अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स  डे’ उत्साहात संपन्न

जळगाव दि. 10 (प्रतिनिधी) –  ‘कौटुंबिक मूल्ये: प्रेम, आदर आणि एकतेचा पाया’ या विषयावर अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. एकत्र येण्याची भावना, सामायिक मूल्यांचा स्वीकार करुन संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचे स्मरण केले गेले. अनुभूती शाळेची संस्कृती, सर्जनशीलतेसह नैतिकता विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांमधून दिसून आली.
भवरलालजी जैन यांच्या स्मृतींना समर्पित ‘फाउंडर्स डे’ च्या सुरवातीला अनुभुती बालनिकेतनच चिमुकल्यांनी सरस्वती वंदना सादर केली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. अनुभूतीच्या ॲम्पी थिएटर मध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ॲड. सुशील अत्रे, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन,  जैन परिवारातील जेष्ठ सदस्य गिमी फरहाद, अनुभूती स्कूलचे चेअरमन अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबासिस दास यांचे सह  सौ. ज्योती जैन, सौ. शोभना जैन, डॉ. भावना जैन, अंबिका जैन यांची उपस्थिती होती.
भारतीय सांस्कृतिक वारसा जपणारी आणि जागतिक दृष्टीवर आधारित अद्वितीय अशी अनुभूती निवासी शाळा आहे. यातील विद्यार्थ्यानी तबला, बासरी, गिटार या वाद्यांवर फ्युजन सादर केले. मान्यवरांच्या उपस्थितीत ‘अंकुरानुभूति’ व ‘संदेशानुभूति’ नियतकालिकाचे प्रकाशन झाले. त्यांच्या सोबत 2016 व  2018 चे विद्यार्थी उपस्थित होते. अनुभुती स्कुल ही शाळा नसुन एक कुटुंब आहे असे माजी विद्यार्थी आकांक्षा असनारे व तुषार कावरे यांनी मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना कला विभागातील विद्यार्थ्यांनी कौटुंबिक मुल्यावर सचित्र पेटिंग साकारले.
आरंभी म्युझिकल योग आणि संगीत यांचे उत्तम सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. गीत गायन आणि नृत्यामध्ये रुढीपरंपरा मानणा-या आजीला मनविणारी नाटिका जी कौटुंबिक मूल्यांची उलगडा करत होती. ती विद्यार्थ्यांनी सादर केली. नात्यातील प्रेम, भावना आणि विश्वास यातुन अधोरेखित झाले. शेतकरी कुटुंबातील कथा नाटिकेतुन सांगितले. त्यानंतर पारंपारिक नृत्य सादर करून एकात्मकतेचा जागर केला. याप्रसंगी अनुभुतीमधील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षक अभिनव चतुर्वेदी यांनी वार्षिक उपक्रमांविषयी सांगितले. प्राचार्य देबासिस दास यांनी आभार मानले. अनुभूती स्कूलचे विद्यार्थी अर्थव कांबळे, हीतेशी बनोथ, अरिन देशपांडे, अलेफिया शकिर, क्रीश संघवी, वरधिने अग्रवाल, अवियुक्त जैन यांनी सुत्रसंचालन केले.
हे विश्वच आपले कुटुंब – ॲड. सुशील अत्रे
आपले कुटुंब हे फक्त आजी आजोबा,आई वडील, भाऊ बहिण किंवा नातेवाईकांपुरते मर्यादित आपण केले आहे. मात्र संत ज्ञानेश्वर यांनी 12 व्या शतकात हे विश्वची माझे घर मानावे हा संस्कार दिला. वसुधैव कुटुंबकम ही आपली संस्कृती आहे. त्यानुसार आपले वर्तन असावे. पृथ्वीवरील प्रत्येक घटक म्हणजे पशु-पक्षी, फुलं-झाडं, पर्यावरणातील प्रत्येक भाग आपलं कुटुंब मानलं पाहिजे. कुटुंब आणि कुटुंबाचे मूल्य याबाबत प्राईस आणि व्हॅल्यु ही संकल्पना ॲड. सुशील अत्रे यांनी समजून सांगितले जी गोष्ट आपल्याकडे उपलब्ध नसते तीची किंमत त्याच वेळी समजते. घरातील आजी आजोबा, नाना नानी रक्ताच्या नातलगाकडून कौटुंबिक मूल्य पुढील पिढीला संस्कारीत करते.

 ‘स्मरण बहिणाईचे’ कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव दि. 2 प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ७३व्या पुण्यतिथी व लेवागणबोली दिना निमित्त बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अँण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्यामार्फत जुने जळगावातील रामपेठ, चौधरीवाडा, बहिणाई स्मृती संग्रहालय येथे कार्यक्रमाचे आयोजन येथे उद्या दि. ३ डिसेंबर ला सकाळी १० वाजता ‘स्मरण बहिणाईचे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी संजय चौधरी हे बहिणाईंची गाणी आणि कविता कशी सुचते, ती कशी वाचावी याविषयावर उपस्थितांशी संवाद साधतील. तसेच साहित्यिक प्राध्यापिका वंदना नेमाडे ह्या लेवागणबोलीचा गोडवा या विषयावर संबोधन करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षा ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती जैन असतील. या प्रसंगी ट्रस्टचे विश्वस्त, बहिणाबाईंच्या नातसून, पणतसून, चौधरी वाड्यातील बंधू-भगिनी, साहित्यिक तसेच विद्यार्थी-विद्यार्थींनी (ज्यांच्या अभ्यासक्रमात बहिणाईंची कविता समाविष्ट आहे) उपस्थित राहणार आहेत. याप्रंसगी उपस्थितीचे आवाहन ट्रस्टतर्फे समन्वयक अशोक चौधरी यांनी केले आहे.
*प्रमुख पाहुणे परिचय* –  श्री. संजय चौधरी हे मराठीत दीर्घकाळापासून काव्यलेखन करणारे एक महत्त्वाचे कवी आहेत. काव्य लेखनासोबतच त्यांना असलेली कवितेची जाण खूप महत्त्वाची आहे. आत्तापर्यंत ‘माझं इवलं हस्ताक्षर’ (राजहंस प्रकाशन, पुणे) आणि ‘कविताच माझी कबर’ ( ग्रंथाली प्रकाशन, मुंबई) हे दोन काव्यसंग्रह त्यांनी मराठी साहित्य सृष्टीला दिलेले आहेत. या दोन्ही संघांना मानाचे – महत्त्वाचे जवळजवळ पन्नास पुरस्कार आणि जाणकार समीक्षकांचे प्रेम लाभलेले आहे. चिंतनशील पद्धतीने गंभीर काव्यलेखन करणारा हा कवी मानवी अस्तित्व, जीवनाचा आणि जगण्यातील चढ- उतारांचा वेगवेगळ्या अंगाने शोध घेऊ पाहतो. ‘माझ्या वयाची कविता’ हीदेखील आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास भाग पाडते. वयासाठी केवळ आकडा महत्वाचा नसून भावनिक वय महत्त्वाचे आहे, असा विचार ही कविता आपल्यापुढे ठेवते.
प्राध्यापक डॉ. वंदना नेमाडे ह्या कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय, भुसावळ येथे सीनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांना कविता करण्याचा छंद असून त्यांच्या स्वलिखित १०० कविता आहेत.

२३ वा बालगंधर्व संगीत महोत्सव रंगणार जानेवारीमध्ये

जळगाव : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दि. ३ ते ५ जानेवारी २०२५ दरम्यान सायंकाळी ७ ते ११ या वेळेत छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात होणार आहे. या संगीत महोत्सवाचे यंदा आकर्षण युवा कलाकार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त दीपक चांदोरकर यांनी दिली.

बालगंधर्व संगीत महोत्सवाची माहिती देण्याबाबत शुक्रवार दि. २९ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. विवेकानंद कुलकर्णी, उपाध्यक्ष दीपिका चांदोरकर, विश्वस्त शरदचंद्र छापेकर, डॉ. अपर्णा भट, सचिव अरविंद देशपांडे व जैन इरिगेशनचे अनिल जोशी उपस्थित होते. चांदोरकर म्हणाले की, दि. ३ रोजी महोत्सवाचे उद्घाटन बंगळूर येथील रेश्मा भट व रमैया भट यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने होणार आहे.

आगग्रस्त परिवारास जैन उद्योग समूहाकडून मदत

जळगाव, दि.२८ (प्रतिनिधी)– महामार्ग लगतच्या खेडीतील डॉ आंबेडकर नगर व भोईवाडा या भागात दिनांक 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी घरात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चार घरे जळून खाक झाली होती.  त्या आगीत प्रिती निवृत्ती गाटे ,लिलाबाई भोई, मंगलाबाई चौधरी , विकास भोई यांचे संसार उपयोगी सामान कपडे धान्य जळून खाक झाले होते.

याबाबतीत जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या कडे मदतीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष्याचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी पाठपुरावा करून स्फोटातील गरीब कुटुंबियांना जैन उद्योग समुहाकडून घर संसार उपयोगी सामान द्यावे अशी विनंती करण्यात आली होती. त्याअनुषंगाने चार कुटुंबियांना संसार उपयोगी सामान संच देण्यात आले यावेळी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अनिल अडकमोल, जैन उद्योग समुहाचे अनिल जोशी , गायत्री सोनवणे, छोटू साबळे साधना गायकवाड, निलेश भालेराव, विकास भोई यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

महात्मा गांधींच्या जीवनप्रवासावर आधारित प्रदर्शनी

जळगाव दि.२७ प्रतिनिधी – येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनने बाल मोहन ते युवा मोहन या महात्मा गांधीजींच्या प्रेरणादायी जीवन प्रवासावर आधारित केलेली चारित्र्य निर्माण प्रदर्शनी व सापशिडी मूल्य संस्काराच्या दृष्टीने उपयुक्त असल्याचे मत शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. संविधान दिनाच्या औचित्याने आजपासून भाऊंच्या उद्यानात प्रदर्शनीचे उदघाटन नंदिनीबाई वामनराव मुलींच्या विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती चारुलता पाटील, सेवानिवृत्त कृषी अधिकारी दिलीप महाजन, वसुधा महाजन, रोहन फेगडे व आदित्य सोनवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कल्पक व नाविन्यपूर्ण पद्धतीने बनविलेले प्रदर्शन व सापशिडी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण करतील असा विश्वासही मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व मान्यवरांचे सुती हार देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षक व पालकांना, विद्यार्थ्यांना मूल्य संस्कार देण्यासाठी संस्थेच्यावतीने चारित्र्य निर्माण प्रदर्शनाची निर्मिती करण्यात आली आहे. यात सत्य, त्याग, समर्पण, कर्तव्य परायणता, बंधुभाव, क्षमाशीलता यासारख्या मूल्यांचा समावेश करण्यात आला आहे. महात्मा गांधीजींच्या जीवनातील प्रसंगांचा चित्रकथेच्या माध्यमातून या प्रदर्शनाची निर्मिती करण्यात आली आहे. याच जीवन मूल्यांवर आधारित सापशिडीचा खेळही तयार करण्यात आला आहे. दररोज संध्याकाळी ५ ते ९ वेळेत भाऊंच्या उद्यानात हे प्रदर्शन खुले राहणार असून जळगावकर नागरिकांनी व  शिक्षण संस्था चालकांनी आपल्या पाल्य, विद्यार्थ्यांसह या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

ज्या शैक्षणिक संस्थांना हि प्रदर्शनी व सापशिडीच्या माध्यमातून मूल्य संस्कार उपक्रम राबवावयाचा असेल त्यांनी गिरीश कुलकर्णी (समन्वयक, परीक्षा विभाग) यांचेशी संपर्क करावा असे कळविण्यात आले आहे. या प्रसंगी विश्वजित पाटील, सुरेश पाटील, मुकेश पाटील यांचेसह नागरिक उपस्थित होते.

निरमा विद्यापीठाच्या इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत पालवी जैन सर्वप्रथम


जळगाव दि.२५ प्रतिनिधी – गुजरात, अहमदाबाद स्थित निरमा युनिव्हर्सिटीत इंडस्ट्रिअल डिझाईन शाखेत शिक्षण घेणाऱ्या पालवी जैनला  विद्यापीठातर्फे २२ नोव्हेंबर रोजी झालेल्या ३३ व्या पदवीप्रदान सोहळ्यात गोल्ड मेडल प्रदान करण्यात आले.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) चे गुजरातचे कार्यकारी संचालक आणि राज्य प्रमुख संजीब कुमार बेहरा हे या समारंभाचे प्रमुख पाहुणे होते. निरमा विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. करसन पटेल यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.
शिक्षण सुरू असताना पालवीला आत्तापर्यंत इंडस्ट्रीत मानाच्या समजल्या जाणाऱ्या “इंडियाज बेस्ट डिझाईन स्टूडेंट” आणि क्यूरीयस यंग ब्लड अवॉर्ड”  सह अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून पालवी सध्या गुडगाव दिल्ली येथील डेली ऑब्जेक्ट या आस्थापनेत “इंडस्ट्रिअल डिझाईनर” या पदावर कार्यरत आहे. जैन इरिगेशच्या कलाविभागातील विजय जैन व सौ. नीलिमा जैन यांची पालवी कन्या असून तिच्यासह पालकांचेह कौतूक होत आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह मान्यवरांनी पालवीचे कौतुक करून तिच्या भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आहेत.

३४ व्या महाराष्ट्र राज्य सब-ज्युनियर तायक्वांडो स्पर्धेत पुण्याचे वर्चस्व

जळगाव दि.२४ प्रतिनिधी – जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २३ नोव्हेंबर २०२४ रोजी ३४ व्या महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर तथा दहावी पुमसे राज्यस्तरीय स्पर्धा जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत क्युरोगी या प्रकारात पुणे जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला तर रत्नागिरी जिल्ह्याने द्वितीय क्रमांक पटकावला व तृतीय क्रमांक अमरावती जिल्हा तर पुमसे याप्रकारात पालघर जिल्हा प्रथम क्रमांक, द्वितीय रत्नागिरी, तृतीय सब मुंबई यांनी पटकाविले. उत्कृष्ट खेळाडू म्हणून मुलांमध्ये ठाण्याचा शक्ती दाभाडे तर मुलींमध्ये दुर्वा गुरव विजयी ठरलेत.

या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून ५५० खेळाडूंनी यशस्वी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे उद्घाटन जैन इरिगेशनचे मीडिया प्रमुख अनिल जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे  अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे तसेच उपाध्यक्ष दुलीचद मेश्राम, कोषाध्यक्ष वेंकटेश करा तसेच जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे सचिव अजित घारगे, रविंद्र धर्माधिकारी, महेश घारगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

२८ विविध वजनी गटात झालेल्या स्पर्धेत यात १४ मुले व १४ मुली सुवर्णपदक विजेते यांची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी  महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

सुवर्णपदक विजेते खेळाडू मुले:  १) १६ किलो आतील सार्थक गमरे ( रत्नागिरी ) २) १८ किलो आतील श्लोक बांदल ( पुणे ) ३) २१ किलो आतील यथार्थ कांबे ( अमरावती ) ४) २३ किलो आतील रूद्र जाधव ( मुंबई ) ५) २५ किलो आतील ध्रुव वारूडकर ( अमरावती ) ६) २७ किलो आतील सोहम वडासकर ( अमरावती ) ७) २९ किलो आतील सोहम खामकर ( रत्नागिरी ) ८) ३२ किलो आतील ध्रुवराज शिंदे ( पुणे ) ९) ३५ किलो आतील शक्ती दाभाडे ( ठाणे ) १०) ३८ किलो आतील मंथन आंबेकर ( रत्नागिरी ) ११) ४१ किलो आतील आदित्य नाहक ( सब-मुंबई) १२) ४४ किलो आतील सार्थक कोलते ( छत्रपती संभाजी नगर) १३) ५० किलो आतील यश चौहान ( पुणे ) १४) ६० किलो आतील अर्थव मुरकुटे ( पुणे )

सुवर्णपदक विजेत्या मुली १) १४ किलो आतील प्रिशा कलवणकर ( मुंबई ) २) १६ किलो आतील अदिरा कुलकर्णी ( छत्रपती संभाजी नगर) ३) १८ किलो आतील अंतरा कश्यप ( मुंबई ) ४) २० किलो आतील दुर्वा गुरव ( मुंबई ) ५) २२ किलो आतील आर्या होले ( पुणे ) ६) २४ किलो आतील स्वाती भोसले ( अहिल्या नगर ) ७) २६ किलो आतील श्रिया पाडवे ( मुंबई ) ८) २९ किलो आतील सिद्धी मिसाळ ( बिड ) ९) ३२ किलो आतील स्वरा येवले ( पुणे ) १०) ३५ किलो आतील स्वाती जैस्वाल (रायगड) ११) ३८ किलो आतील नभा यावलकर ( अमरावती ) १२) ४१ किलो आतील अनन्या काळे (अमरावती) १३) ४७ किलो आतील ईश्वरी रोडे (अहिल्यानगर) १४) ५७ किलो आतील ज्ञानेश्वरी गाभने (अमरावती) या सर्व खेळाडूंची हरियाणा (पंचकुला ) येथे होणार असलेल्या ३८ व्या राष्ट्रीय सब ज्युनिअर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सर्व विजेत्यांचे तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, उपाध्यक्ष दुलीचंद मेश्राम, प्रविण बोरसे, निरज बोरसे, खजिनदार व्यंकटेश करा, सदस्य अजित घारगे, सतिष खेमसकर तसेच जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, ललित पाटील, सुरेश खैरनार, नरेंद्र महाजन, कृष्णकुमार तायडे, सौरभ चौबे, महेश घारगे आदींनी कौतुक करून शुभेच्छा दिल्यात. स्पर्धा यशस्वीतेसाठी जयेश बाविस्कर, पुष्पक महाजन, दानिश तडवी, लोकेश महाजन, दिनेश , ऋशिकुमार खारोळे, जयेश कासार, विष्णू झाल्टे, निकेतन खोडके, निकिता पवार, सिमरन बोरसे आदिचे सहकार्य लाभले.

महाराष्ट्रात 84% स्ट्राइक रेटसह भाजपची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी

महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. 288 जागांपैकी 200 हून अधिक जागांवर विजय मिळवण्याच्या तयारीत असलेली ही आघाडी राज्याच्या राजकीय इतिहासातील नवा विक्रम प्रस्थापित करणार आहे.

भाजपची जबरदस्त कामगिरी
सध्याच्या आकडेवारीनुसार भाजप एकट्याने 120 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवू शकतो. हा महाराष्ट्रातील भाजपच्या इतिहासातील सर्वोत्तम परफॉर्मन्स ठरेल. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार भाजप 148 पैकी 124 जागांवर आघाडीवर असून, तब्बल 84% चा स्ट्राइक रेट मिळवत आहे.

काँग्रेस आणि इतर पक्षांची पिछेहाट
भारत ब्लॉकमध्ये सामील काँग्रेस, शिवसेना (UBT), आणि एनसीपी-एसपी या पक्षांच्या मिळून येणाऱ्या जागांपेक्षा भाजपच्या जागा जवळपास दुप्पट आहेत. 2014 मध्ये भाजपने 122 जागा जिंकून आपली सर्वोत्तम कामगिरी केली होती, तर 2019 मध्ये त्यांनी 105 जागा जिंकल्या होत्या. मात्र, सत्तास्थापनेसाठी त्यावेळी अविभाजित शिवसेनेने साथ सोडल्याने भाजपला सत्ता स्थापन करता आली नव्हती.

यंदाचा विजय ऐतिहासिक ठरणार
जर सध्याचे ट्रेंड खरे ठरले, तर भाजपची ही कामगिरी महाराष्ट्राच्या राजकारणातील नवा अध्याय ठरेल. पक्षाला यंदा सर्वाधिक 25.27% मते मिळाली आहेत. तुलनेत, 2019 मध्ये भाजपने 27.81% मते मिळवली होती.

या निकालांमुळे प्रादेशिक पक्षांचे आणि काँग्रेसच्या वर्चस्वाचे बुरुज ढासळत आहेत. भाजपची राज्यातील पकड आणखी मजबूत होत असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपच्या ऐतिहासिक यशाचा विजयघोष सुरूच आहे!

अशोक जैन यांच्यासह जैन परिवाराने बजावला मतदानाचा हक्क

जळगाव दि.२० (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अतुल जैन, अभेद्य जैन, अभंग जैन या सह जैन परिवारातील सर्व सदस्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदानाचा हक्क बजावला. ‘स्वतः केले मग सांगितले…’ या उक्तीप्रमाणे मतदानाचे महत्व पटवून देणे, नागरिकांना मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी जैन परिवाराने सकाळी ७ वाजून ०५ मिनिटांनी आपले मतदान केले.

जैन परिवारातील सदस्यांचे मतदान एम.जे. कॉलेज जवळील ओरियन इंग्लिश मीडियम स्कूल या मतदान केंद्रात होते. त्यांनी मतदानाचे महत्त्व आणि लोकशाहीच्या प्रक्रियेत मतदान करून भाग घेतला. जैन परिवारातील अशोक जैन, सौ. ज्योती जैन, आरोही जैन, अजित जैन, सौ. शोभना जैन, अतुल जैन व डॉ. भावना जैन, अभेद्य जैन, अभंग जैन या सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.

कांताई नेत्रालयाचा उपक्रम – मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांसाठी २१ नोव्हेंबरला विनामूल्य नेत्र तपासणी

जळगाव दि.१८ प्रतिनिधी –  शहरातील निमखेडी रोड व प्रतापनगर येथील कांताई नेत्रालयातर्फे मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी २१ नोव्हेंबर रोजी विनामूल्य नेत्र तपासणी केली जाणार आहे. जे मतदार मतदान केल्याची डाव्या हाताच्या बोटावरील शाईची खूण दाखवतील, त्यांना नेत्र तपासणीत शंभर टक्के सूट दिली जाणार आहे. ही सवलत दि. २१ नोव्हेंबर २०२४ पुरतीच मर्यादीत असेल. सामाजिक जबाबदारीचे भान लक्षात घेऊन मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी कांताई नेत्रालयातर्फे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे, या संधीचा जास्तीत जास्त जळगावकरांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. कांताई नेत्रालयातर्फे यापूर्वी महाराष्ट्र लोकसभा निवडणूकीच्यावेळी देखील अशी सवलत देण्यात आली होती. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला होता.

सर्व नेत्र रूग्णांना उच्च दर्जाची नेत्रसेवा उपलब्ध व्हावी हा उद्देशाने दि. १९ जानेवारी २०१६ रोजी कांताई नेत्रालयाची सुरवात करण्यात आली. जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या कांताई नेत्रालयात आधुनिक उपकरणे आणि अनुभवी डॉक्टरांची पूर्णवेळ उपलब्धता असून गेल्या आठ वर्षाच्या कालावधीत तीन लाखाहून अधिक नेत्ररूग्णांची नेत्रतपासणी आणि पंचवीस हजारहून अधिक यशस्वी नेत्र शस्त्रक्रिया  कांताई नेत्रालयाद्वारे केल्या गेल्या आहेत. कांताई नेत्रालयाच्या संचालिका डॉ. भावना जैन ह्या रेटिना सर्जन असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कांताई नेत्रालयाची यशस्वी वाटचाल सुरु आहे.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version