारोप

विज्ञान आपल्या आसपासच, त्याचे निरीक्षण करा – जन्मजेय नेमाडे

जळगाव दि. 20 – विज्ञान हे आपल्या आसपासच असते. त्याचे निरीक्षण करून परिस्थितीची जाणिव करून संशोधनात्मक चांगले निष्कर्ष काढता येऊ शकतात. यासाठी पाचही ज्ञानेंद्रीयांचा जागृतपणे वापर केला पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी का, कुणासाठी, कोणते, कसे, केव्हा, कधी, कुठे अशा प्रश्नांची स्वतः उकल करण्यासाठी प्रेरीत झाले पाहिजे. अनुभूती इंग्लिश मिडीयअम सेकंडरी स्कूल येथे पुणे येथील ज्ञान प्रबोधिनी संस्था आयोजित तीन दिवसीय शिबीराचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा झाला, असे मनोगत जन्मजेय नेमाडे यांनी व्यक्त केले.


अनुभूती स्कूलमध्ये दि.18 ते 20 या दरम्यान सुरू असलेल्या विज्ञान शिबीराच्या समारोपाप्रसंगी जन्मजेय नेमाडे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत अनुभूती विद्यालयाच्या प्राचार्या रश्मी लाहोटी, ए. टी. झांबरे विद्यालयाचे शिक्षक महेंद्र नेमाडे, ज्ञान प्रबोधिनी संस्थेचे ओंकार बाणाईत, डॉ. विणाताई लिमये, अखिलेश कसबेकर, कल्पेश कोठाळे, सचिन सूर्यवंशी उपस्थित होते. ए. टी. झांबरे आणि अनुभूती इंग्लिश मिडीअम सेकंडरी स्कूलच्या 40 विद्यार्थ्यांनी या विज्ञान शिबीरात भाग घेतला. यामध्ये विज्ञानाच्या मुलभूत संकल्पना त्यावरील आधारित प्रतिकृती म्हणजे विविध मॉडेल विद्यार्थ्यांनी समजून घेत प्रत्यक्षात साकार केले. आवाजाची उत्पत्ती कशी होते. घरातील छोट्यात छोट्या वस्तूंपासून हवेतली जाळी कशी तयार होते. कागदापासून सॅटेलाईट बनविले. विद्यार्थ्यांना प्रश्न कौशल्य कृतिपुस्तिकेतून मार्गदर्शन करण्यात आले. कविता, गाणी, गोष्टी यातून विज्ञानाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. समारोपाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी आपला अनुभव सांगितला.
जैन इरिगेशन कंपनीचे वरिष्ठ सहकारी जन्मजेय नेमाडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ठिबक हे तंत्रज्ञान कसे तयार झाले याची गोष्ट सांगितली. यामध्ये एका शेतकऱ्याचा झाडांविषयी, रोपांविषयी, पिकांविषयी असलेली निरीक्षण भावना त्यांनी समजून सांगितली. यातून विज्ञानाची उकल होते हेही त्यांनी सोदाहरण स्पष्ट केले. मनुष्याला पाच ज्ञानेंद्रीय आहेत या ज्ञानेंद्रीयातून ज्या संवेदना आपल्याला समजतात. त्याच भावनेने समाजाकडे बघितले पाहिजे. आजूबाजूच्या परिसराचे, निसर्गाचे निरीक्षण केले पाहिजे यातून समाजाला दिशा देणारे संशोधन निर्माण होते. विद्यार्थ्यांनी फक्त पुस्तकी विज्ञानाच्या संकल्पाना समजून न घेता व्यावहारीक जीवनात त्याचा फायदा कसा होईल, यावर निरीक्षण केले पाहिजे. यासाठी जास्तीत जास्त स्वतःला प्रश्न विचारले पाहिजे. यातून सकारात्मक उत्तर मिळते; असेही जन्मेजय नेमाडे यांनी सांगितले.
प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी मनोगत व्यक्त करताना स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी नवनवीन संकल्पना घेऊन उपक्रम राबविले जात असतात. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने हे शिबीर आयोजीत केल्याचे रश्मी लाहोटी यांनी सांगितले. प्रण है.. या प्रार्थनेने शिबाराची सांगता झाली. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विणाताई लिमये यांनी केले. आभार ओंकार बाणाईत यांनी मानले.

https://tradingbuzz.in/wp-content/uploads/2023/04/VID-20230420-WA0021.mp4
https://tradingbuzz.in/wp-content/uploads/2023/04/VID-20230420-WA0020.mp4

राष्ट्रीय केळी दिवस उत्साहात साजरा
जैन इरिगेशनतर्फे विविध जनजागृती

जळगाव दि.१९ – जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जैन फार्मफ्रेश फूड्स लिमिटेड यांच्यातर्फे शहरातील भाऊंचे उद्यानाजवळ ‘राष्ट्रीय केळी दिवस’ साजरा करण्यात आला. केळीचे आरोग्यदृष्टीने असलेले अनन्य साधारण महत्त्व यावर विशेष जनजागृती करण्यात आली. यावेळी नागरिकांना ताजी पिकलेली केळी वाटप केली गेली. केळी फळातील पौष्टीक गुणधर्म या पॉकेट कार्डचे प्रकाशन प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्याहस्ते करण्यात येऊन ते नागरिकांना वाटप केले गेले. या दिनाचे औचित्य साधत काव्यरत्नावली चौकाची सजावट करण्यात आलेली असून भाऊंच्या उद्यानाशेजारी केळी बाबतचा सेल्फी पॉइंट देखील लावला गेला होता. यावेळी अनेकांनी आपले सेल्फी काढून घेऊन केळीचे आहारातील महत्त्व समजावून घेतले. अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा झालेला राष्ट्रीय केळी दिवस सर्वांच्या ध्यानात राहिला.


केळी हे फळ इतर फळापेक्षा किती अधिकचेअन्न घटक देते हे नमूद केले आहे. केळी ही नैसर्गिक वेस्टनात म्हणजे सालच्या आतमध्ये गर असल्यामुळे अत्यंत निर्जंतुक व शुद्ध फळ आहे अशी माहिती या प्रकाशीत पॉकेट कार्डमध्ये देण्यात आलेली आहे.
दरवर्षी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी राष्ट्रीय केळी दिवस म्हणून साजरा केला जातो. सर्व प्रथम २००९ मध्ये राष्ट्रीय केळी दिवस लंडनमध्ये साजरा करण्यात आला होता. यामध्ये केळी महोत्सव उपक्रम करण्यात आला होता. तेव्हापासून सर्व जगभर राष्ट्रीय केळी दिवस साजरा केला जात आहे. जळगाव जिल्हा म्हणजे केळीचे आगार होय. ठिबक सिंचनासारख्या अत्याधुनिक सिंचन प्रणालीचा, उच्च कृषितंत्रज्ञानाचा उपयोग करून येथील शेतकरी केळीचे सर्वोच्च उत्पादन घेतात. केळीचे महत्त्व अबाल वृद्धांना समजावे यासाठी राष्ट्रीय केळी दिवस खूप उपयुक्त ठरत असतो. केळी उत्पादन करणारे शेतकरी, व्यापारी यांना चांगला आर्थिक मोबला केळीतून मिळत असतो. त्यामुळे केळीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून केळी बागायतदारांनी केळी निर्यातीत मजल मारली आहे. जैन इरिगेशनने समाज भान ठेवून हा उपक्रम राबविणे ही देखील चांगली बाब असल्याचे प्रवीण महाजन यावेळी म्हणाले. जळगाव हे देशातील बनाना सिटी असल्याचा त्यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी कार्यक्रमास प्रवीण महाजन यांच्यासह नायब तहसीलदार अमित भोईटे, विशाल सोनवणे, उप जिल्हाधिकारी राहूल पाटील तसेच डॉ. सुरेश पाटील, एम.एन. महाजन, दिनेश चौधरी, सुरेश पाटील अभियंता, पी.एम. चौधरी, अॅड महिमा मिश्रा, डॉ. सुधीर भोंगळे, राजेश वाणी, अनिल कांकरिया, शीतळ साळी, सचिन जोशी, सुदामभाई पाटील, आर. डी. महाजन, जैन इरिगेशनचे केळीतज्ज्ञ के.बी. पाटील, मोहन चौधरी, शुभम पाटील, भास्कर काळे, गौरव पाटील, किशोर रवाळे, विकास मल्हारा, अनिल जोशी यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन दिवस साजरा

जळगाव, दि. १४ – जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये १४ एप्रिल २०२३ रोजी अग्रीशमन सेवा दिन साजरा करण्यात आला. १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबईच्या व्हिक्टोरीया डॉक पोर्ट ट्रस्ट येथे स्फोटक वाहून आणणाऱ्या जहाजाला आग लागली होती. ही आग प्रचंड अशी होती. ती विझविण्याचे कार्य सुरू होते. त्यावेळी मुंबई अग्नीशमन दलाचे ६६ जवान शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ संपूर्ण देशात भारत सरकारच्या आदेशानुसार अग्निशमन सेवा दिन व अग्निशमन सेवा सप्ताह पाळण्यात येतो. जैन फूड पार्क येथे अग्निशमन दिवस व सप्ताहाच्या निमित्ताने आग विझवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्य वापराबाबत प्रात्यक्षिकासह माहिती सादर केली जात आहे.


त्याकाळी आग विझविण्यासाठी धारातीर्थी पडलेल्या शहीद अग्निशमन जवानांना कंपनीच्या सहकाऱ्यांनी आयोजित कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी वरिष्ठ अधिकारी सुनील गुप्ता, जी.आर. पाटील, एस.बी. ठाकरे, वाय.जे. पाटील, फायर सेफ्टी विभागाचे सेफ्टी अधिकारी स्वप्निल चौधरी, अमोल पाटील, कैलास सैंदाणे, मनोज पाटील, प्रवीण पाटील, हेमकांत पाटील, सागर बागुल, गणेश मोरे, नितीन चौधरी, जितेंद्र पाटील, आशिष सुतार, महेंद्र पाटील, जे.जे. पाटील आदी सहकारी उपस्थित होते. या दिनाच्या औचित्याने आपल्या अवतीभवती ज्वलनशील पदार्थ असतील तर त्याच्या साठवणुकीचा, सुरक्षिततेचा आढावा व त्याबाबतचे अत्यावश्यक नियोजन करून ठेवावे जेणे करून कुठलाही अपघात अथवा अनिष्ठ घटना घडणार नाही याची काळजी घेण्याबाबत सांगण्यात आले. अपघात होऊ नयेत याबाबत घेतलेली खबरदारी या शहीद अग्निशमन जवानांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.

बुलढाण्याच्या इतिहासात पहिल्यांदा फिडे मानांकन राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन….

बुलढाणा अर्बन, बुलढाणा जिल्हा चेस सर्कल,  सहकार विद्या मंदिरच्या संयुक्त विद्यमाने होणार स्पर्धा …

ग्रँडमास्टर येणार मार्गदर्शनासाठी 

बुलढाना, येथील बुलढाणा जिल्ह्य चेस सर्कल,   बुलढाणा अर्बन तथा सहकार विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने बुलढाण्यात फिडे मानांकन राज्यस्तरीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.  सदर स्पर्धा ही 14 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान सहकार विद्या मंदिर सभागृह येथे घेण्यात येणार आहे.  अशी माहिती बुलढाणा अर्बनचे सीएमडी तथा आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांनी आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. ही पत्रकार परिषद बुलढाणा रेसिडेन्सी येथे 4 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता घेण्यात आली.पुढे माहिती देतांना डॉ. झंवर म्हणाले की,  बुलढाण्यात होणारी राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा 2023,  ही स्पर्धा बुलढाणा  व  ग्रामीण परिसरातील खेळाडूंना वाव मिळावा, प्रतिभावान  खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर सहज जाता यावे या उद्देशातून ठेवण्यात आलेली आहे.  सदर स्पर्धा ही अंडर 17 गटासाठी ठेवण्यात आलेली आहे.  या स्पर्धेकरिता प्रत्येक जिल्ह्यातून खेळाडूंची निवड होऊन दोन युवक  व  दोन युवती अशा खेळाडूंना या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी केले जाणार आहे.  या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची जन्मतारीख ही 01 जानेवारी 2006 च्या नंतरची असने आवश्यक आहे.  या स्पर्धेचे समितीचे अध्यक्षपदी डॉ सुकेश झंवर यांची निवड करण्यात आलेली आहे तर समितीच्या सचिव पदी अंकुश रक्ताडे (सहसचिव महाराष्ट्र बुध्दिबळ संघटना) यांची निवड करण्यात आलेली आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना प्रमाणपत्र व विजेत्या खेळाडूंना रोख बक्षीस, ट्रॉफी व प्रमाणपत्र दिली  जाणार आहे.  सदर स्पर्धेकरिता एकूण बक्षीस रोख रक्कम 36 हजार  ठेवण्यात आलेली आहे.  या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची राहण्याची मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे, तर जेवणाची व्यवस्था आयोजकाच्या वतीने नाममात्र शुल्कात करण्यात आलेली आहे.  तर खेळाडू सोबत येणाऱ्या पालकांना अतिशय माफक दरात राहण्याची जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये सकाळच्या चहा,  नाश्ता ,दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण याचा ही समावेश करण्यात आला आहे.  सदर स्पर्धा ही आठ फेऱ्यांमध्ये घेण्यात येणार आहे. प्रत्येक फेरी ही  60 मिनिट 30 सेकंद इनक्रीमेंट असणार आहे. सदरची स्पर्धा स्विस लिग पध्दतीने घेण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन 14 एप्रिल ला सकाळी दहा वाजता केले जाणार आहे तर बक्षीस वितरण 16 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता केले जाणार आहे तसेच इतर महितीकरिता ९४०५७७७७८४ वर संपर्क साधावा.स्पर्धेचा लाभ जास्तीत जास्त खेळाडूंनी घ्यावा असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आलेले आहे.

 ग्रँडमास्टर करणार मार्गदर्शन
 बुलढाण्यात घेण्यात येणाऱ्या या राज्यस्तरीय राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी मार्गदर्शन व मुख्य आकर्षण म्हणून ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे,  ग्रँडमास्टर स्वप्निल धोपाडे हे असणार आहे. तर या स्पर्धेकरीता अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनचे सल्लागार अशोक जैन तसेच महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष परिणय फुके , महाराष्ट्र बुद्धीबळ संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंच म्हणून कामगिरी केलेले प्रवीण ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे.  सदर स्पर्धेकरिता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यांना देखील आमंत्रित करण्यात आलेले आहे. 

 
राष्ट्रीय स्पर्धेसाठी होणार खेळाडूंची निवड…
 राज्यस्तरीय बुलढाणा येथे होत असलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या विजेत्या खेळाडूंची निवड ही राष्ट्रीय स्पर्धेसाठी केली जाणार आहे. सदर स्पर्धा ही मे महिन्यात 01 ते 09 मे दरम्यान पंजाब मध्ये घेतली जाणार आहे.

वसंतवाडी तांडा गावात विश्व बंजारा दिवस उत्साहात संपन्न


दि.8/4/2023 वसंतवाडी तांडा ता.जि. जळगांव या ठिकाणी गांधी रिसर्च फाऊंडेशन यांच्या माध्यमातून जागतीक बंजारा दिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला ज्यात व्यसनाधीनता, उच्च शिक्षण, उद्योग,रोजगार या विषयी जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात आला.


कार्यक्रमाची सुरुवात समाजाचे आराध्यदैवत संत श्री सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेला सूतिहार व पूजन करून वंदन करण्यात आले. त्यानंतर प्रोजेक्टर लाउन छोट्या पडद्यावर शाब्बास गण्या हा लघुपट दाखविण्यात आला. त्यातून दारू‌ मुळे कुटुंबातील सदस्यांना होनारा त्रास व शिक्षण सुधारणा याबाबत शुभम पवार या पी जी विद्यार्थीने विष्लेषण केले. लघुपट मधील सारांश व्यक्त केला.
शुभम पवार हे 3 महिन्यापासून व्यसनमुक्ती वर काम करीत आहेत यांनी ग्रामीण भागातील युवकांना संबोधित करीत दारू, गुटखा, खर्रा याच्या सेवना मुळे होणारे दुष्परिणाम यावर आधारित चित्रफित दाखवून जाणीव करून देण्यात आले. दारूमुळे कुटूंब उद्धवस्थ झाल्याचे उदाहरणे देखील देण्यात आले. त्याचबरोबर शिक्षणांपासून वंचित घटकांना सोबत घेऊन त्यांना देखील शिक्षणांच्या प्रवाहात सहभागी करून सुशिक्षित समाज निर्माण करावा असे ग्रामस्थांना समजवून सांगण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुर गिरासे यांनी केले. तर प्रास्ताविक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले.
प्रसंगी गजमल चव्हाण, फुलसिंग पवार,ज्ञानेश्वर चव्हाण,अरुण चव्हाण,बाल गोपाळ ,युवक मित्र, ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेत.

‘महाराष्ट्र बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ पुरस्काराने जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांचा सन्मान

ग्रॅड मास्टर अभिजीत कुंटे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन उत्साहात साजरा

जळगाव दि. ७ : महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीतर्फे जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना २०२३ चा ‘महाराष्ट्रातील बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी घेण्यात आलेल्या एकत्रितरित्या बुद्धिबळ स्पर्धेत जळगावची साक्षी शुक्ला हिने ग्रॅड मास्टर अभिजीत कुंटे यांच्यासोबत बरोबरी साधली.


जैन हिल्स च्या सुधिर बोस सभागृहात झालेल्या सोहळ्याप्रसंगी ध्यानचंद पुरस्कारार्थी व भारतीय बुद्धिबळ संघाचे प्रशिक्षक ग्रॅंड मास्टर अभिजीत कुंटे, जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्री. अतुल जैन, महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीचे मकरंद वेलणकर, संजय आढाव, राघव पठाडे, सुधीर भालेराव उपस्थीत होते. यासह महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी व बहुसंख्य खेळाडू यांची उपस्थिती याप्रसंगी होती. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात बुद्धिबळ प्रचार-प्रसाराच्या कार्याला अधोरेखित करून ‘महाराष्ट्रातील बुद्धिबळ प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व’ या पुरस्काराने श्री. अशोक जैन यांचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.
श्री. मकरंद वेलणकर यांनी पुरस्काराविषयी माहिती दिली. त्यात ते म्हणाले, बु्द्धिबळासाठी झटणाऱ्या, ज्यांच्या कार्याकडे बघून नवीन पिढीला प्रेरणा, स्फूर्ती मिळेल व बुद्धिबळ प्रसाराच्या कार्यात ही नवी पिढी त्यांचे योग्य योगदान द्यायला तयार होतील या उद्देशाने पुरस्कार सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. श्री. अभिजीत कुंटे यांनी बुद्धिबळमध्ये श्री. अशोक जैन यांच्या कार्याचा आढावा सांगितला. खेळ आणि खेळाडू मोठे झाले पाहिजे या एकाच ध्येयामुळे श्री. अशोक जैन यांनी काम केले आणि करित आहे. त्यासाठी कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता ते सतत कार्य करीत आहे. आमच्यासारख्या खेळाडूंच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहत आहेत. आज महाराष्ट्रात ११ पुरूष व ५ महिला ग्रॅंड मास्टर असून अनेक आंतरराष्ट्रीय पंच झाले आहेत. त्याचे श्रेय हे श्री. अशोक जैन यांनी केलेल्या पायाभूत कार्यात आहे असेही श्री. अभिजीत कुंटे म्हणाले.
पुरस्काराला उत्तर देताना श्री. अशोक जैन यांनी लहानपणाच्या बुद्धिबळातील आठवणींना उजाळा दिला. श्री. अभिजीत कुंटे ह्यांनी आपण बुद्धिबळामध्ये कार्य करावे असे सुचविले आणि त्यातूनच पुन्हा बुद्धिबळाकडे वळलो. महाराष्ट्रात चेसिंग स्कूल, चेस लिग सुरू करावे. जेणे करून या स्पर्धात्मक उपक्रमातून चांगल्या गुणवत्तेचे खेळाडू पुढे येतील. सर्वांनी मिळून खेळ वाढविला पाहिजे. आतापर्यंत महाराष्ट्रातील खेळाडूंनी सह्याद्री काबीज केला आहे. आता आपण हिमालयाच्या पायथ्याशी आहोत. तोही सर करावा. अशी ही अपेक्षा बुद्धिबळ प्रेरणा दिनानिमित्त आपल्या मनोगतात त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान ग्रॅंड मास्टर अभिजीत कुंटे यांनी निलेप पाटील, सानिया रफिक तडवी, तसीन रफिक तडवी, जयेश सपकाळे, दुर्वेश कोळी, साक्षी शुक्ला, आम्रपाली खरचाणे, आदिती अलाहीत, आरूष सरोदे, मुस्कान जैन, निधी जैन, धीरज मगरे, प्रकाश पाटील, जयेश निंबाळकर या खेळाडूंसोबत एकत्रीतरित्या (सायमन्स टेनिस) एकाच वेळी बुद्धिबळ खेळले. या स्पर्धेत साक्षी शुक्ला हिने ग्रॅड मास्टर अभिजीत कुंटे यांच्यासोबत बरोबरी साधली.
इंदोर येथील अखिल भारतीय स्तरावरील २००० आतील रेटिंग असलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत जळगावचे सानिया रफिक तडवी, तसीन रफिक तडवी यांनी यश प्राप्त केले. त्यामुळे त्यांचा श्री. अशोक जैन, श्री. अतुल जैन, श्री. अभिजीत कुंटे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्री. अतुल जैन, सचिव श्री. नंदलाल गादिया, उपाध्यक्ष फारूक शेख, सहसचिव शकिल देशपांडे, खजिनदार अरविंद देशपांडे, सदस्य तेजस तायडे, चंद्रशेखर देशमूख, प्रविण ठाकरे, रविंद्र धर्माधिकारी यांनी श्री. अशोक जैन यांचा सत्कार केला. संजय पाटील, प्रा. व्ही. डी. पाटील यांनीही श्री. अशोक जैन यांचा सत्कार केला.
सूत्रसंचालन नंदलाल गादिया यांनी केले. चंद्रशेखर देशमुख यांनी आभार मानले. नथ्यू सोमवंशी, सोमदत्त तिवारी, आकाश धनगर, संजय काटोले, अजित घारगे, जयेश बाविस्कर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

‘महाराष्ट्र बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ पुरस्काराने जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांचा आज गौरव

जळगाव दि. ६ : महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीतर्फे जगभरात प्रख्यात असलेल्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना २०२३ चा ‘महाराष्ट्रातील बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्व’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण उद्या. दि.७ एप्रिल २०२३ रोजी, जैन हिल्स येथे सकाळी १० वाजता होणार आहे.
बु्द्धिबळासाठी झटणाऱ्या, ज्यांच्या कार्याकडे बघून नवीन पिढीला प्रेरणा, स्फूर्ती मिळेल व बुद्धिबळ प्रसाराच्या कार्यात ही नवी पिढी त्यांचे योग्य योगदान द्यायला उद्युक्त होईल अशा बुद्धिबळ क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिंचा सन्मान करण्यासाठी ‘महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन’ दरवर्षी ४ एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. बुद्धिबळ प्रसाराल नाविन्याची जोड देणाऱ्या मंदार वेलणकरांच्या जन्मदिनी हा पुरस्कार सोहळा होत असतो. याची सुरवात २०१७ पासून झाली आहे.
महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणादिन समितीचे मकरंद वेलणकर, संदीप गोहाड, संजय आढाव, राघव पठाडे यांच्या समितीने सदर पुरस्कार अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष व जैन इरिगेशनचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांना देण्याचे जाहीर केले. स्वच्छ प्रतिमा, संघटन कौशल्य, सकारात्मक दृष्टिकोन तसेच सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे कौशल्य असलेल्या श्री. अशोक जैन यांनी महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी घेऊन आपल्या कुशल नेतृत्त्वाने महाराष्ट्रातील बुद्धिबळ क्षेत्राला एक वेगळी झळाळी मिळवून दिली. त्यामुळे हा पुरस्कार जाहिर करण्यात आला.


जैन हिल्स येथे शुक्रवार दि. ७ एप्रिल २०२३ रोजी, सकाळी १०.०० वाजता हा पुरस्कार महाराष्ट्राचे प्रथम ग्रँड मास्टर श्री. अभिजित कुंटे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्री. अतुल जैन, सचिव श्री नंदलाल गादिया यांच्यासह महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी व जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे पदाधिकारी व बहुसंख्य खेळाडू यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version