फाली संम्मेलनाच्या दुसऱ्या टप्प्याचा पारितोषिक वितरण सोहळा 

जळगाव दि. २६ (प्रतिनिधी) – ‘शेतीला भवितव्य आहे, तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनातच शेतीविषयी प्रेम निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात यावे यासाठी फालीचे संम्मेलन गत दहा वर्षांपासून जैन हिल्स येथे आयोजले जाते. विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा घेत शेती क्षेत्रामध्ये आपले भवितव्य घडवावे असे आवाहन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी फालीच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्यांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात केले.

यावेळी व्यासपीठावर फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बॅरी, जैन इरिगेशनचे संचालक डॉ. एच.पी. सिंग, जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चे संचालक अथांग जैन, गोदरेज अॅग्रोवेटचे डॉ. मोहन कुंभार, अनुप्रिया सिंग, यूपीएलचे योगेश धांडे, गणेश निकम, स्टार अॅग्रीचे सुरज पनपत्ते, निकिता शेळके, निलम मोटीयानी, अमूलचे अनिलकुमार बडाया, विक्रम जानी, महेंद्राच्या विशाखा पटोले, प्रॉम्प्टचे रितेश सुतारिया, उज्ज्वीवन स्मॉल बॅंकींगचे योगेश गुरदालकर, वैभव पाटील या कंपनी प्रतिनिधींची उपस्थिती होती.

यावेळी एका विद्यार्थीनीने जैन इरिगेशनच्या कंपनीच्या स्थापनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अशोक जैन म्हणाले की, ‘तुझ्या हातून असे काम व्हावे की, फक्त पाच सात व्यक्तींचे नव्हे तर हजारोंचे पोट भरेल त्या सोबत कीडा, मुंगीचेही पोट भरेल असा काही व्यवसाय कर..हा सल्ला माझ्या वडिलांना त्यांच्या आईकडून मिळाला. एका शेतकऱ्याच्या मुलाने सुरू केलेली ही कंपनी आहे. ही कंपनी तीन पिढ्यांच्या साठवलेल्या ७ हजार रुपयांच्या भांडवलावर सुरू होऊन, आज साडेसात हजार करोड रुपयांची उलाढाल होत आहे आणि ११ हजार लोक कंपनीत काम करत आहेत. मुख्यत्वाने शेती व शेतकरी यांच्यासाठीच जैन इरिगेशनचे जगभरात कार्य सुरू आहे.

  जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चे संचालक अथांग जैन यांनी उपस्थितांशी संवाद साधला. फालीचे उपक्रम भविष्यातील उपक्रम इत्यादी बाबत चर्चा केली. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून कंपनीच्या महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. फालीच्या उपाध्यक्षा नॅन्सी बॅरी यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला. फाली एज्युकेटर आणि फालीला सौजन्य देणाऱ्या कंपनी प्रतिनिधींचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. या कार्याक्रमाचे सूत्रसंचालन हर्ष नौटियाल यांनी तर आभारप्रदर्शन रोहिणी घाडगे यांनी केले.

बिझनेस प्लॅन प्रेझन्टेशन विजेते

ॲग्रीसेन्स: हरनेसिंग रिमोट सेन्सिंग फॉर प्रिसिजन ॲग्रीकल्चर- न्यू इंग्लिश स्कूल भालोद जि. जळगाव (प्रथम), सोरगम फिअस्ट – डॉ. आप्पासाहेब उर्फ एस. आर. पाटील उडगाव टेक्निकल हायस्कूल उडगाव ज़ि. कोल्हापूर (द्वितीय),  बायो सीएनजी – प्रभात विद्यालय हिंगोणे जि. जळगाव (तृतीय), नेचरल डाय ॲण्ड पावडर फॉर्म वालनट शेल-  आदर्श निवासी स्कूल बनासकाठा गुजरात (चौथा), मोरिंगा पावडर – सीताबाई पटवर्धन हायस्कूल कोल्हापूर (पाचवा) असे विजेते ठरले.

नाविन्यपूर्ण इंहोव्हेशन विजेते

ॲलगे पॉल्युशन बॅरिअर- सर्वोदय विद्या मंदीर प्रकाशा जि नंदुरबार (प्रथम), हायड्रेट एक्सेल ॲडव्हान्सिंग ॲग्रिकल्चरल डीहायड्रेशन- प्रभात विद्यालय हिंगोणे जि. जळगाव (द्वितीय), वॉटर स्टोअरेज फॉर्म एअर फॉग- झेड. पी. गर्ल्स हायस्कूल अमरावती (तृतीय), स्मार्ट ग्रीन हाऊस – आर. एस. माने पाटील विद्यामंदीर, विसापूर जि. सांगली (चौथा),  नट इस – हिरकणी विद्यालय गावडेवाडी जि. पुणे (पाचवा) या विद्यार्थ्यांनी मांडलेल्या नाविन्यपूर्ण इन्होवेशन्सला पहिल्या पाचचे क्रमांक देण्यात आले.

फालीच्या १० व्या संम्मेलनाच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशी २६ एप्रिल रोजी सकाळ सत्रात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे बिझनेस प्लॅन सादर केले तर दुपार सत्रात जैन हिल्स येथील आकाश ग्राउंडवर विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण इंहोव्हेशन मांडले होते. सुमारे ५८ प्रकारच्या या नावीण्यपूर्ण  इंहोव्हेशनचे परीक्षण करण्यात आले.

फालीच्या १० व्या संम्मेलनाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या दिवशी २५ एप्रिल रोजी सकाळी ८.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत क्षेत्र भेटी झाल्या. यात टिश्यू कल्चर लॅब, यूएचडीपी (अल्ट्रा हायडेन्सिटी प्लान्टेशन) फ्रूट डेमो प्लॉटला, फळ प्रक्रिया आणि कांदा निर्जलीकरण प्लांट, टिश्यू कल्चर पार्क आणि फ्युचर फार्मिंग इत्यादी प्रकल्पांना भेट दिली. सुप्रसिद्ध “खोज गांधीजी की” या एकमेव अद्वितीय दृक-श्राव्य संग्रहालयास देखील विद्यार्थ्यांनी भेट दिली.

फालीसाठी जैन इरिगेशनसह ज्या ज्या कंपन्यांचे सहकार्य मिळाले अशा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसमवेत दुपारच्या सत्रात फालीच्या विद्यार्थ्यांनी जैन हिल्स येथील परिश्रम हॉलमध्ये गट चर्चा केली. जैन फार्म फ्रेश फुडस् लिमिटेडचे संचालक अथांग जैन यांनी संवाद साधला व त्यांच्या प्रश्नांना उत्तर दिले. सायंकाळच्या सत्रात आकाश ग्राउंडवर प्रगतशील शेतकरी डॉ. वैभव पाटील, प्रशांत राणे (कुंभारखेडे), राहूल आस्कर (वाकोद), पवन सुपडू पाटील (हातनुर), रवींद्र रामदास चौधरी (नाचणखेडा ता. बऱ्हाणपूर. मध्यप्रदेश), भिमसिंग रामसिंग खंडाळे (वरखेड ता. चाळीसगाव), कमलाकर पाटील (बेलखेड ता. मुक्ताईनगर) या शेतकऱ्यांशी संवाद साधला.

फालीच्या दहाव्या संम्मेलनाचा समारोपाचा तिसरा टप्पा २८ व २९ एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी फालीचे अध्यक्ष तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, गोदरेज अॅग्रोव्हेटचे अभय पारनेरकर, स्टार अॅग्रीचे संचालक अमित अग्रवाल, कार्बन क्रेडीटवर काम करणारी संस्था ‘वराह’ चे सीईओ मधुर जैन तसेच युपीएल, स्टार अॅग्री, ओमनीवोर, टाटा रॅलीज, आय टी सी, महिंद्रा, प्रॉम्प्ट डेअरी सोल्युशन्स, एचडीएफसी बँक आणि समुन्नती या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील.

रामलल्लाच्या प्रतिमेसह, विशेषांकाचे जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांना वाटप

जळगाव दि.२३ प्रतिनिधी – ‘प्रभू श्रीरामांचे परमभक्त श्री हनुमान हे सेवेचे, स्वामीभक्तीचे, संस्कारशीलतचे ते प्रतिक होय. याच संस्कारातून जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. आणि जैन परिवार सेवाभाव जोपासत आहे. प्रभू ‘रामलल्ला’ विशेषांकाचे प्रकाशन आज ग्रामदैवत श्रीराम मंदिरात झाले. या पार्श्वभूमीवर जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह सहकाऱ्यांकडून आध्यात्मिक, धार्मिक आणि सेवाभाव जोपासला जावा ही प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना’ ह.भ.प. मंगेश महाराज जोशी यांनी व्यक्त केली.

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. निर्मित जैन भूमिपुत्र ‘रामलल्ला’ विशेषांक हनुमान जयंतीदिनी प्रकाशन  आज श्रीराममंदीर येथे झाले. त्याप्रसंगी ह.भ.प. मंगेश महाराज बोलत होते. यावेळी कानळदा कण्वआश्रमचे स्वामी अद्वैतानंद चंद्रकिरण महाराज, ह.भ.प. श्रीराम महाराज, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, केशवस्मृतीचे अध्यक्ष भरत अमळकर, दीपक घाणेकर, अनिल राव, भालचंद्र पाटील, योगेश्वर गर्गे, स्वानंद झारे, सचिन नारळे, उदय भालेराव, ललीत चौधरी, संदीप रेदासनी, संजय रेदासनी, राजेश नाईक, महेंद्र पुरोहित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भूमिपुत्र संपादकीय मंडळाचे सदस्य अनिल जोशी, किशोर कुळकर्णी, देवेंद्र पाटील यांचीसुद्धा यावेळी उपस्थिती होती. अशोक जैन यांनी रामलल्ला विशेषांक निर्मितीमागची भूमिका विशद केली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल जोशी यांनी केले.

अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, कान्हदेशातील प्रभू रामचंद्रांच्या पाऊलखुणा, रामलल्ला प्रतिष्ठापनाप्रसंगी जळगाव शहरात लालबहादूर शास्त्री टॉवरसह विविध चौक, उद्याने येथे उत्साहाने-आनंदाने करण्यात आलेली सुंदर सजावट, अशोक जैन यांना अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मिळालेले निमंत्रण, अयोध्या यात्रेची अनुभूती, जळगावचे ग्रामदैवत असलेल्या जुन्या राममंदिरासह कान्हदेशातील मंदिरांचा थोडक्यात इतिहास अशा वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण विषयांसह रामलल्ला विशेषांक भावपुष्पांची श्रद्धाशील मांदियाळी असणारा आहे.

‘आयुष्याच्या वाटचालीत देशात-परदेशात वेगवेगळ्या निमित्ताने कितीही भ्रमंती झाली असली तरी अयोध्या येथील अनुभव हा केवळ औपचारिक प्रवासाचा अनुभव, एवढ्याच पातळीवर न राहता, आयुष्याच्या वाटचालीला भावार्थ देणारी ती एक साक्षात पवित्र अनुभूती होती! आनंदाला आध्यात्मिक आचारविचारांचे, श्रद्धाशील अंत:करणाचं कोंदण असलं तर शब्दातीत प्रचीती येते हे निश्चित! जैन परिवारातील पूर्वजांची पुण्याई आहेच, जिल्हावासियांच्या सदिच्छाही कायमस्वरूपी पाठीशी असल्यामुळेच अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची अनुभूती प्राप्त होऊ शकली याची विनम्र जाणीव आहे, राममंदिर साकार करणाऱ्या सर्वांविषयी, त्यांच्या परिवारातील सदस्यांविषयी नितांत आदर भावना आणि कृतज्ञता मनात ठेवत रामलल्ला विशेषांक सचित्र शब्दातीत केला आहे.’ अशी प्रतिक्रिया अशोक जैन यांनी यावेळी दिली.  जैन भुमिपूत्र ‘रामलल्ला विशेषांक’ जैन इरिगेशनच्या सर्व दहा हजार सहकाऱ्यांना वितरीत करण्यात आला, यासोबत गृहपत्रिकेचा नेहमीचा अंक, प्रभू रामलल्लांची प्रतिमा आणि प्रसाद वाटप करण्यात आला.

 

फोटो ओळ –

जैन हिल्सला फालीचे दहावे अधिवेशन सुरु

जळगाव दि. 22 (प्रतिनिधी)–  शेती करायची असेल तर प्रत्येकामध्ये सर्वगुण संपन्न असावे, ईलेक्ट्रीशयन पासून सर्व काही करावे लागते. भविष्यात मजूरांची टंचाई निर्माण होईल मात्र त्यावर शाश्वत सोल्यूशन काढले पाहिजे. गुणवत्ता, ॲग्रोनाॕमिक सेवेत जैन इरिगेशनमध्ये शेतकऱ्यांचा विचार केला जातो ते कुटुंबाप्रमाणेच समजतात, असे मनोगत फाली सुसंवादामध्ये सहभागी शेतकऱ्यानी व्यक्त केले.
भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) अधिवेशनची आज जैन हिल्सला सुरवात झाली. शेतकऱ्यांच्या सुसंवादात, शेतीत प्रत्येक दिवशी समस्या आहे, मात्र सोल्यूशन शोधावे लागेल, एकच चावी आहे ती म्हणजे जैन इरिगेशन!  बाजारातील मागणीप्रमाणे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले पाहिजे. शेती करावीच लागेल नाहीतर खाणार काय? शेती हा असा व्यवसाय असून ती करावीच लागेल त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेतली पाहिजे यातुन भविष्यातील नायक घडविले जातील. शेती पोट भरण्यापूरती न करता उत्पादन वाढविणे हे महत्त्वाचे आहे. असा केळी, हळद, मका, कांदा, आले, आंबा उत्पादक  शेतकऱ्यांनी सुसंवाद साधला. हवामानातील  बदल, मार्केंटिग, नविन तंत्रज्ञान, केळी उत्पादनाचे नफ्याचे आर्थिक गणिते, जैन तंत्रज्ञान यासह विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना विचारले. सुनील नारायण पाटील-देवरे (भारूडखेडा ता जामनेर), प्रताप काशिनाथ भुतेकर (तोंडापूर, ता जामनेर), अंकूश राजेंद्र चौधरी (चांगदेव, ता. मुक्ताईनगर), प्रफुल्ल महाजन (वाघोदा ता. रावेर), निखील मनोहर ढाके (न्हावी ता. यावल) या शेतकऱ्यांनी आपले अनुभव सांगत भविष्यातील शेतीविषयी मार्गदर्शन केले.  रागिणी सहारे, सुजीत नलवंडे, पार्थ बाभूळकर, सानिका बोडके, निलेश चौधरी, प्रियंका शाहू या फाली विद्यार्थ्यांनी लिड केले. जुली पटेल, रोहिणी घाडगे यांनी सूत्रसंचालन केले.
पहिल्या टप्प्यातील पहिला दिवस – फाली उपक्रमात पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, व मध्यप्रदेश राज्यातील ४०० विद्यार्थी व ५० फालीचे शिक्षक सहभागी झाले. पहिल्या दिवशी जैन हिल्स येथील परिश्रम, ड्रीप डेमो, अल्ट्रा हायडेन्सिटी प्लान्ट डेमो प्लॉट, फ्यूचर फार्मिंग, एअर आलू,  टिश्यू कल्चर येथे भेट दिली. जगप्रसिद्ध अशा गांधी तीर्थच्या म्युझियमला देखील भेट दिली. त्याचप्रमाणे टिश्युकल्चर पार्क, फळ प्रक्रिया प्रकल्पास भेट देऊन तेथील निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली. याच्या यशस्वीतेसाठी जैन इरिगेशनचे अधिकारी, सहकारी तसेच फालीचे हर्ष नौटियाल यांनी परिश्रम घेतले.
अधिकारी व शेतकरी यांच्यासमवेत विद्यार्थ्यांची गट चर्चा – दुपार सत्राच्या या कार्यक्रमात परिश्रम जैन हिल्स येथे गट चर्चा झाली यामध्ये जैन इरिगेशनचे तज्ज्ञ डॉ. के बी पाटील, डॉ. अनिल ढाके, अतिन त्यागी, संजय सोनजे, जगदीश पाटील हे तसेच इमरान कांचवाला, निवेश जैन (स्ट्रार ॲग्री), दीपक ललवाणी ( महिंद्रा सेंट्रल ऑफ एक्सलन्स),  शैलेंद्र सिंग, सहयोग तिवारी (आय टी सी),  डॉ.परेश पाटील (अमूल इंडिया), डॉ.विनोद चौधरी (गोदरेज टायसन) त्याच प्रमाणे रावेर तालुक्यातील केऱ्हाळा येथील प्रगतशील शेतकरी अमोल पाटील सहभागी झाले होते.
 फालीचा १० वा वर्धापन दिन – फाली कार्यक्रमाचा आज १० वा वर्धापन दिन होता या निमित्ताने फालीच्या संस्थापिका नॅन्सी बॅरी यांच्यासह शिक्षक, अधिकारी आणि शेतकरी यांच्या उपस्थितित केक कापण्यात आला.  आजचे पाहुणे म्हणून लाभलेले प्रगतशील शेतकरी अमोल पाटील यांचा ही वाढदिवस होता. त्यांच्या जन्म दिनाच्या औचित्याने पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला. आज इनोव्हेशन आणि व्यवसाय योजनांचे सादरीकरण – फाली १० मध्ये सहभागी होणाऱ्या शाळांमधील फालीचे विद्यार्थी शालेय स्तरावरील व्यवसाय योजना आणि अॅग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धांचे विजेते आहेत. हे विद्यार्थी जैन हिल्सच्या आकाश ग्राऊंड कृषी क्षेत्रातील संशोधनाविषयी सादरीकरण करणार आहेत.

भगवान महावीरांचे विचार आपली शक्ती – प. पू. विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म. सा.

जळगाव, दि. २१ (प्रतिनिधी) –  संसारामध्ये अनंत अडचणी येत असतात, यावर मात करण्यासाठी भगवान महावीरांनी सांगितलेल्या मार्गावर चालले पाहिजे, ज्याप्रमाणे अर्जूनाने श्रीकृष्णाला आपली ताकद म्हणून उभे राहण्याची विनंती केली, त्याप्रमाणेच भगवान महावीरांचे विचार हे कृतिशील आचरणात आणा. सत्य, अहिंसा, प्रेम दया ही स्वत:ची ताकद बनवा आणि मोक्ष प्राप्ती करा, असा उपदेश परमपूज्य विजय रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज साहेब यांनी धर्मसभेत केले.

स्वत:च्या जीवनात महावीरांचे स्थान किती महत्त्वाचे आहे हे समजणे खूप कठिण आहे. चौवीस तास महावीरांचे विचार आपल्यासोबत असून ते शाश्वत आहेत, प्राणवायूप्रमाणे ते मनुष्य जीवनात कार्य करतात फक्त ते अनुभूवता आले पाहिजे. तशी दृष्टी असावी. त्यातून एक दृष्टिकोण मिळतो. भगवान महावीर यांचे जन्मोत्सवानिमित्त दोन नियम अंगिकारले गेले पाहिजे, ते म्हणजे स्त्रीयांविषयी द्वेष भावना न ठेवता आदरयुक्त भाव ठेवला गेला पाहिजे. व्यसनांपासून दूर होऊन प्रभू भगवान महावीर हे आपल्याला व्हिजीबल असून तेच व्हिजन असतात ही भावना ठेवली पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी जगात कुठलेही लहान बाळ हे मातृप्रेमापासून वंचित राहू नये, तरुण सौभाग्यवती विधवा होऊ नये, वयोवृद्ध बापाला आपल्या मुलाची-मुलीची अंत्ययात्रा खांद्यावर न्यावी लागु नये ह्याची प्रार्थना केली पाहिजे. कुठल्याही धर्माचा असो अंत्ययात्रे ठिकाणी मोबाईल नेऊ नये, व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे, असा मौलिक सल्ला उपस्थितीत सुश्रावक-श्रावकींना परमपूज्य विजय रत्नसुंदर सुरीश्वरजी महाराज साहेब यांनी दिला.

शोभायात्रेतून समाजोपयोगी संदेश

सकल जैन श्री संघ प्रणित श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव समितीतर्फे आयोजित कार्यक्रमाची सुरवात ही शोभायात्रेद्वारे झाली. वासुपुज्यजी जैन मंदिराच्या प्रांगणातून ध्वजवंदन होऊन वरघोडा शोभायात्र काढण्यात आली. शोभायात्रा ही चौबे शाळा, सुभाष चौक, नवीपेठ, सरस्वती डेअरी, नेहरू चौक मार्गे सेंट्रल मॉल मध्ये समारोप झाला. मतदानाचा हक्क वाजवा, झाडे लावा, पुत्रीचा सन्मान करा, पाणी वाचवा यासह सामाजोपयोगी संदेश शोभायात्रेत लक्ष वेधून घेत होते. संघपती दलिचंदजी जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार सुरेश भोळे, कार्याध्यक्ष कस्तुरचंदजी बाफना, श्रीमती नयनताराजी बाफना, माजी खासदार ईश्वरलाल जैन, अजय ललवाणी, प्रदीप रायसोनी, रजनीकांत कोठारी, ललित लोडिया, मनिष जैन, राजेश जैन, जितेंद्र चोरडिया, भगवान जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष पारस राका, स्वरूप लुंकड यांच्यासह समाजातील मान्यवर उपस्थित होते. भगवान महावीरांच्या विचारांनी शोभायात्रेदरम्यान असलेले चौकांमध्ये विशेष सजावट केली होती. शोभायात्रेत अग्रभागी नवकार मंत्र प्रचार वाहन होती. त्यानंतर चार घोडेस्वार चार ध्वजधारी, सजीव देखावे, बग्गीमध्ये भगवान महावीरांची प्रतिमा, गुरु महाराज, १०८ कलधारी महिला, बॅण्ड, जैन मंदिराचा चांदिचा रथ त्यात मूर्ती ही शोभायात्रेचे आकर्षण होते. शोभायात्रेचा समारोप खान्देश सेंट्रल मॉल येथे झाला.

मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन, पुस्तकांचे विमोचन

शासनपती श्रमण भगवान महावीर स्वामीजी २६२३ वा जन्म कल्याणक महोत्सवाच्या शोभायात्रेच्या समारोपाप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन, दीपप्रज्वलन झाले. याप्रसंगी संघपती दलिचंदजी जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार सुरेश भोळे, कस्तुरचंदजी बाफना, श्रीमती नयनताराजी बाफना, माजी खासदार ईश्वरलाल जैन, अजय ललवाणी, प्रदीप रायसोनी, रजनीकांत कोठारी, ललित लोडिया, मनिष जैन, राजेश जैन, जितेंद्र चोरडिया, भगवान जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष पारस राका, स्वरूप लुंकड  उपस्थित होते. सामूहिक गुरुवंदना झाली. गौतम प्रसादीचे लाभार्थी कांताबाई इंदरचंदजी छाजेड परिवाराचा सकल श्री संघाच्या वतीने दलिचंदजी जैन यांनी मानपत्र देऊन गौरव केला. मानपत्राचे वाचन स्वरूप लुंकड यांनी केले. जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.कंपनीची सेवाभावी संस्था भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे अन्नदान करण्यात आले.

तत्पूर्वी डॉ. ज्ञान प्रभाजी म.सा. यांनी संथारा घेऊन देवगमन झाल्याने त्यांचे नवकार मंत्राद्वारे स्मरण करण्यात आले व श्रद्धाभाव अर्पण केला गेला. स्वागत गीत लॉकडाऊन महिला मंडळाच्या सदस्यांनी केले. नवकार मंत्राचे स्मरण श्रद्धा महिला मंडळाने केले, जैन ध्वजगीत जैन महिला मंडळातर्फे सादर करण्यात आले. सूत्रसंचालन नितीन चोपडा यांनी केले. श्रेयस कुमट यांनी आभार मानले.

समिति अध्यक्ष पारस राका यांनी प्रस्तावना व्यक्त केली. जळगाव सकल श्री संघ म्हणजे एकतेचे प्रतिक असून हृदयपूर्व बंधूभावातून भगवान जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन केल्याचे सांगितले. गौतम प्रसादी लाभार्थी छाजेड परिवारातर्फे बडनेरा येथील सुदर्शन गांग यांनी मनोगत व्यक्त केले. मनुष्य जन्म हा दुर्लभ असून जैन धर्मात तेही भारतात जन्म मिळाल्याने धन्य झाले असून कांताबाई इंदरचंद छाजेड परिवार हे परिश्रम आणि सेवेचे पाईक आहेत हा संस्कार त्यांना दलुबाबा जैन यांच्या सहवासातून मिळाल्याचे ते म्हणाले. मानवतेच्या सेवेत जीवनाची सर्वात आनंदाची अनुभूती असते असे ते म्हणाले. प्रियेश छाजेड यांनी सर्वांनी प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. संघपती दलिचंदजी जैन यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘प्रेम, करुणा, अहिंसाचा त्रिवेणी संगण म्हणजे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव होय. मानव जीवन समजून घेण्यासाठी महावीरांचे विचार ऐकणे आणि प्रत्यक्ष जीवनात आचरण आणणे महत्त्वाचे आहे.’

 ‘अर्जी तेरी मर्जी तेरी’ या पुस्तकाचे विमोचन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन आणि कस्तुरचंदजी बाफना यांच्याहस्ते झाले. जैन युवा फाउंडेशनतर्फे  सकल जैन समाजाची डायरीच्या ऐप app चे अनावरण करण्यात आले. जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन यांच्या मार्गदर्शनातून साकार झालेल्या ‘जे टू जे’ डायरीचे जीतो युथ विंग तर्फे प्रकाशन केले गेले.

भव्य रक्तदान शिबीर

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवा निमित्त जय आनंद ग्रुपतर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. आरोग्य तपासणीसह देहदान, नेत्रदानाचे अर्जही भरुन घेतले जात होते. रक्तदान शिबीरात संध्याकाळ पर्यंत २७१ रक्त पिशव्यांचे संकलन झाले. इंडीयन रेडक्रॉस सोसायटी आणि माधवराव गोळवलकर रक्तपेढी यांचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी जय आनंद ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. जळगाव झाले महावीरमय – जळगाव शहरातील काव्यरत्नावली चौकासह विविध मुख्य चौक महावीर प्रतिमेने, जैन चिन्हांनी, महावीर संदेशांनी सजविण्यात आले होते. ते नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत होते.

भगवान महावीर जयंतीच्या औचित्याने  ‘लुक एन लर्न’ च्या चिमुकल्यांचे उत्कृष्ट सादरीकरण

जळगाव दि.२० (प्रतिनिधी) : श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती – २०२४ द्वारा आयोजित शासनपती भगवान महावीर स्वामी यांच्या २६२३ जन्म कल्याणक महोत्सवाच्या औचित्याने सायंकाळी ०७.३० पासून ‘लुक एन लर्न व अन्य महिला मंडळा तर्फे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रस्तुती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाचे दीप प्रज्ज्वलन जैन इरिगेशनचे चेअरमन श्री. अशोकभाऊ जैन यांच्या हस्ते तर श्री भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष पारस राका, नयनतारा बाफना, ज्योती जैन, ताराबाई डाकलिया व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आरंभी कच्छी दशा वीसा मंडळा तर्फे नमोकार मंत्र तर जे पी पी महिला मंडळाच्या सदस्यांनी स्वागत गीत सादर केले.
‘लुक एन लर्न’ च्या सुमारे १४० लहान बालकांनी एक तास या कार्यक्रमात सहभाग घेऊन आपल्यातील छुप्या कलात्मक प्रस्तुति सादर केल्या. अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण, बोधप्रद  कार्यक्रमातून भगवान महावीर स्वामी यांचा सुयोग्य संदेश देण्यात आला. ह्या सादरीकरणाला जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन सपत्नीक उपस्थित राहून देत सहभाग्यांना प्रोत्साहन दिले. विजेत्या स्पर्धकांना अशोक जैन, ज्योती जैन, समितीचे अध्यक्ष पारस राका, सौ किरण बोरा, चंद्रकांता मुथा, रिना कुमट आदि मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान केले गेले.
 या नंतर जैन सोशल ग्रुप, जय आनंद ग्रुप, तेरापंथ महिला मंडळ, सुशील बालिका मंडळ यांच्या धार्मिक आणि सामाजिक विषय घेवून छोटी नाटिका सादर केली.  कार्यक्रमाच्या यशश्वीतेसाठी विशाल चोरड़िया, संजय रेदासनी, नरेंद्र बंब यांनी परिश्रम घेतले.

जैन हिल्स येथे २२ एप्रिल पासून फालीचे दहावे अधिवेशन

जळगाव दि. १९ (प्रतिनिधी) : भारतीय शेती व कृषी-उद्योगाचे भविष्य बदलणाऱ्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (FALI) ह्या उपक्रमाने पुढील दहा वर्षांसाठीच्या मोठ्या विस्तार योजनांच्या नियोजनासह नुकतेच दहावे वर्ष पूर्ण केले. २२ ते २९ एप्रिल २०२४ या कालावधीत फाली १० अधिवेशनाचे आयोजन जैन इरिगेशन सिस्टीम्स् लि., जैन हिल्स, जळगाव येथे करण्यात आले आहे. यामध्ये फालीचे १,२०० पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्या ९० फाली कृषी शिक्षकांसह आणि फाली १० ला सहकार्य करणाऱ्या अकरा कंपन्यांमधील ५० हून अधिक उच्चस्तरीय आणि वरिष्ठ व्यवस्थापकांसह सहभागी होत आहेत.

फाली १० मध्ये सहभागी होणाऱ्या १७५ शाळांमधील हे फालीचे विद्यार्थी शालेय स्तरावरील व्यवसाय योजना आणि अॅग्रीटेक इनोव्हेशन स्पर्धांचे विजेते आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेश ह्या कृषी क्षेत्रातील तीन प्रमुख राज्यांमध्ये फाली सध्या कार्यरत आहे: तसेच, पुढील दहा वर्षांत किमान आणखी तीन मोठ्या राज्यांमध्ये विस्तार करण्याची फालीची योजना आहे. यावर्षी, ग्रामीण भागातील सरकारी अनुदानित शाळांमधील १५,००० पेक्षा जास्त फाली विद्यार्थ्यांनी कृषीशास्त्र, पशुधन शास्त्र, कृषी तंत्रज्ञान, ॲग्रो-एंटरप्राइज आणि ॲग्री-फायनान्स या विषयावरील परस्परसंवादी (इंटरअक्टीव) वर्गात भाग घेतला होता. सर्व मॉड्यूल्समध्ये हवामानातील बदलांना सामोरे जाण्याचे प्रॅक्टिकल करत फालीचे विद्यार्थी प्रत्येक शाळेत शेड नेटमध्ये व्यवसाय तयार करतात. ते आधुनिक शेती आणि अग्रगण्य कृषी-उद्योगांच्या ठिकाणी क्षेत्रीय भेटी देतात. वेबिनार आणि व्हिडिओंच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रातील अनुभवी वरिष्ठांसोबत संपर्क करून अत्याधुनिक नवकल्पना विषयी माहिती मिळवतात. आणि व्यवसायाच्या नवीन योजना तयार करतात आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञाना संबंधी संशोधन करतात.

फाली मधील ९०% पेक्षा जास्त विद्यार्थी आणि पालक असे म्हणतात की, “फाली ने कृषी आणि कृषी-उद्योगातील भविष्याकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन बदलला आहे आणि विद्यार्थ्यांनी कृषी आणि कृषी उद्योगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक तांत्रिक, व्यवसायिक आणि नेतृत्व कौशल्ये फाली मध्ये प्राप्त केली आहेत. आधुनिक आणि शाश्वत शेतीमध्ये भविष्य घडविण्यासाठी फाली मधील अनेक विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी त्यांच्या कुटुंबाच्या शेतामध्ये सुधारित कृषी पद्धती आणि तंत्रज्ञान आणतात.”

फाली मध्ये आता ४०,००० पेक्षा जास्त माजी विद्यार्थी आहेत आणि २०३२ पर्यंत ही संख्या २,५०,००० पर्यंत वाढविण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. फाली मध्ये इंटर्नशिप, शिष्यवृत्ती आणि कृषी उपक्रमांसाठी सुरुवातीचा निधी (सीड फंडिंग) असे विविध सक्रिय माजी विद्यार्थी उपक्रम चालू आहेत. फाली माजी विद्यार्थी इंटर्नशिप सुविधा प्रायोजित करणाऱ्या कंपन्या विद्यार्थ्यांना मूल्यमापनात भरपूर गुण देतात, ९० टक्क्यांहून अधिक असे म्हणतात की फाली इंटर्न्स सामान्य कंपनी इंटर्नपेक्षा जास्त चांगली कामगिरी करतात आणि ह्या कंपन्या फालीच्या बहुसंख्य माजी विद्यार्थी इंटर्न्सना नियुक्त करू इच्छितात. फालीचे जवळजवळ सर्व माजी विद्यार्थी त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण करतात आणि ६०% पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्या कुटुंबाच्या शेतीमध्ये सुधारणा करत असताना मुख्यत्वे विज्ञान, अभियांत्रिकी आणि कृषी क्षेत्रात उच्च शिक्षण घेतात. फालीचा ग्रामीण भारतात गेल्या दहा वर्षांपासून प्रभाव आहे, कृषी आणि कृषी-उद्योग पुढील पिढीसाठी आकर्षक बनवणे, आवश्यक ग्रामीण-शहरी कनेक्शन निर्माण करणे आणि ग्रामीण भारतातील फाली कार्यक्रमात जलद वाढ होण्यासाठी फी च्या माध्यमातून महसूल मिळविणे या उद्देशाने या वर्षी फाली टीमने इंग्रजी माध्यमाच्या तीन प्रमुख शहरी शाळांमध्ये फाली e+ ची चाचणी घेतली आहे.जयपूर येथील जयश्री पेरीवाल इंटरनॅशनल स्कूलमधील फाली e+ विद्यार्थ्यांनी गेल्या वर्षी फाली ९ अधिवेशनात भाग घेतला होता, त्यावेळी असे दिसून आले कि त्यांना शेतीबद्दल आणि ग्रामीण भारतातील लोकांबद्दल फारशी माहिती नाहीये. एका वर्षात १३० दशलक्ष टिश्यू कल्चरच्या रोपांच्या उत्पादनासाठी जैन इरिगेशन मध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानामुळे ते फालीच्या अधिवेशनामध्ये खूपच जास्त प्रभावित झाले. हे हुशार, अस्सल शहरी विद्यार्थी फाली ९ अधिवेशनातील स्पर्धांमध्ये ग्रामीण फाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या व्यावसायिक योजना आणि कृषी तंत्रज्ञानातील नवकल्पनांच्या गुणवत्तेने खूप जास्त प्रभावित झाले. यावर्षी फाली e+ मध्ये भाग घेतल्यानंतर वेबिनार आणि व्हिडिओंच्या माध्यमातून अनुभवी कृषी व्यवसायिक आणि कृषी-उद्योजकांतच्या संपर्कात आल्यामुळे तसेच फाली e+ बुकलेटमधून हायड्रोपोनिक्सपासून ते स्ट्रॉबेरी व्हॅल्यू चेन (मूल्य साखळी) ते कृषी उद्योजकतेमधील आर्थिक व्यवस्थापन आणि निधीचा विचारपूर्वक वापर अशा सर्व बाबींमधील अत्याधुनिक नवकल्पनांबद्दल माहिती मिळाल्यामुळे हेच शहरी विद्यार्थी पूर्वीपेक्षा अधिक उत्साही दिसत होते, आणि या वर्षी, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात, फाली १० कन्व्हेन्शन मध्ये बिझनेस प्लॅन आणि अॅग्रो टेक इनोव्हेशन स्पर्धांमध्ये, हेच शहरी विद्यार्थी ग्रामीण शालेय स्तरावरील बिझनेस प्लॅन स्पर्धेतील आणि अॅग्रो टेक इनोव्हेशन स्पर्धांमधील विजेत्या उच्च गुणवत्ताधारक ग्रामीण फाली विद्यार्थ्यांसोबत स्पर्धांमध्ये भाग घेतील.

फाली १० मध्ये अकरा अग्रगण्य कृषी व्यवसाय आणि वित्तीय संस्थांचा सक्रिय सहभाग आणि पाठिंबा आहे; ज्यामध्ये जैन इरिगेशन, गोदरेज ऍग्रोव्हेट, युपीएल, स्टार अॅग्री, ओमनीवोर, टाटा रॅलीज, आय टी सी, महिंद्रा, प्रॉम्प्ट, एचडीएफसी बँक आणि समुन्नती यांचा समावेश आहे. तसेच २०२४ / २५ ह्या आर्थिक वर्षामध्ये एसबीआय आणि अन्य काही कंपन्या फालीला समर्थन देण्यासाठी वचनबद्ध आहेत. असोसिएशन फॉर फालीचे बोर्ड मेंबर्स (सदस्य) त्यासाठी अधिकचा पाठपुरावा करत आहेत. जैन इरिगेशनचे व्हाईस चेअर सीईओ अनिल जैन म्हणतात, शेतकरी आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारे व्यवसाय निर्माण करण्यासाठी आम्हाला ग्रामीण आणि शहरी यामध्ये संपर्क साखळी निर्माण करावी लागेल. नादीर गोदरेज म्हणतात की फाली मधील तरुणांना शेती आणि शेती व्यवसाय हे त्यांच्या जीवनाचे कार्य म्हणून करण्यासाठी प्रोत्साहित करत राहिले पाहिजे. त्यासाठी आपण फाली माजी विद्यार्थी कार्यक्रम, विशेषत: इंटर्नशिप्स या पुढे ही सुरूच ठेवले पाहिजेत.

यूपीएलचे अध्यक्ष रज्जू श्रॉफ म्हणतात की हे युवा नायक भारतीय शेतीतील उत्पादकता सुधारतील आणि हवामान बदलाच्या आव्हानांना योग्य रीतीने सामोरे जातील. नॅन्सी बॅरी म्हणतात की या तरुणांमध्ये धगधगती शक्ती आहे; आपण ती योग्य मार्गाने वापरात ठेवू या. २०१४ पासून फालीचे महाव्यवस्थापक हर्ष नौटियाल यांनी फालीच्या विशेष कामांची माहिती दिली. आम्हाला आमच्या फाली आणि फाली e+ कार्यक्रमांमधील आशयपूर्ण माहितीमध्ये, तसेच ती दूरवर पोहोचविण्यासाठी आवश्यक असलेल्या सुधारणा करत राहण्याची गरज आहे आणि भारतीय शेतीमध्ये चांगले परिवर्तन घडवून आणण्यासाठी अधिकाधीक फाली माजी विद्यार्थ्यांची पाठराखण केली पाहिजे. भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत २०३२ पर्यंत अडीच लाख फाली माजी विद्यार्थी तयार करणे ही एक खूपच लहान संख्या आहे. पण भारतीय शेतीचा कायापालट करणारे नायक म्हणून ही संख्या खूप मोठी आहे.

आंतर जिल्हा २३ वर्षाखालील मुलांचे क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी

जळगाव, १९ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणऱ्या  आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी  निवड चाचणीचे आयोजन *सोमवार दिनांक २२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ०८ . ३० वाजता जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या मैदानावर  ( विद्या इंग्लिश शाळेच्या मागे )*  आयोजित करण्यात आले आहे.
ज्या मुलांची जन्म तारीख ०१.०९.२००१ वा त्या नंतरची असेल तेच मुले या निवड चाचणीसाठी पात्र असतील सर्व इच्छुक मुलांनी या निवड चाचणीत जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग या  लिंक https://forms.gle/XePt2NkHhTEXCKrM9     वर जाऊन गुगल फॉर्म व ऑनलाईन निवड चाचणी फी ₹ १००/- भरून आपला सहभाग नोंदवावा व सोबत आपले आधार कार्ड व जन्म दाखला अपलोड करावा तसेच निवड चाचणी साठी क्रिकेट साहित्य पांढरा गणवेश व शूज सोबत आणावे. असे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष अतुल जैन  यांनी केली आहे. अधिक माहितीसाठी सचिव अरविंद देशपांडे ( ९४०४९५५२०५ ) व सहसचिव अविनाश लाठी (९८२२६१६५०३ ) यांचेशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवप्रित्यर्थ भरगच्च कार्यक्रम

जळगाव, दि. १८ (प्रतिनिधी) – सकल जैन श्री संघ जळगाव प्रणित श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती – २०२४ द्वारा १८ ते २२ एप्रिल २०२४ दरम्यान शासनपती श्रमण भगवान महावीर स्वामीजींचा २६२३ जन्म कल्याणक महोत्सव साजरा करण्याचे नियोजन केले आहे. या निमित्त शहरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन झालेले असून या वर्षाच्या या महोत्सवाची विशेष गोष्ट अशी आहे की, महावीर जन्मकल्याणकला २१ एप्रिल रोजी जळगाव येथील खान्देश सेंट्रल प्रांगणात सकाळी ९.४५ वाजता पद्मभूषण आचार्य भगवंत  प.पू. विजय रत्नसुंदर सुरीश्वरजी म.सा. यांची विशेष उपस्थिती व उद् बोधन लाभणार आहे. याबाबतची माहिती पारस राका (अध्यक्ष, भगवान महावीर जन्मकल्याणक समिती – २०२४)  स्वाध्याय भवन येथे आयोजलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
१९ रोजी सकाळी ६.३० ला सिव्हिल हॉस्पीटल येथे स्वाध्याय महिला मंडळ व सुशिल बहू मंडळ द्वारा फळ वाटप व सकाळी ७.१५ वाजता ‘ट्रेझर हंट’ स्पर्धा खान्देश सेंट्रल येथे होईल. या स्पर्धेसाठी आधी नाव नोंदणी करणे आवश्यक असून त्यात सकल जैन समाजातील १६ ते ५० वर्षांच्या युवक-युवतीत, स्त्री-पुरुष, विवाहीत-अविवाहीत व्यक्ती सहभागी होऊ शकतील. जळगाव जैन युथ पॉवर (JJYP) हे आयोजक आहेत. सायंकाळी ७.०० ला श्री सकल जैन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती २०२४ द्वारा छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे विविध स्पर्धांचा पुरस्कार वितरण सोहळा, तर याच ठिकाणी सायंकाळी ०७.३० पासून ‘लुक एन लर्न’ तथा अन्य महिला मंडळा तर्फे वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रस्तुती होईल.
२० एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते ८.३० स्वाध्याय भवन येथे सम्यक महिला मंडळा तर्फे सामूहिक सामायिक मध्ये ‘प्रभू महावीर: कल, आज और कल’ या विषयावर वक्ते आदर्श जैन यांचे मनोगत होईल. दुपारी २.०० ते सायंकाळी ७.०० पर्यंत खान्देश सेंट्रल प्रांगण येथे वीरति वृंद द्वारा कार्निवल, सायंकाळी ७.०० ला श्री सकल जैन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती २०२४ द्वारा स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह येथे होईल. या कार्यक्रमानंतर ७.३० पासून सदाग्यान भक्ती मंडळ, अन्य महिला मंडळाद्वारे लगेच विविध नाविण्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांची प्रस्तुती होईल.
२१ एप्रिल रोजी महावीर जन्मकल्याणक दिनी सकाळी ७.१५ वाजता शहरातील श्री वासुपुज्यजी जैन मंदीर प्रांगण येथे सकल श्री संघाद्वारे जैन ध्वजवंदन होईल. तेथूनच सकाळी ७.३० वाजता जैन युवा फाउंडेशन द्वारा आयोजित भव्य अशा शोभायात्रेस (वरघोडा) आरंभ होईल. टॉवर चौक, गांधी मार्केट, सुभाष चौक, दाणाबाजार, सारस्वत चौक, जयप्रकाश नारायण चौक, नेहरू चौक मार्गे खान्देश सेंट्रल प्रांगणात समापन होईल. सकाळी जय आनंद ग्रुप तर्फे ८.४५ पासून आयोजित रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन आहे. सकाळी ९.०० वाजता जैन ध्वजवंदना व मुख्य समारंभास सुरुवात होईल. सकाळी ९.४५ वाजता आचार्य भगवंत पद्मभूषण  प.पू. विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी महाराज यांचे विशेष प्रासंगीक उद् बोधन लाभेल. सकाळी ११.१५ ला सामुहीक प्रसादी असून त्याचे लाभार्थी श्रीमती कांताबाईजी इंदरचंदजी छाजेड परिवार आहे. सायंकाळी ७.३० वाजेपासून वीतराग भवन, लाल मंदीर शिवाजी नगर येथे महावीर दिगंबर चैत्यालय ट्रस्ट द्वारा भगवान महावीर स्वामी झुला उत्सव होईल.
महावीर जन्मकल्याण निमित्ताने जैन इरिगेशन तर्फे काव्य रत्नावली चौकाची सजावट करण्यात येणार असून  व.वा. वाचनालयाच्या प्रांगणात गरजूंसाठी भोजन देण्यात येणार आहे. या सोबतच विविध संस्थां तर्फे शहरातील विविध चौक सुशोभित केले जाणार आहेत. सर्व कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे विनम्र आवाहन भगवान महावीर जन्मकाल्याक समितीचे अध्यक्ष श्री पारस राका यांनी केले.
२२ एप्रिल रोजी आचार्य भगवंत प.पू. १००८ श्री रामलालजी म.सा. यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने सकाळी ७ वाजता  समता युवा संघा तर्फे सिव्हिल हॉस्पीटल मध्ये रुग्णांसाठी फळ वाटप, १०.३० ते ११.०० साधुमार्गी जैन संघा द्वारे स्वाध्याय भवन येथे नवकार महामंत्र जापने या महोत्सवाचा समारोप होणार आहे.
या कार्यक्रमासाठी माजी मंत्री समाजरत्न, समाज चिंतामणी सुरेश दादा जैन त्याच प्रमाणे सकल जैन श्री संघ अध्यक्ष दलीचंदची जैन यांचे मार्गदर्शन असून सन्माननीय अतिथी म्हणून मा. खा. ईश्वरबाबुजी ललवाणी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, नयनतारा बाफना, माजी महापौर रमेशदादा जैन, उद्योगपती रजनीकांत कोठारी, माजी महापौर प्रदीप रायसोनी, उद्योगपती अजय ललवाणी, गौतम प्रसादी लाभार्थी कांताबाई इंदरचंदजी छाजेड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असतील. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कस्तुरचंदजी बाफना (कार्याध्यक्ष, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ), ललित लोडाया (अध्यक्ष, श्री जैन श्वेतांबर मूर्तीपुजक संघ), राजेश जैन (अध्यक्ष, श्री महावीर दिगंबर जिनतैत्यालय ट्रस्ट), जितेंद्र चोरडिया (अध्यक्ष, श्री. जैन श्वेतांबर तेरापंथ सभा) श्री. स्वरुपभाई लुंकड यांचे मोलाचे योगदान लाभत आहे. यावेळी श्रेयस कुमट, अनिल जोशी, किशोर कुलकर्णी, अनिल कोठारी उपस्थित होते.

भगवान महावीर स्वामी यांचा 2623 वा जन्म-कल्याणक महोत्सव आरंभ 

जळगाव, दि. १८ (प्रतिनिधी) – श्री सकल जैन भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव समिती 2024 यांच्या अंतर्गत सकल दिगंबर जैन समाजाच्या विश्व शांति, सदभावना व मतदान जनजागृति बाइक रॅलीने भगवान महावीर स्वामी यांचा 2623 वा जन्म-कल्याणक महोत्सव आरंभ झाला. खानदेश सेंट्रल प्रांगणा पासून ही रॅली सुरु झाली.
पारस राका यांनी मनोगत व्यक्त केले
कार्यक्रमासाठी आज प्रमुख अतिथि डीएसपी डॉक्टर रेड्डी, माजी खासदार ईश्वरलाल ललवाणी,अशोकभाऊ जैन, रजनीकांत कोठारी, अजय ललवानी जन्म कल्याणक समिति चे अध्यक्ष पारस राका, स्वरूप लुंकड़, जितेंद्र चोरडिया, ललित लोडाया, चंद्रशेखर राका , आदर्श कोठारी , श्रेयस कुमट, नितिन चोपड़ा, विनय पारख, अनीश शहा , प्रदीप मुथा, प्रवीण पगारिया , चंद्रकांता मुथा, प्रवीण छाजेड़ , मनीष लुंकड़ , मीनल जैन आदि उपस्थित होते. पागरिया ऑटो कडून नवीन बजाज चेतक वाहन उपलब्ध करून दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी साहेब यानी मतदान टक्का वाढ़ावा आणि निर्भय पणे मतदान करावे म्हणून सर्व उपस्थितांना शपथ दिली. शपथ ग्रहण केल्यानंतर रैली ला आरंभ झाला. मोठ्या संख्येने उत्साहाने रैलीत दुचाकी स्वार सहभागी झाले होते. दुचाकीस्वार मतदार जागृती, विश्र्वशांती आणि पर्यावरण संवर्धन होण्यासाठी फलक दर्शवित होते. विविध वेशभुषा आणि वाहन सजावट करून महिला मंडळ आकर्षणाचे केंद्रबिंदु होते.
कार्यक्रमास सकल दिगंबर जैन समाजाचे सर्वश्री नेमीचंद जैन, राजू भाई शहा , सुधीर बाजल, आनंद चांदिवाल, अनीश चांदीवाल, समीर, वृषभ शाह, भावेश आंबेकर, नरेंद्र जैन, प्रशांत चांदीवाल, विजय आंबेकर , राहुल जैन, सौरभ चांदीवाल, दीपक कोठड़िया, सुशील कोठड़िया, गिरीश कोठड़िया, रितेश चांदीवाल, दीपक जैन यानी परिश्रम घेतले.

जैन इरिगेशनमध्ये अग्रीशमन सेवा सप्ताहाचे आयोजन

जळगाव दि. १४ प्रतिनिधी –  जैन इरिगेशनमध्ये अग्रीशमन सेवा दिनानिमित्त  १४ ते २० एप्रिल दरम्यान अग्रीशमन सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. ‘आगीपासून सुरक्षितता सुनिश्चत करा, राष्ट्र उभारणीत योगदान द्या’ या संदेशासह वेगळे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. आज आग विझविण्यासाठी धारातीर्थी शहीद अग्रीशमन जवानांना जैन इरिगेशनच्या अग्रीशमन विभागाच्या सहकाऱ्यांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

जैन व्हॅली मध्ये झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अग्नीशमन दलाचे सहकारी, वरिष्ट सहकारांसह सुनील गुप्ता, जी. आर. पाटील, एस. बी. ठाकरे, वाय. जे. पाटील यांच्यासह फायर सेफ्टी विभागाचे अधिकारी कैलास सैदांणे, निखिल भोळे, हेमकांत पाटील, जे. जे. पाटील, देवेंद्र पाटील, मनोज पाटील, प्रविण पाटील, महेंद्रसिंग पाटील, जितेंद्र पाटील यांच्यासह सहकारी उपस्थित होते. या सप्ताहाअंतर्गत कंपनीच्या आस्थापनांमधील प्रत्येक विभागात आग विझविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याबाबतच्या वापराबाबत प्रात्यक्षिकांसहीत माहिती सादर करण्यात येत आहे. या प्रशिक्षण उपक्रमाचा सहकाऱ्यांकडून लाभ घेतला जात आहे. ज्वलनशील पदार्थ सुव्यवस्थीत ठिकाणी ठेऊन अपघात होवू नये हिच खरी आपल्यातर्फे शहीदांना श्रद्धांजली ठरू शकते असे मार्गदर्शन करण्यात आले.

अग्रीशमन दिनानिमित्त शहीदांना श्रद्धांजली..

जैन फूडपार्कच्या जैन व्हॅली येथे अग्नीशमन दिवस साजरा झाला. १४ एप्रिल १९४४ रोजी फोर्टस्टीकेन मालवाहतूक जहाज, व्हिक्टोरिया डॉक, मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे स्फोटक पदार्थ वाहून आणणारे जाहजास अचानक आग लागली होती, या जहाजात युद्ध सामुग्री स्फोटक पदार्थ, कापसाच्या गाठी आदी साहित्यमध्ये आग लागली होती. ही आग विझवीताना मुंबई अग्नीशमन दलाचे ६६ जवान शहीद झाले होते, त्यांचा स्मरणार्थ संपूर्ण देशात भारत सरकारच्या आदेशानुसार अग्नीशमन सेवा दिवस व सप्ताह साजरा राबविण्यात येतो. त्यानिमित्त जैन इरिगेशनच्या आस्थापनांमध्ये अग्नीशमन दिवस व सप्ताह निमित्ताने आग विझवण्यासाठी वापरात येणाऱ्या साहित्याचे प्रात्यक्षिक माहिती सादर करुन, त्यावेळी आग विझवण्यासाठी धारातीर्थी शहीद अग्नीशमन जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

जॉईन Trading Buzz
Exit mobile version