श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 20 षटकात 8 विकेट गमावत 173 धावा केल्या आणि श्रीलंकेसमोर विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य ठेवले. 13 च्या स्कोअरवर भारताने दोन गडी गमावले. केएल राहुल सहा धावा करून बाद झाला तर विराट कोहली खाते न उघडताच बाद झाला. त्यानंतर कर्णधार रोहितसह सूर्यकुमारने तिसऱ्या विकेटसाठी ५८ चेंडूत ९७ धावांची भागीदारी करत भारताला मजबूत स्थितीत आणले. रोहित ७२ धावा करून बाद झाला. त्याने 41 चेंडूत 5 चौकार आणि 4 षटकार ठोकले. तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवही 34 धावा करून बाद झाला. 19व्या षटकात भारताने दोन चेंडूंत सलग दोन विकेट गमावल्या. दीपक हुड्डापाठोपाठ पंतही १७ धावा करून बाद झाला. शेवटी रविचंद्रन अश्विनने सात चेंडूत एका षटकाराच्या मदतीने १५ धावांची मौल्यवान खेळी केली.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया चषक 2022 सुपर-4 मधील तिसरा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट टीम स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये श्रीलंकेने भारताचा सहा गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे भारतीय संघाच्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. सुपर 4 मधील भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. त्याआधी टीम इंडियाला पाकिस्तानने ५ विकेटने हरवले होते. त्याचबरोबर श्रीलंकेचा सुपर 4 मधील हा सलग दुसरा विजय आहे. श्रीलंकेने त्यांच्या सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव केला होता. भारताकडून मिळालेल्या 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या सलामीच्या जोडीने शानदार सुरुवात केली. पथुम निसांका आणि कुसल मेंडिस यांनी पहिल्या विकेटसाठी 67 चेंडूत 97 धावांची भागीदारी केली. यानंतर चहलने एकाच षटकात निसांका आणि चरित असलंका यांना बाद करत भारताला सलग दोन यश मिळवून दिले. निसांकाने 52 धावा केल्या तर असलंका खाते न उघडताच बाद झाला. मात्र, कुसल मेंडिसने आठवे अर्धशतक पूर्ण केले. अश्विनने अर्धशतक पूर्ण करताच गुणतिलकाला पॅव्हेलियनमध्ये पाठवून भारताला तिसरे यश मिळवून दिले. 110 धावांवर श्रीलंकेने चौथी विकेट गमावली. मात्र यानंतर भानुका राजपक्षे आणि कर्णधार दासून शनाका यांनी पाचव्या विकेटसाठी 34 चेंडूत 64 धावांची भागीदारी करत श्रीलंकेला सहा विकेटने विजय मिळवून दिला. शनाकाने नाबाद 33 आणि राजपक्षेने नाबाद 25 धावा केल्या.