सफरचंदाची जम्मू-काश्मीरची उत्पादकता हेक्टरी १० टनाची, हिमाचलची ८ ते ९ टनाची तर पश्चिमात्य देशांची ६७ टनांची आहे. आपली उत्पादकता कमी असल्याने उत्पादन खर्च वाढतो व निर्यातीला मर्यादा येतात. जैन कंपनीशी करार केल्यामुळे जे आधुनिक संशोधन व तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण पद्धती उपलब्ध होणार आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्यामुळे निश्चितच उत्पादन व उत्पादकतेत वाढ होईल, पाणी वापरात बचत होईल आणि विभागातील अन्नधान्य सुरक्षिततेला त्यामुळे हातभार लागून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल.”
या सहकार्य करारावरती भाष्य करताना कंपनीचे सह-व्यवस्थापकीय संचालक श्री. अजित जैन म्हणाले की, “जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांच्या उन्नती व प्रगतीसाठी होत असलेल्या या कराराचा आम्हांला अभिमान आहे. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि आमचे परमपूज्य पिताजी भवरलाल जैन यांनी आयुष्यभर सर्वसामान्य, गोरगरीब व छोट्या शेतकऱ्यांच्या कल्याणाचा विचार करून त्या दिशेने संशोधन व तंत्रज्ञान विकसीत केले. ते आज देशभरातील सर्व शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त व मार्गदर्शक ठरत आहे. सिंचनासाठी लागणाऱ्या उत्कृष्ट दर्ज्याच्या साहित्याबरोबरच स्वच्छ, शुद्ध व रोगमुक्त दर्जेदार रोपे-कलमे व लागवडीचे अन्य साहित्य आणि अचूक व परिपूर्ण शेतीसाठी (प्रिसीजन फार्मिंगसाठी) लागणारे तंत्रज्ञान आम्ही कृषी विद्यापीठ व शेतकऱ्यांना पुरविणार आहोत. त्यामुळे त्या प्रांतातील कमीत कमी संसाधनांचा वापर होऊन अधिकाधिक उत्पादन शाश्वतरितीने वाढू शकेल.”
अनुभवी व तज्ज्ञ लोक जम्मू-काश्मीर विद्यापीठात जाऊन तेथील विद्यार्थ्यांना अध्यापनाद्वारे मार्गदर्शन करतील”, असेही श्री. अजित जैन म्हणाले. ठिबक सिंचनावर भाताचे पीक घेण्याचा प्रयोग मागील वीस वर्षांपासून आम्ही जळगाव व अन्य ठिकाणी राबवित आहोत. हा प्रयोग जम्मू-काश्मीरमध्येही राबवावा. त्यासाठी आम्ही संपूर्ण सहकार्य करू, असेही श्री. जैन यांनी कुलगुरुंना सांगितले.